मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २२ ओव्या १ ते १००

    ॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥

    ॐ नमो सद्‍गुरु खांबसूत्री । चौर्‍यांशीं लक्ष पुतळ्या यंत्रीं ।
    नाचविशी निजतंत्रीं । प्राचीनदोरीस्वभावें ॥ १ ॥
    हे ओंकारस्वरूपी, कळसूत्री बाहुल्यांचा खेळ करणाऱ्या सद्गुरो ! तुला नमस्कार असो. चौऱ्यायशी लक्ष बाहुल्या तूं  आपल्याला पाहिजे तशा कळसूत्रावर पूर्वसंचिताप्रमाणे नाचवितोस १.


    दोरी धरिली दिसो न देशी । परी पुतळ्या स्वयें नाचविशी ।
    नवल लाघवी कैसा होशी । अलिप्ततेंसीं सर्वदा ॥ २ ॥
    हाती धरलेली दोरी तर दिसू देत नाहींस ; पण बाहुल्या तर स्वतः नाचवितोस. तथापि तूं सदासर्वदा त्यांच्यापासून अलिप्त असतोस, हे तुझे कौशल्य किती अपूर्व आहे बरें ! २.


    तेथ जैशी ज्याची पूर्वगती । तें भूत नाचे तैशा रीतीं ।
    ते नाचविती चेतनाशक्ती । तुझ्या हातीं वीणहस्तें ॥ ३ ॥
    ज्याचे जसें पूर्वकर्म असते, तसा तो जीव नाचत असतो. ती नाचविण्याची चेतनाशक्ति, तुला हात नसूनही तुझ्या हाती आहे ३.


    जेवीं कां अचेतन लोहातें । चुंबक खेळवी निजसामर्थ्यें ।
    तेवी तूं सकळ भूतांतें । निजसत्तें नाचविशी ॥ ४ ॥
    जड लोखंडाला ज्याप्रमाणे आपल्या शक्तीने लोहचुंबक खेळवितो; त्याप्रमाणे आपल्या सामर्थ्याने तूंही सर्व प्राणिमात्रांना नाचवितोस ४.


    ऐशीं सदा नाचतीं परतंत्र । तरी अभिमानाचें बळ थोर ।
    सत्य मानोनि देहाकार । आम्ही स्वतंत्र म्हणविती ॥ ५ ॥
    असे हे जीव परतंत्रपणे जरी नाचत असतात, तरी अभिमानाचा जोर केवढा! देहाचा आकार सत्य आहे हे असे मानून आम्ही स्वतंत्रच आहों असें म्हणतात. ५.


    आम्ही सज्ञान अतिज्ञाते । आम्ही कर्मकुशल कर्मकर्ते ।
    इतर मूर्खें समस्तें । ऐशा अभिमानातें वाढविती ॥ ६ ॥
    आम्ही अतिशय ज्ञानसंपन्न व कर्म करण्यात अत्यंत कुशल, आणि इतर सारे मूर्ख असाच अभिमान वाढवितात ! ६.


    एवं देहाभिमानाचेनि हातें । विसरोनि आपुल्या अकर्तृत्वातें ।
    स्वयें पावले कर्मबंधातें । जेवीं स्वप्नावस्थे विषबाधा ॥ ७ ॥
    अशा प्रकारे देशाभिमानाच्यामुळे आपलें अकर्तेपण विसरून जाऊन स्वप्नावस्थेत विषबाधा झाल्याप्रमाणे कर्मबंधनांत पडतात ७.


    स्वप्नीं अतिशय चढलें विख । आतां उतरलें निःशेख ।
    तेवीं बंधमोक्ष देख । सत्यत्वें मूर्ख मानिती ॥ ८ ॥
    स्वप्नामध्ये अतिशय विष चढले होते, ते आतां अगदी उतरलें असें म्हणावे, त्याप्रमाणे बंध व मोक्ष हे मूर्ख लोक खरे मानतात ८.


    हे तुझे खांबसूत्रींची कळा । मिथ्या सत्यत्वें दाविशी डोळां ।
    हा अतिशयें अगाध सोहळा । तुझी अतर्क्य लीळा तर्केना ॥ ९ ॥
    हा तुझा कळसूत्री खेळ मिथ्या असूनही डोळ्यांना खरा आहे असे भासवितोस. हा तुझा महिमा अपूर्व आहे. तुझ्या अतर्क्य लीलेचा तर्कच करवत नाही ९.


    अचेतनीं चेतनधर्म । प्रत्यक्ष दाविशी तूं सुगम ।
    हेंचि तुझें न कळे वर्म । करोनि कर्म अकर्ता ॥ १० ॥
    अचेतनामध्ये चैतन्याचा धर्म तूं प्रत्यक्ष दाखवून देतोस, हे तुझे मर्म कोणालाही कळत नाही. तूं कर्म करून अकर्ता आहेस १०. 


    अकर्ताचि तूं होशी कर्ता । कर्ता होत्साता अकर्ता ।
    हे तुझी कांबसूत्रता । न कळे सर्वथा कोणातें ॥ ११ ॥
    अकर्ता असून कर्ता होतोस आणि कर्ता असून अकर्ता होतोस, ही तुझी कळसूत्रीची कळा कोणाला कधीच कळत नाही ११. 


    तुझी माया पाहों जातां । तोचि मायेनें ग्रासिला तत्त्वतां ।
    असो तुजचि पाहों म्हणतां । तेही सत्त्वावस्था मायेची ॥ १२ ॥
     तुझी माया पाहावयास गेले तर ती मायाच पाहणाराला ग्रासून टाकते. तेही असो; पण तुलाच पाहावयास जावें तर ती सत्वावस्थाही मायेचीच होय १२.


    ऐसें तुझें खांबसूत्र । अकळ न कळे गा तुझें चरित्र ।
    देखों नेदितां निजसूत्र । भूतें विचित्र नाचविशी ॥ १३ ॥
    असा तुझा हा कळसूत्री खेळ आहे. तुझे चरित्र अगम्य असल्यामुळे कळणे शक्य नाही. आपलें सूत्र दृष्टीस पडू न देता, प्राणिमात्रांना विलक्षण रीतीने नाचवितोस मात्र! १३.


    तुझेनि जग होय जाये । परि म्यां केलें हें ठावें नोहे ।
    ऐसा तुझा खेळ पाहें । कोणें काये लक्षावा ॥ १४ ॥
    तुझ्यामुळेच जग होते आणि जातें पण 'मी केलें ' असें तुला वाटत नाही. असा तुझा खेळ आहे, तो कोणी कसा पहावा १४.


    यापरि खेळ वाढविशी । सवेंचि विकल्पोनि मोडिशी ।
    विकार महत्तत्त्वीं सांठविशी । हेंही कर्तृत्व अंगासी न लगत गेलें ॥ १५ ॥
    अशा रीतीने खेळ वाढवितोस आणि लागलाच विकल्पाने मोडूनही टाकतोस. महत्तत्त्वाच्या ठिकाणी विकार सांठवून ठेवतोस. पण हेही कर्तृत्व तुझ्या अंगीं लागत नाही १५.


    याचें मुख्यत्वें मूळ लक्षण । तुझे कृपेवीण न कळे जाण ।
    तुझी कृपा झालिया पूर्ण । जनीं जनार्दन प्रकटे पैं ॥ १६ ॥
    ह्याचे मुख्यत्वे मूळ लक्षण तुझ्या कृपेशिवाय कळत नाही. तुझी पूर्ण कृपा झाली तरच जनी जनार्दन प्रगट होतो १६.


    जनीं प्रगटल्या जनार्दन । तद्रूप होइजे आपण ।
    हे मूळींची निजखूण । तेथ मीतूंपण रिगेना ॥ १७ ॥
    आणि जनीं जनार्दन प्रगट झाला म्हणजे आपणही तद्रूपच होतो. हेच त्यांतील मूळबीज आहे. तेथे मीतूंपण राहात नाही १७.


    मीतूंपणेंवीण प्रसिद्ध । जनीं जनार्दन निजानंद ।
    त्याचे कृपेस्तव विशद । श्रीभागवत शुद्ध वाखाणिलें ॥ १८ ॥
    मीतूंपणावांचून जनामध्ये निजानंदरूपी जनार्दन प्रसिद्ध आहे; त्याच्या कृपेमुळेच श्रीमद्भागवत हें नीट रीतीने वर्णन केले जात आहे १८.


    तेथ एकविसाव्याचे अंतीं । वेद त्रिकांड लक्ष्यार्थस्थिती ।
    ब्रह्म एकचि निश्चितीं । अद्वयस्थिती अविनाशी ॥ १९ ॥
    त्यांत एकविसाव्या अध्यायाच्या अंती त्रिकांडात्मक वेदाचा लक्ष्यार्थ म्हणजे सर्वत्र एकच ब्रह्म असून ते अद्वय व अविनाश आहे असे सांगितले १९.


    हें वेदार्थसारनिरूपण । ऐकतां उद्धवा बाणली खूण ।
    ब्रह्म एकाकी परिपूर्ण । दुजेनवीण संचलें ॥ २० ॥
    हें वेदार्थातील सारांशाचे निरूपण ऐकून उद्धवाला खूण पटली की, ब्रह्म हें एकी एकी एक असून ते परिपूर्ण व अद्वैतरूपानेच राहिलेले आहे २०.


    वेदवादें ब्रह्म एक । स्वानुभवें तैसेंचि देख ।
    तरी ज्ञाते ऋषिजन लोक । केवीं तत्त्वें अनेक बोलती ॥ २१ ॥
    वेदवाणीवरून ब्रह्म हे एकच आहे; आणि स्वानुभवाने पाहिले असतांही ते तसेंच दिसते. तथापि मोठमोठे ज्ञाते ऋषि तत्वे अनेक आहेत म्हणतात हे कसे ? २१.


    येचि आशंकेलागीं जाण । उद्धवें स्वयें मांडिला प्रश्न ।
    परी पोटांतील भिन्न खूण । उगा श्रीकृष्ण न रहावा ॥ २२ ॥
    हीच शंका मनांत आणून उद्धवाने प्रश्न विचारण्यास आरंभ केला. पण पोटांतील भाव मात्र निराळा, तो हा की, श्रीकृष्णाने उगीच बसूं नये २२.


    मी झालों जी ब्रह्मसंपन्न । हें ऐकतां माझें वचन ।
    निजधामा निघेल श्रीकृष्ण । मग हें दर्शन मज कैंचें ॥ २३ ॥
    'मी ब्रह्मस्वरूप झालों' असें जर मी म्हटले, तर तें ऐकून श्रीकृष्ण निजधामाला जातील, मग हे दर्शन मला कशाचें ? २३.


    ऐशिया काकुळतीं जाण । संशयेवीण करी प्रश्न ।
    ते आयकोनि श्रीकृष्ण । सुखसमाधान भोगित ॥ २४ ॥
    अशा काकुळतीने संशय नसतांही त्याने प्रश्न केला. तो ऐकून श्रीकृष्णाला सुख व समाधान वाटले २४.


    तंव कृष्णाचे मनीं आणिक । उद्धव मी दोघे एक ।
    मिथ्या वियोगाचें दुःख । हें कळे तंव देख प्रश्न सांगों ॥ २५ ॥
    इतक्यांत कृष्णाच्या मनात निराळंच आलें तें असें की, उद्धव व आपण एकच आहोत, वियोगाचे दुःख हे मिथ्या आहे, हे उद्धवाला कळेपर्यंत आम्ही ह्याचे प्रश्न सांगू या २५.


    बाविसावे अध्यायीं देख । तत्त्वसंख्या सांगेल आवश्यक ।
    प्रकृतिपुरुषविवेक । जन्ममरणद्योतक प्रकारु ॥ २६ ॥
    ह्या बाविसाव्या अध्यायामध्ये तत्त्वांची एकंदर संख्या किती हें अवश्य दाखवून देतील; त्यांतच प्रकृतिपुरुषाचा विचार व जन्ममरणाचा प्रकारही सांगतील २६.


    आत्मा एक कीं अनेक । आणि तत्त्वसंख्याविवेक ।
    हें कळावया निष्टंक । उद्धव देख पूसत ॥ २७ ॥
    आत्मा एकच आहे की अनेक आहेत हे कळावे, तसाच तत्त्वसंख्येचा विचारही निश्चितार्थानें कळावा म्हणून उद्धव विचारीत आहे २७.


    उद्धव उवाच-
    कति तत्त्वावि विश्वेश संख्यातान्यृषिभिः प्रभो ।
    नवैकादश पञ्चत्रीण्यात्थ त्वमिह शुश्रुम ॥ १ ॥
    [श्लोक १] उद्धव म्हणाला हे प्रभो ! हे विश्वेश्वर ! तत्त्वांची संख्या ऋषींनी किती सांगितली आहे ? आपण तर नुकतीच नऊ, अकरा, पाच आणि तीन म्हणजेच एकूण अठ्ठावीस तत्त्वे सांगितलेली ऐकली. (१)


    विश्वात्मका विश्वेश्वरा । विश्वधारका विश्वंभरा ।
    विश्वसाक्षी विश्वाकरा । विश्वैकसुंदरा श्रीकृष्णा ॥ २८ ॥
    हे विश्वात्मका, विश्वेश्वरा; हे विश्वधारका, विश्वंभरा; हे विश्वसाक्षी, विश्वाकारा; हे विश्वसुंदरा श्रीकृष्णा ! २८. 


    तुज विश्वात्मक म्हणतां । जड मलिन एकदेशिता ।
    आली म्हणशी अज्ञानता । यालागीं प्रभुता उपपादी ॥ २९ ॥
    तुला 'विश्वात्मक' म्हटले तर जड, मलिन एकदेशीयता व अज्ञानता आली असें म्हणशील, म्हणून तुझे 'प्रभुत्व' सांगतों २९.


    जड मलिन अज्ञानता । हे मायेस्तव होती तत्त्वतां ।
    ते मायेचा तूं नियंता । हे अगाध प्रभुता पैं तुझी ॥ ३० ॥
    जड-मलिन- अज्ञानता ह्या खरोखर मायेमुळेच होतात; त्या मायेचाही तूं नियंता आहेस. हेंच तुझें अगाध 'प्रभुत्व' होय ३०.


    ऐशिया संबोधनद्वारा । विनवूनि स्वामी शारंगधरा ।
    तत्त्वसंख्येच्या विचारा । निजनिर्धारा पुसत ॥ ३१ ॥
    अशा प्रकारे स्वामी श्रीकृष्णाचा उत्तम गौरव करून उद्धवाने मोठ्या विनयाने तत्त्वसंख्येच्या निश्चयाचा विचार त्याला विचारला ३१.


    जे तपःसामर्थ्यें समर्थ थोर । अनागतद्रष्टे ऋषीश्वर ।
    त्यांची तत्त्वसंख्या विचित्र । पृथक्‌पृथगाकारें बोलती ॥ ३२ ॥
    (उद्धव म्हणाला) तपःसामर्थ्याने महासमर्थ, भूतभविष्य जाणणारे असे जे मोठमोठे ऋषिवर्य, त्यांनी काढलेली तत्त्वांची संख्या विचित्रच वाटते. ते ती वेगवेगळ्या प्रकारची सांगतात! ३२.


    तत्त्वसंख्या इत्थंभूत । एकुणिसाव्या अध्यायांत ।
    तुम्हींच निरूपिला तत्त्वार्थ । तोचि वृत्तांत सांगत ॥ ३३ ॥
    एकोणिसाव्या अध्यायामध्ये आपणच तत्त्वांचा विचार इत्थंभूत सांगितला आहे. त्यांतील एकंदर तत्त्वांची संख्या आपण मला सांगितली आहे, तीच मी सांगतों ३३.


    चौदावे श्लोकींच्या निरूपणीं । हे अठ्ठावीस तत्त्वगणनी ।
    सांगितली शार्ङ्‌गपाणी । मजलागोनी निश्चित ॥ ३४ ॥
    चौदाव्या श्लोकाच्या निरूपणांत, हे श्रीकृष्णा ! तत्त्वांची गणना करून ती सारी निश्चयेंकरून अठ्ठावीस आहेत असे आपण सांगितले ३४.


    ये तत्त्वसंख्येचा विचार । प्रकृति पुरुष महदहंकार ।
    पंच महाभूतें थोर । हा संख्याप्रकार नवांचा ॥ ३५ ॥
    ह्या तत्वसंख्येच्या विचारांत-प्रकृति, पुरुष, महत्तत्व व अहंकार आणि श्रेष्ठ अशी पंच महाभूते मिळून नऊ तत्त्वे झाली ३५.


    दाही इंद्रियें अकरावें मन । पंच विषय तीन्ही गुण ।
    हें अठ्ठावीस संख्यागणन । स्वमुखें आपण निरूपिलें ॥ ३६ ॥
    त्यानंतर दहा इंद्रिये, अकरावें मन, पांच विषय आणि तिन्ही गुण मिळून अठ्ठावीस संख्या होत असल्याचे आपणच निरूपण केले ३६.


    यापरी गा लक्ष्मीपती । हे मुख्यत्वें तुझी तत्त्वोक्ती ।
    आतां ऋषीश्वरांच्या युक्ती । ऐक तुजप्रती सांगेन ॥ ३७ ॥
    हे लक्ष्मीपते ! हेच तुझें मुख्य सांगणे आहे. आता मोठमोठ्या ऋषींचे युक्तीवादही मी तुला सांगतों ३७.


    तें तूं ऐक गा निश्चित । तुज सांगेन तयाचा अर्थ ।
    म्हणोनियां निरूपित । स्वयें मनोगत उद्धव ॥ ३८ ॥
    त्याचा अर्थही आपल्याला सांगतों. तो आपण नीटपणे ऐकून घ्यावा. असें म्हणून उद्धव स्वतः त्यांचे म्हणणे सांगू लागला ३८.


    म्हणे तत्त्वतां अवधारीं । मी सांगेन एक कुसरी ।
    प्रकृतिपुरुषांमाझारीं । विचित्र परी सांगत ॥ ३९ ॥
    तो म्हणाला, आपण नीट ऐकावें. मी एक चमत्कार सांगतो. प्रकृतिपुरुषामध्येच एक विचित्र प्रकार आहे ३९.


    केचित्षड्विशतिं प्राहुरपरे पंचविंशतिम् ।
    सप्तैके नव षट् केचिच्चत्वार्येकादशापरे ॥ २ ॥
    केचित्सप्तदश प्राहुः षोडशैके त्रयोदश ।
    एतावत्त्वं हि संख्यानामृषयो यद्विवक्षया ॥ ३ ॥
    [श्लोक २-३] काहीजण सव्वीस तत्त्वे सांगतात, तर दुसरे काहीजण पंचवीस काहीजण सात, नऊ किंवा सहा म्हणतात काहीजण चार सांगतात, तर काहीजण अकरा ! काहीजण सतरा, काहीजण सोळा, तर काहीजण तेरा सांगतात हे सनातन श्रीकृष्णा ! इतकी वेगवेगळी संख्या ऋषी कशी काय सांगतात ? आपण कृपा करून ते आम्हांला सांगावे. (२-३)


    येथ तत्त्वसंख्या मतवाद । ऋषीश्वरांमाजीं विवाद ।
    त्या विवादाचे शब्द । ऐक विशद सांगेन ॥ ४० ॥
    या तत्त्वांच्या संख्येमध्ये मोठा मतभेद असून मोठमोठ्या ऋषींचे त्यासंबंधानें वादच माजून राहिले आहेत. त्या वादातील सारांशही मी आपल्याला स्पष्ट करून सांगतों ४०.


    एक म्हणे तत्त्वें 'सव्वीस' । दुजा म्हणे उगा बैस ।
    बहु बोलावाया नाहीं पैस । तत्त्वें 'पंचवीस' नेमस्त ॥ ४१ ॥
    एक म्हणतो, ही तत्त्वे सव्वीस आहेत, दुसरा म्हणतो, गप्प बैस. अधिक बोलावयाला जागाच नाही. सारी तत्त्वे पंचवीसच ठरलेली आहेत ४१.


    तिजा म्हणे तुम्हीं येथ । कैसोनि वाढविलें स्वमत ।
    तत्त्वें नेमस्तचि 'सात' । कैंचीं बहुत बोलतां ॥ ४२ ॥
    तिसरा म्हणतो, तुम्ही येथे आपआपला हट्ट कसला घेऊन बसता ? सारी तत्त्वें सातच ठरलेली आहेत. अधिक कोठची सांगतां । ४२.


    एक म्हणे हें अभिनव । बोलतां न लाजती मानव ।
    वृथा बोलाची लवलव । तत्त्वें 'नव' नेमस्त ॥ ४३ ॥
    एक म्हणतो, किती आश्चर्य आहे पहा. मनुष्यांना बोलतांना लाजही वाटत नाही. ही शब्दांची बडबड वायफळ आहे. खरोखर तत्वे नऊच ठरलेली आहेत ४३.


    तंव हांसोनि बोले एक । सांपे सज्ञान झाले लोक ।
    मिथ्या बहु तत्त्वजल्पक । 'तत्त्वषट्क' नेमस्त ॥ ४४ ॥
    तों आणखी एकजण हासून म्हणतो, सारेच लोक हल्ली शहाणे झाले आहेत ! उगीच वायफळ बडबड चालवितात, तत्त्वे खरी सहाच आहेत ४४.


    एक म्हणती परते सरा । नेणा तत्त्वसंख्यविचारा ।
    तत्त्वें नेमिलींच 'अकरा' । बडबड सैरा न करावी ॥ ४५ ॥
    कोणी म्हणतात चला, बाजूला व्हा. तत्त्वसंख्येचा विचार तुम्हांला मुळीच समजत नाही. खरी तत्त्वे अकराच आहेत. व्यर्थ बडबडीत अर्थ नाही ४५.


    दुजा म्हणे तत्त्वविचारा । नेणोनि धरिसी अहंकारा ।
    पुसोनियां थोरथोरां । तत्त्वें 'सतरा' नेमस्त ॥ ४६ ॥
    दुसरा म्हणतो, तत्त्वांचा विचार न समजतां उगीच अभिमान मात्र धरतोस. मोठमोठ्यांना विचारले असतां तत्त्वे सतराच असल्याचे सांगतात ४६.


    एक म्हणे व्युत्पत्तिबळा । कां व्यर्थ पिटाल कपाळा ।
    न कळे भगवंताची लीळा । तत्त्वें 'सोळा' नेमस्त ॥ ४७ ॥
    एक म्हणतो, विद्वत्तेच्या जोरावर व्यर्थ कपाळफोड का करीत बसतां? भगवंताची लीला कोणालाच कळत नाही. सोळाच तत्त्वं खरी आहेत ४७.


    एक म्हणे या गर्वितां पोरां । कोण पुसे तत्त्वविचारा ।
    तत्त्वें नेमस्तचि 'तेरा' । निजनिर्धारा म्यां केलें ॥ ४८ ॥
    कोणी म्हणतो, ह्या गर्विष्ठ पोरांच्या तत्वविचाराला कोण विचारतो? मी तर ठाम तेराच तत्त्वे आहेत असे निश्चित केले आहे ४८.


    एक म्हणे सांडा चातुरी । तत्त्वें नेमस्तचि 'चारी' ।
    दुजा म्हणे या कायशा कुसरी । तत्त्वें निर्धारीं 'दोनचि' ॥ ४९ ॥
    एक म्हणतो. हे तुमचें पांडित्य पुरे करा; तत्त्वे मूळ चारच आहेत. दुसरा म्हणतो, या म्हणण्यांत काय हाशील ? खरे म्हटले तर तत्त्वे दोनच आहेत ४९.


    तिजा म्हणे वाचाट लोक । कोणें धरावें यांचें मुख ।
    निजनिर्धारीं तत्त्व 'एक' । एकाचा अनेक विस्तार ॥ ५० ॥
    तिसरा म्हणतो, हे सारे वाचाळ लोक. ह्यांच्या तोंडाला कोणी लागावें ? वास्तविक तत्व असें एकच असून त्याचेच अनेक विस्तार झालेले आहेत ५०.


    एवं मतपरंपरा नाना मतीं । ऋषीश्वरीं वेंचितां युक्ती ।
    तुझ्या तत्त्ववादाची निश्चिती । कोणें इत्थंभूतीं मानावी ॥ ५१ ॥
    अशा प्रकारे मोठमोठ्या ऋषींनी अनेक युक्ति लढवून निरनिराळी मते प्रतिपादन केली आहेत, तेव्हां तूं जो तत्त्वनिर्णय सांगितलास, तोच निश्चित म्हणून कसा मान्य करावा ? ५१.


    तूं निजात्मा परमेश्वर । तुज जाणावया ऋषीश्वर ।
    वेंचूनि युक्तिचे संभार । तत्त्वविचार बोलती ॥ ५२ ॥
    तूं निजात्मरूपी परमेश्वर आहेस. तुला जाणण्यासाठी मोठमोठ्या ऋषींनी नानाप्रकारचे तर्क चालवून तत्त्वविचार सांगितला आहे ५२.


    स्वामीनें सांगितलें तत्त्व एक । ऋषीश्वर बोलती अनेक ।
    येचिविषयींचें निष्टंक । मज आवश्यक सांगावें ॥ ५३ ॥
    आपण प्रभूंनी तर एकच तत्त्व आहे असे सांगितले. आणि मोठमोठे ऋषि म्हणतात ती अनेक आहेत. तेव्हा यांतील निश्चितार्थ मला सांगावा ५३.


    एवं या तत्त्वनिश्चयासी । मज सांगावया योग्य होसी ।
    ऐसा विनविला हृषीकेशी । तो उद्धवासी तुष्टला ॥ ५४ ॥
    मला ह्या तत्त्वांचा निश्चय सांगण्याला आपणच योग्य आहात. याप्रमाणे श्रीकृष्णाला विनंती केली, तेव्हां तो उद्धवावर प्रसन्न झाला ५४.


    जीं जीं ऋषीश्वर बोलती । तीं तीं तत्त्वें सत्य होतीं ।
    हें सर्वज्ञ ज्ञाते जाणती । तेचि अर्थीं हरि बोले ॥ ५५ ॥
    मोठमोठ्या ऋषींनी जी तत्वे सांगितली आहेत ती सारी खरीच आहेत. हे सर्वज्ञ ज्ञात्यांना माहीत आहे. याविषयींच श्रीकृष्ण सांगतात ५५.


    श्रीभगवानुवाच-
    युक्तंच सन्ति सर्वत्र भाषन्ते ब्राह्मण यथा ।
    मायां मदीयामुद्‌गृह्य वदतां किं नु दुर्घटम् ॥ ४ ॥
    [श्लोक ४] श्रीभगवान म्हणाले उद्धवा ! यांविषयी वेद जाणणारे जे काही सांगतात, ते सर्व खरेच आहे कारण सर्व तत्त्वे सर्वांच्यामध्ये अंतर्भूत आहेत माझ्या मायेच्या आधारावर काय सांगणे अशक्य आहे ? (४)


    ज्याचेनि मतें जैसें ज्ञान । तो तैसें करी तत्त्वव्याख्यान ।
    या हेतू बोलती ब्राह्मण । तें सत्य जाण उद्धवा ॥ ५६ ॥
    ज्याचे ज्ञान जसे असते, त्याप्रमाणे तो तत्त्वे सांगत असतो. उद्ध्वा! याच हेतूनें ब्राह्मण बोलतात तेही खरेच समजावें ५६.


    जरी अवघीं मतें प्रमाण । तरी कां करावें मतखंडण ।
    उद्धवा तूं ऐसें न म्हणा । ते मी निजखूण सांगेन ॥ ५७ ॥
    'आतां सारीच मते जर खरी, तर मग इतर मतांचे खंडण तरी कां करावें?' असे मात्र उद्धवा! तूं म्हणू नकोस. त्यांतील हृद्गत मी तुला सांगतों ऐक ५७.


    अघटघटित माझी माया । जे हरिहरां न ये आया ।
    जे नाथिलें वाढवूनियां । लोकत्रया भुलवीत ॥ ५८ ॥
    माझी माया अघटित घटना करणारी आहे. हरिहरालासुद्धा तिचे आकलन होत नसते. कारण ती नसलेली सृष्टि वाढवून त्रिभुवनाला भुरळ पाडते ५८.


    ते माया धरोनियां हातें । ऋषीश्वर निजमतें ।
    जो जो जें जें बोलेल जेथें । तें तें तेथें घडे सत्य ॥ ५९ ॥
    ती माया हाती धरून महर्षि आपल्या मतानें जें जें काही बोलत असतात, तें तें तेथे खरेच होतें ५९.


    केवळ दोराचा सर्पाकार । हा श्वेत कृष्ण कीं रक्तांबर ।
    ज्यासी जैसा भ्रमाकार । त्यासी साचार तो तैसा ॥ ६० ॥
    केवळ दोरच जेथे सर्पाकाराने भासतो, तेथें तो साप पांढरा, काळा, की तांबडा कसला म्हणावा ? तर ज्याला जसा भ्रम होतो, तसा तो त्याला दिसत असतो ६०.


    तेवीं आत्मतत्त्व एकचि जाण । अविकारी निजनिर्गुण ।
    तेथ नाना तत्त्वांचें व्याख्यान । बोलती ब्राह्मण मायायोगें ॥ ६१ ॥
    त्याप्रमाणे आत्मतत्त्व हे एकच आहे, व तें निर्गुण व निर्विकारी आहे; परंतु मायेमुळे ब्राह्मण अनेक तत्त्वांचे प्रतिपादन करतात ६१.


    त्या मायेच्या मायिका व्युत्पत्ती । नाना वाग्वाद स्वमतीं ।
    त्याच वादाची वादस्थिती । ऐक तुजप्रती सांगेन ॥ ६२ ॥
    त्यांचें तें मायात्मक भाषण मायामयच असते. आपल्या मताच्या पुष्ट्यर्थ ते नानाप्रकारे वाग्वाद करतात. ते वाद कसे असतात तेंही मी तुला सांगतों ऐक ६२.


    ऐसें बोलोनि श्रीकृष्णनाथ । उद्धवाप्रति साङ्‌ग निरूपित ।
    तत्त्वविचारणा यथार्थ । स्वयें सांगत आपण ॥ ६३ ॥
    ह्याप्रमाणे बोलून श्रीकृष्ण यथार्थ तत्त्वविचार उद्धवाला आपण स्वतः सांगू लागले ६३.


    हें पांचवे श्लोकींचें नीरूपण । श्रीकृष्णउ द्धवविवरण ।
    सांगितलें तत्त्वव्याख्यान । उद्धवा जाण यथार्थ ॥ ६४ ॥
    पुढील पांचव्या श्लोकांतील निरूपण म्हणजे उद्धवाला श्रीकृष्णाने विवरण करून सांगितलेलें तत्त्वाचे यथार्थ व्याख्यान आहे ६४.


    नैतदेवं यथाऽऽत्थ त्वं यदहं वच्मि तत्तथा ।
    एवं विवदतां हेतुं शक्तयो मे दुरत्ययाः ॥ ५ ॥
    [श्लोक ५] तुम्ही जे म्हणता, ते बरोबर नाही मी जे सांगतो, तेच बरोबर अशा प्रकारे जगाच्या कारणासंबंधीचा वाद, सोडण्यास कठीण अशा त्रिगुणात्मक वृत्तींमुळे होतो. (५)


    माझे मायेचें प्रबळ बळ । तेणें अभिमान अतिसबळ ।
    वाढवूनि युक्तीचें वाग्जाळ । करिती कोल्हाळ वाग्वादी ॥ ६५ ॥
    माझ्या मायेचे बळ मोठे दांडगे आहे ; त्यायोगे प्रचंड अभिमान उत्पन्न होतो; त्यामुळे विद्वान् लोक युक्तिप्रयुक्तीचे वाग्जाळ माजवून वितंडवाद घालीत बसतात ६५.


    प्रबळ शास्त्रश्रवणाभिमान । तुझें वचन तें अप्रमाण ।
    मी बोलतों हेंचि प्रमाण । पत्रावलंबन केलें असे ॥ ६६ ॥
    त्यांचा शास्त्रश्रवणाभिमान मोठा असतो. 'तुझे बोलणें तें खोटें, मी म्हणतों हेच खरे आहे, ह्याला माझ्याजवळ ग्रंथाधार आहे' (असे ते म्हणतात) ६६.


    सत्त्वरजादि गुणोत्पत्ती । माझे मायेच्या अनंत शक्ती ।
    तेणें गुणक्षोभें विवादती । स्वमतव्याप्तीअभिमानें ॥ ६७ ॥
    सत्वरजादि गुणोत्पत्तीमुळे माझ्या मायेच्या अनंत शक्ति आहेत. त्यामुळे ते गुण क्षुब्ध झाले म्हणजे आपलेंच मत खरे अशा अभिमानाने तंडत बसतात! ६७.


    यासां व्यत्कराआदासीद्‌विकल्पो वदतां पदम् ।
    प्राप्ते शमदमेऽप्येति, वादस्तमनुशाम्यति ॥ ६ ॥
    [श्लोक ६] सत्त्व इत्यादी गुणरूप शक्तींच्या क्षोभामुळेच, केवळ नावरूपात्मक मिथ्या प्रपंच उभा राहिला आहे वादविवाद करणार्‍यांच्या वादाचा हाच विषय आहे जेव्हा इंद्रिये आपल्या ताब्यात येतात आणि चित्त शांत होते, तेव्हा त्यांची भेदबुद्धी नाहीशी होते आणि वादसुद्धा शांत होतो. (६)


    कां गुणक्षोभें अभिमान । विकल्प उपजवी गहन ।
    विकल्पें युक्तीचें छळण । करी आपण अतिवादें ॥ ६८ ॥
    गुणक्षोभाने झालेला अभिमान भयंकर विकल्प उत्पन्न करतो, आणि अतिवाद करून त्या विकल्पाच्या युक्तीचे खंडन करतो ६८.


    सांडितां गुणक्षोभविलास । रजतमांचा होय र्‍हास ।
    सत्त्ववृत्तीचा निजप्रकाश । अतिउल्हास शमदमांचा ॥ ६९ ॥
    परंतु हा गुणक्षोभाचा प्रकार टाकून दिला म्हणजे रजाचा आणि तमाचा ऱ्हास  होउन सत्त्ववृत्ति प्रकाशित होते. त्यावेळी शम आणि दम यांचा उत्कर्ष होतो ६९.


    शमदमांचे निजवृत्ती । संकल्प-विकल्पेंसीं जाती ।
    वाद अतिवाद उपरमती । जेवीं सूर्याप्रती आंधारें ॥ ७० ॥
    ह्या शमदमाचा प्रभावच असा आहे की, सूर्योदय झाल्याबरोबर अंधकार नाहीसा व्हावा, त्याप्रमाणे विकल्पासहवर्तमान संकल्प व वादप्रतिवाद आपोआपच बंद पडतात ७०. 


    सर्वज्ञ ज्ञाते जे गा होती । ते नाना तत्त्वांच्या तत्त्वोक्ती ।
    स्वयें विवंचूनि जाणती । ऐक तुजप्रती सांगेन ॥ ७१ ॥
    म्हणून सर्वज्ञ ज्ञातें असतात ते नानाप्रकारच्या सत्रांसंबंधीं नाना मतांचा विचार करून त्यांतील हृद्गत जाणतात. तेही सुला सांगतो ७१.


    परस्परानुप्रवेशत्तत्त्वानां पुरुषर्षभ ।
    पौर्वापर्यप्रसंख्यानं यथा वक्तुर्विवक्षितम् ॥ ७ ॥
    [श्लोक ७] हे पुरूषश्रेष्ठा ! तत्त्वे एकमेकात प्रवेश करू शकतात, म्हणून तत्त्वांची जितकी संख्या वक्ता सांगू इच्छितो, त्यानुसार कारणे कार्यांमध्ये किंवा कार्ये कारणांमध्ये मिळवून आपली इच्छित संख्या तो सिद्ध करतो. (७)


    गुरूपाशीं शास्त्रपाठा । करूनि साधिली निजनिष्ठा ।
    ऐक उद्धवा पुरुषश्रेष्ठा । प्रियवरिष्ठा प्रियोत्तमा ॥ ७२ ॥
    हे प्रियोत्तम पुरुषश्रेष्ठा उद्धवा ! यथोक्त  रीतीने गुरूपाशी शास्त्रपाठ घेऊन आत्मनिष्ठा साध्य करीत असतात. कशी ती ऐक ७२.


    तत्त्वगणनेचे जे जे लेख । एकाचें थोडें एकाचें अधिक ।
    हा 'अनुप्रवेश' वोळख । एकामाजीं एक उपजती ॥ ७३ ॥
    तत्त्वांच्या गणनेसंबंधाने जे जे लेख आहेत ते कोणाचे अधिक व कोणाचे उणे आहेत; तत्त्वे एकापासून एक उत्पन्न होतात ह्याला परस्परांचा 'अनुप्रवेश' म्हणतात ७३.


    तत्त्वांपासूनि तत्त्वें होतीं । कारणरूपें कार्याची स्थिती ।
    अंतीं जेथील तेथें प्रवेशती । हे तत्त्वोपपत्ती उद्धवा ॥ ७४ ॥
    उद्धवा! तत्त्वापासून तत्त्वें उत्पन्न होतात. कारणरूपानेच कार्याची स्थिति होते; आणि शेवटी ज्यांतली त्यांत ती शिरतात. अशी ही तत्त्वांची उपपत्ति आहे ७४.


    पूर्वस्थिति जें तें कारण । त्यापासोनि उपजे तें कार्य जाण ।
    हें कार्यकारणांचें लक्षण । तत्त्वविचक्षण बोलती ॥ ७५ ॥
    तत्त्वांची जी पूर्वस्थिति तें 'कारण' आणि त्यापासून जें उत्पन्न होतें तें कार्य होय. तत्त्वविचारी पुरुष कार्यकारणाचे लक्षण असें सांगत असतात ७५.


    येथ वक्त्याचें जैसें मनोगत । तैशी तत्त्वसंख्या होत ।
    कार्य-कारण एकत्व गणित । तत्वसंख्या तेथ थोडीच ॥ ७६ ॥
    ह्यांत वक्त्याची जशी इच्छा असते, त्याप्रमाणे त्या तत्त्वांची संख्या होते. कार्य व कारण एकच असें जे मानितात, त्यांची तत्त्वसंख्या थोडी होते ७६.


    एकचि कार्य आणि कारण । गणितां आणिती भिन्न ।
    तेथ तत्त्वसंख्या अधिक जाण । होय गणन उद्धवा ॥ ७७ ॥
    उद्धवा! कार्य आणि कारण एकच असतां मोजतांना ती भिन्न भिन्न करतात; त्यामुळेही तत्त्वांची संख्या सहजच अधिक होते ७७.


    एवं कार्यकारणें भिन्नभिन्नें । तत्त्वसंख्या थोडी बहुत होणें ।
    हीं तत्त्ववक्त्यांचीं लक्षणें । तुज सुलक्षणें सांगितलीं ॥ ७८ ॥
    अशा रीतीने कार्य व कारण यांची भिन्न भिन्न प्रकारें गणना केली असतां तत्त्वांची संख्या कमजास्त होते. असे तत्त्व सांगणारांचे प्रकार आहेत ते तुला सांगून दिले ७८.


    येचि विषयींची उपपत्ती । स्वयें सांगताहे श्रीपती ।
    कार्यकारणनिजयुक्ती । उद्धवाप्रती निवाडे ॥ ७९ ॥
    त्याच विषयाची अधिक फोड, आणि कार्यकारणाविषयी आपले स्वतःचे मत श्रीकृष्ण उद्धवाला सांगत आहेत ७९.


    एकस्मिन्नपि दृश्यन्ते प्रविष्टानीतराणि च ।
    पूर्वस्मिन्वा परस्मिन्वा तत्त्वे तत्त्वानि सर्वशः ॥ ८ ॥
    [श्लोक ८] एकाच कारणरूप तत्त्वामध्ये किंवा कार्यरूप तत्त्वामध्ये पूर्णपणे दुसरी तत्त्वे मिसळलेली दिसतात. (८)


    आकाशापासूनि वायु झाला । तो गगनावेगळा नाही गेला ।
    वायूपासूनि अग्नि झाला । तेथ प्रवेशु आला दोंहींचा ॥ ८० ॥
    आकाशापासून वायु उत्पन्न झाला आहे, पण तो काही आकाश सोडून गेला नाही. वायूपासून अग्नि झाला, त्यांत आकाश व वायु ह्या दोघांचाही समावेश झालाच ८०.


    अग्नीपासून आला जळरस । त्यामाजीं तिंहीचा रहिवास ।
    जळापासून पृथ्वीचा प्रकाश । तीमाजीं प्रवेश चहूंचा ॥ ८१ ॥
    अग्नीपासून पाणी उत्पन्न झाले, त्यांत तिहींचेही वास्तव्य झाले. जलापासून पृथ्वी उत्पन्न झाली, तींत चारांचा समावेश झाला ८१.


    तैसें कार्य आणि कारण । परस्परें अभिन्न जाण ।
    जेवी लेणें आणि सुवर्ण । वेगळेंपण एकत्वें ॥ ८२ ॥
    ह्याचप्रमाणे कार्य आणि कारण ही परस्पर अभिन्न म्ह० एकरूपच असतात ; ज्याप्रमाणे दागिना आणि सोनें ही निरनिराळी दिसली तरी एकच असतात ८२.


    जेवीं तंतु आणि पट । दोनी दिसती एकवट ।
    तेवीं कार्यकारण सगट । दिसे स्पष्ट अभिन्न ॥ ८३ ॥
    तंतु आणि वस्त्र ही जशी दोन्ही एकरूप दिसतात, त्याप्रमाणेच कार्यकारणही सारे स्पष्ट एकरूपच दिसते ८३.


    सारेचीं नारळें केळीं । परी तीं साकरत्वा नाहीं मुकलीं ।
    तेवीं कारणांचीं कार्यें झाली । असतां संचलीं कारणत्वें ॥ ८४ ॥
    साखरेची नारळ आणि केळी केली तरी ती साखरेच्या मूळ स्वरूपाला सोडीत नाहीत; त्याप्रमाणे कारणांची कार्ये झाली तरी ती कारणरूपानेच राहिलेली असतात ८४.


    जेवीं कां पृथ्वीचा मृत्पिंड । मृत्पिंडीं अनेक भांड ।
    होतां गाडगीं उदंड । मृत्तिका अखंड सर्वांमाजीं ॥ ८५ ॥
    ज्याप्रमाणे मातीचा गोळा घेतला व त्या गोळ्यापासून अनेक आकाराची गाडगी केली; तरी त्या सर्वामध्ये माती ही अखंड कायमच असते ८५.


    तेवीं कारणीं कार्यविशेषु । कार्यासी कारणत्वें प्रकाशु ।
    हा परस्परानुप्रवेशु । अनन्य बिलासु अखंडत्वें ॥ ८६ ॥
    त्याप्रमाणे कारणामध्ये कार्य असते, कारणामुळेच कार्य प्रगट होते. हा परस्परांचा ' अनुप्रवेश' असून अनन्य एकरूपता नेहमींचीच आहे ८६.


    एक कार्य आणि कारण । होय भिन्न आणि अभिन्न ।
    तेणें तत्त्वसंख्यालक्ष्ण । घडे जाण न्यूनाधिक ॥ ८७ ॥
    एक कार्य आणि एक कारण असे भिन्नभिन्न मानले म्हणजे तत्त्वसंख्येचे मानही कमजास्त होते ८७.


    पौर्वापर्यमतोऽमीषां प्रसङ्‌ख्यानमभीप्सताम् ।
    यथा विविक्तं यद्वक्त्रं गृह्णीमो युक्तिसम्भवात् ॥ ९ ॥
    [ श्लोक ९] यांची गणती जे जे करू इच्छितात, त्यांनी ज्या कार्याला ज्या कारणामध्ये किंवा ज्या कारणाला ज्या कार्यामध्ये अंतर्भूत करून तत्त्वांची जितकी संख्या स्वीकारली आहे, ते प्रतिपादन युक्तिसंगत असल्यामुळे आम्ही निश्चितपणे स्वीकारले आहे. (९)


    म्या सांगितली तैशी जाण । तत्त्वसंख्या अधिकन्यून ।
    व्हावया हेंचि कारण । वक्त्याची ज्ञानविवक्षा ॥ ८८ ॥
    तत्त्वांची संख्या मी सांगितल्याप्रमाणे कमजास्ती होण्याला सांगणाराची ज्ञानविवक्षा म्ह• इच्छाच कारणीभूत होते ८८.


    जैसें ज्यासी असे ज्ञान । जैसा ईप्सित मताभिमान ।
    तैसतैसें तत्त्वव्याख्यान । ऋषीश्वर जाण बोलती ॥ ८९ ॥
    ज्याचे जसें ज्ञान असते, ज्याला जसा इष्ट मताचा अभिमान असतो, त्या त्याप्रमाणे ते महर्षि बोलत असतात ८९.


    जो बोले ज्या मतयुक्ती । तें तें घडे त्या मतसंमतीं ।
    हें मी जाणें सर्वज्ञ श्रीपती । यालागीं त्या युक्ती मीही मानीं ॥ ९० ॥
    त्याकरितां जो ज्या मताला अनुसरून बोलतो, ते त्याच्या मताप्रमाणे बरोबरच असते. हे मी सर्वज्ञ श्रीहरि जाणतों. त्यामुळे त्यांचेही म्हणणे मी मान्यच करतों ९०.


    जें बोलिले ऋषीजन । सव्वीस तत्त्वें विवंचून ।
    उद्धवा तुज मी सांगेन । सावधान अवधारीं ॥ ९१ ॥
    आतां उद्धवा ! ऋषींनी जी सव्वीस तत्त्वे निवडून काढून सांगितली आहेत, तीही तुला सांगतो, ती लक्ष देऊन ऐक ९१.


    अनाद्यविद्यायुक्तस्य पुरुषस्यात्मवेदनम् ।
    स्वतो न स्म्भवादन्यस्तत्त्वज्ञो ज्ञानदो भवेत् ॥ १० ॥
    [श्लोक १०] जीव अनादी कालापासून अविद्येने युक्त असल्यामुळे तो स्वतःच स्वतःला जाणू शकत नाही म्हणून त्याला आत्मज्ञान करून देण्यासाठी दुसर्‍या सर्वज्ञाची आवश्यकता आहे अशा रीतीने प्रकृतीची चोवीस तत्त्वे, पुरूष आणि ईश्वर अशी ही सव्वीस तत्त्वे आहेत. (१०)


    प्रकृतिपुरुषमहत्तत्त्व येथें । अहंकार आणि महाभूतें ।
    इंद्रियें विषयसमेतें । यें तत्त्वें निश्चितें पंचवीस ॥ ९२ ॥
    त्यांत प्रकृति, पुरुष, महत्तत्त्व व अहंकार आणि पंच महाभूते; पांच विषयांसहवर्तमान अकरा इंद्रियें ; मिळून पंचवीस तत्वे होतात ९२.


    येथ पुरुषाहोनिया भिन्न । जीव वेगळा करूनि जाण ।
    तत्त्वसंख्यालक्षण । केलीं संपूर्ण सव्वीस ॥ ९३ ॥
    यांत ईश्वराहून जीव भिन्न आहे असे समजून तो वेगळा काढला तर हीच तत्त्वं सव्वीस होतात ९३.


    जीवाच्या भिन्नत्वाचें कारण । अनादि अविद्येस्तव जाण ।
    घेऊनि ठेला देहाभिमान । कर्मबंधन दृढ झालें ॥ ९४ ॥
    अनादिकालापासून जी अविद्या चालत आली आहे; तेंच जीवाच्या भिन्नत्वाचे कारण आहे. त्यामुळेच तो देहाभिमान घेऊन बसतो; आणि कर्माचे बंधन दृढ होते ९४.


    अहंकर्तेपणाचा खटाटोप । तेणें अंगीं आदळे पुण्यपाप ।
    विसरला निजरूप । विषयलोलुप्य वाढवितां ॥ ९५ ॥
    कर्तेपणाच्या अहंकाराने उपदव्याप करीत असतो, यामुळे पापपुण्य येऊन माथ्यावर बसते. आणि विषयाचा लोभ वाढविता वाढविता आत्मस्वरूपच विसरून जातो ९५.


    लागलें बद्धतेचें बंधन । न करवे कर्मपाशच्छेदन ।
    त्याच्या उद्धारालागीं जाण । ज्ञानदाता सर्वज्ञ ईश्वर ॥ ९६ ॥
    बद्धतेचे बंधन पाठीला लागल्यामुळे कर्मपाश तोडता येत नाहीत. म्हणून त्याच्या उद्धारासाठी ज्ञानदात्या सर्वज्ञ ईश्वराची गरज असते ९६.


    गुरुद्वारा पाविजे ज्ञान । तेथें ईश्वराचा आभार कोण ।
    येथ ईश्वरकृपेवीण । सद्‌गुरु जाण भेटेना ॥ ९७ ॥
    परंतु 'गुरूपासून जर ज्ञानप्राप्ति होते, तर तेथे ईश्वराचे आभार कसले 'अथवा कारण तरी काय ?' असे म्हणशील तर सांगतों की, ईश्वरकृपेशिवाय सद्गुरुही  भेटत नाहीं ९७.


    झालिया सद्‌गुरुप्राप्ती । ईश्वरकृपेवीण न घडे भक्ती ।
    सद्‌गुरु तोचि ईश्वरमूर्ती । वेदशास्त्रार्थी संमत ॥ ९८ ॥
    तसेंच सद्गुरूची प्राप्ति झाली तरी, ईश्वरकृपेशिवाय त्याची भक्ति घडत नाही. सद्गुरु तोच ईश्वरमूर्ति ही गोष्ट वेदशास्त्रार्थालाही संमत आहे ९८.


    गुरु-ईश्वरां भिन्नपण । ऐसें देखे तो नागवला आपण ।
    एवं ईश्वरानुग्रहें जाण । ज्ञानसंपन्न होय जीवु ॥ ९९ ॥
    गुरूमध्ये आणि ईश्वरामध्ये मितपणा मानील तो बुडालाच म्हणून समजावे. तात्पर्य, ईश्वराच्या अनुग्रहानेंच जीव ज्ञानसंपच होतो ९९.


    गुरूंनी सांगितली ज्ञानस्थिती । ते ईश्वरकृपेवीण चित्तीं ।
    ठसावेना साधकांप्रती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ १०० ॥
    आणखी उद्धवा ! गुरु ज्ञानाचे स्वरूप सांगितलें तरी तें  ईश्वराच्या कृपेशिवाय मनात ठसत नाही, हे तू लक्षांत ठेव १००. 

    एकनाथी भागवत

    एकनाथी भागवत अध्याय १ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ६ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ८ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १६ अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय विसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २८ अर्थासहित अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३१ अर्थासहित

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा
    Loading...