मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १८ ओव्या २०१ ते ३००

    करितां प्रश्नसमाधान । लौकिकीं वाढेल सन्मान ।

    यालागीं साक्षेपें जाण । उन्मत्त वचन स्वयें बोले ॥ १ ॥
    प्रश्नाचे समाधान करूं लागले तर, लोकांमध्ये आपला मानसन्मान वाढेल, म्हणून मुद्दामच उन्मत्तासारखें बोलत असतो १.


    वेदतत्त्वार्थ विहित जाणे । तें लौकिकीं नाहीं मिरवणें ।
    सकळिकीं मूर्खाचि म्हणणें । तैशीं `पशु' लक्षणें स्वयें दावी ॥ २ ॥
    वेदातील रहस्य व विहित शास्त्रार्थ तो जाणून असतो; पण त्याचा लोकांमध्ये डौल मिरवीत नाही. इतकेच नव्हे, तर सर्वांनी आपल्याला मुर्खच म्हणावे म्हणून स्वत: पशुतुल्यता दाखवितो २.


    यालागीं वेदवादसंवाद । न करी वाद अतिवाद ।
    येचि अर्थीं अतिविशद । स्वयें गोविंद सांगत ॥ ३ ॥
    याकरितां तो वेदवाद-संवाद-विवाद काही करीत नाही; किंवा वितंडवादही घालीत नाही. हीच गोष्ट श्रीकृष्ण स्वत:च स्पष्ट करून सांगतात ३.


    वेदवादरतो न स्यान्न पाषण्डी न हैतुकः ।
    शुष्कवादविवादे न कञ्चित्पक्षं समाश्रयेत् ॥ ३० ॥
    [श्लोक ३०] त्याने वेदाविषयी ऊहापोह करू नये, पाखंडी नसावे, तर्कवितर्क करू नये आणि कोरड्या वादविवादात कोणाचीही बाजू घेऊ नये. (३०)


    धरोनियां मीमांसकमत । कर्मकांडींचे शास्त्रार्थ ।
    नानावाद कर्मार्थ । न करी निश्चित निजबोधें ॥ ४ ॥
    तो निजबोधानें पक्का असल्यामुळे मीमांसकांचे मत जमेस धरून कर्मकांडांतील शास्त्रार्थ, किंवा कर्मविषयींचे नाना प्रकारचे वादविवाद तो करीत नाही ४.


    तार्किकाचे अतितर्क । तर्क वितर्क कुतर्क ।
    हेही वाद करीना देख । निजात्मसूख जो जाणे ॥ ५ ॥
    ज्याला आत्मानंदाचा अनुभव आलेला असतो, तो तर्कशास्त्राप्रमाणे तर्क, वितर्क, किंवा कुतर्क काढून वाद करीत नाही ५.


    बाहेरी ब्रह्मज्ञानें गर्जे तोंड । भीतरीं विषयवासना उदंड ।
    ऐसे महावादी प्रचंड । अतर्क `पाखंड' त्या नाव ॥ ६ ॥
    बाहेर तोंडाने ब्रह्मज्ञान गर्जत असतो, आणि आंत प्रचंड विषयावासना भरलेली असते. असे जे प्रख्यात वितंडवादी असतात तेच अस्सल 'पाखांडी' होत ६.


    नसोनि ब्रह्मानुभव साचार । जो उच्छेदी निजाचार ।
    तो केवळ पाखंडी नर । उदरंभर दुःशील ॥ ७ ॥
    खरोखर ब्रह्माचा अनुभव नसतां जो पुरुष आपला आचार टाकून देतो, तो शुद्ध पाखांडी, पोटभरू, दुष्टस्वभावी मनुष्य समजावा ७. 


    ऐशिया वादाचा विटाळ । ज्याचे वाचेसी नाहीं अळुमाळ ।
    न लगे असत्याचा समूळ मळ । नित्य निर्मळ निजबोधें ॥ ८ ॥
    ज्याच्या वाणीला अशा प्रकारच्या वादाचा लवमात्रही विटाळ नाही, असल्याचा यत्किंचितही मळ खपत नाही, तोच आत्मज्ञानाने नित्य निर्मळ असतो ८.


    `शुष्कवाद' ज्या वृथा गोष्टी । त्यांतही वाग्वाद उठी ।
    होय नव्हे कपाळपिटी । मिथ्या चावटी करीना ॥ ९ ॥
    'शुष्कवाद' म्ह. निरर्थक गोष्टी, यांतसुद्धा वाद उत्पन्न होतोच. याकरितां होयनव्हे, अशी कपाळपिटी करून व्यर्थ बडबड करीत नाही ९; 


    ऐशिया विवादाची कथा । दृष्टीं न पाहे निजज्ञाता ।
    मा स्वयें करील ऐशा वार्ता । हें सर्वथा घडेना ॥ २१० ॥
    तो खरोखर आत्मज्ञानी असतो; त्याला असल्या वादविवादाची गोष्ट दृष्टीपुढेसुद्धा नको असते; मग तो स्वतः तसल्या गोष्टी करील हे तर कधीच घडावयाचे नाही २१०.


    होतां शास्त्रार्थमहावाद । देतां युक्तीचे प्रतिबाध ।
    तेथ न करी पक्षपात शुद्ध । जाणे परी शब्द बोलेना ॥ ११ ॥
    शास्त्रार्थांचा मोठा वाद जरी होत असला आणि युक्तीने व प्रमाणाने जरी उत्तरें प्रत्युत्तरें चालली असली, तरी कोणताही पक्ष उचलीत नाही. खरे काय ते त्याला माहीत असते; पण तो मुळी बोलतच नाही ११.


    श्रुतिस्मृतींसीं विरूद्ध । होतां देखे अतिवाद ।
    स्वयें जाणे शास्त्रार्थ शुद्ध । परी पक्षपात करीना ॥ १२ ॥
    श्रुतिस्मृतींना विरुद्ध असा वितंडवाद चालतांना पाहिला, व खरा आणि शुद्ध शास्त्रार्थ कोणता हे माहीत असले, तरी कोणताच पक्ष उचलीत नाही १२.


    वाग्वादीं बोलतां जाण । दुखवेल पुढिलांचें मन ।
    कां क्षोभेल स्वांतःकरण । यालागीं वचन बोलेना ॥ १३ ॥
    वादविवादांत बोलतां बोलतां  दुसऱ्यांचे मन दुखेल, किंवा आपल्याच अंतःकरणाला क्रोध उत्पन्न होईल म्हणून तो शब्दच बोलत नाही १३.


    नोद्विजेत जनाद्धीरो जनं चोद्वेजयेन्न तु ।
    अतिवादांस्तितिक्षेत नाममन्येत कञ्चन ॥ ३१ ॥
    [श्लोक ३१] त्याने धैर्यवान असावे त्यामुळे कोणाचाही त्याला त्रास वाटणार नाही आणि तोही कोणाला त्रास देणार नाही एखाद्याने त्याची निंदा केली तरी त्याने ती प्रसन्न मनाने सहन करावी, कोणाचाही अपमान करू नये एखाद्या पशूप्रमाणे आपल्या शरीरासाठी कोणाशीही वैर करू नये. (३१)


    जनापासोनि उद्वेगगती । ज्ञाता न पवे सर्वथा चित्तीं ।
    निंदा अवगणना अपमानिती । ते आत्मस्थितीं स्वयें साहे ॥ १४ ॥
    लोकांपासून ज्ञाता मनामध्ये उद्वेग मुळीच पावत नाही. कोणी निंदा करतात, कोणी तिरस्कार करतात, कोणी अपमान करतात, तरी आत्मस्थितीने स्वतः सहन करतो १४.


    जन जे जे उपद्रव देती । ज्ञाता साहे ऐशिया रीतीं ।
    मीचि आत्मा एक सर्व भूतीं । यालागीं खंती मानीना ॥ १५ ॥
    लोक जे जे म्हणून उपद्रव देतात, ते ज्ञाता अशा रीतीने सर्व सहन करतो. कारण प्राणिमात्रामध्ये आपणच आत्मा भरलेला आहे, अशी त्याची भावना असल्यामुळे त्याला त्याची खंती वाटत नाही १५.


    आपुलिया अवयवविकारता । उद्वेग नुपजें जेवीं चित्ता ।
    तेवीं सर्वांभूतीं एकात्मता । जाणून तत्त्वतां उबगु न मनी ॥ १६ ॥
    आपल्या अवयवाकडून काही प्रमाद झाला, तर त्याबद्दल चित्ताला जसा उद्वेग वाटत नाही, त्याप्रमाणे सर्व प्राणिमात्रांमध्ये एकात्मतेचीच भावना असल्यामुळे तो त्याबद्दल खरोखर खेद मानीत नाही १६.


    तैसेंचि ज्याचिया स्थितीं । भूतें उद्वेग न मानिती ।
    ज्याचिया निजाचारगतीं । सुखी होती जीवमात्र ॥ १७ ॥
    तसेंच याच्या संसर्गापासून प्राणिमात्रांनाही उद्वेग प्राप्त होत नाही. त्याच्या वागणुकीने जीवमात्रांना सुखच होते १७.


    सर्व भूतीं भगवंत आहे । झणें त्यासी उपद्रव होये ।
    यालागीं वागवितां हातपाये । सावध राहे निजदृष्टीं ॥ १८ ॥
    सर्व प्राणिमात्रांमध्ये भगवंतच राहात असल्याने, न जाणों त्याला कदाचित् उपद्रव होईल, म्हणून हात-पाय हालवितांना तो आत्मदृष्टीने फार सावध असतो १८, 


    थोर देतां आरोळी । झणें दचकेल वनमाळी ।
    कां नेटें भवंडितां जपमाळी । देवाचे कपाळीं झणें लागे ॥ १९ ॥
    मोठ्याने हाक मारली तर कदाचित भगवान्  दचकेल किंवा जपाची माळ जोराने फिरविली तर कदाचित् देवाच्या कपाळावर बसेल १९.


    यालागीं करचरणांच्या चेष्टा । आवरोनियां निजात्मनिष्ठा ।
    भूतीं लागों नेदी झटा । झणें वैकुंठा उपद्रव लागे ॥ २२० ॥
    म्हणून हातापायांच्या चेष्टा निजात्मनिष्ठेने आवरून, न जाणो देवालाच पीडा होईल म्हणून प्राण्याला धक्का लागू देत नाही २२०.


    ऐसिऐशिया निजात्मगती । उद्वेग उपजों नेदी भूतीं ।
    तेथ वाग्वादाची गती । कैशा रीतीं संभवे ॥ २१ ॥
    अशा अशा निजात्मकल्पनेने प्राणिमात्रांना दुःख होऊ देत नाही. तेव्हां वाग्वाद-तंट्याचा आरंभ तरी त्याच्याकडून कसा संभवणार ? २१.


    सर्वभूतीं भूतात्म ईश्वर । यालागीं उंच न बोले उत्तर ।
    तेथ अतिवाद्यासी समोर । सर्वथा अधर उचलीना ॥ २२ ॥
    भूतात्मा सर्व भूतांमध्ये भरलेला आहे, हे लक्षात आणून तो मोठ्याने भाषणसुद्धा करीत नाही. तर मग वितंडवाद्यासमोर तो तोंड  कसा उघडील ? २२.


    पडल्या जीवसंकट प्राणांतीं । अपमान न करावे कोणे व्यक्ती ।
    अपमानीना भूताकृती । सर्वांभूतीं हरी देखे ॥ २३ ॥
    जीवावरचे संकट आले, प्राणांवर येऊन बेतले, तरी त्याला कोणत्याही व्यक्तीचा अपमान करवत नाही; कोणत्याही जीवाची आकृति असो, तिचा अपमान करावयाचाच नाहीं; कारण सर्व प्राणिमात्रांमध्ये श्रीहरिच असलेला त्याला दिसत असतो २३.


    जनास्तव उद्वेगता । कदाकाळीं न पवे ज्ञाता ।
    ज्ञात्यापासोनि उद्वेगता । नव्हे सर्वथा जनासी ॥ २४ ॥
    जनापासून उद्वेग असा ज्ञात्याला कधीच वाटत नाही व ज्ञात्यापासून जनालाही कधी उद्वेग प्राप्त होत नाही २४.


    ऐशी निजात्मस्थिती साचार । तो कोणासीं न करी वैर ।
    येचि अर्थीं शारंगधर । विशद उत्तर सांगत ॥ २५ ॥
    अशीच खरोखर ज्याची आत्मस्थिति असते, तो कोणाशीही वैर करीत नाही. याच अर्थाचे स्पष्ट भाषण श्रीकृष्ण सांगतात २५.


    देहमुद्दिश्य पशुवद् वैरं कुर्यात्र केनाचित् ।
    एक एवपरो ह्यात्मा भूतेष्वात्मन्यवस्थितः ॥ ३२ ॥
    [ श्लोक ३२ ] पाण्याने भरलेल्या वेगवेगळ्या पात्रांमध्ये एकच चंद्र जसा वेगवेगळा दिसतो, त्याचप्रमाणे एकच परमात्मा सर्व प्राण्यांमध्ये आणि आपल्यातही राहिलेला आहे सर्वांचा आत्मा एकच आहे आणि सर्व प्राण्यांची शरीरेसुद्धा एकाच समान तत्त्वांनी बनलेली आहेत म्हणून त्यांमध्ये मूलद्रव्यसुद्धा एकच आहे, असा विचार करावा. (३२)


    केवळ पशूचियापरी । हो‍ऊनियां देह‍अहंकारी ।
    कोणासी वैर न करी । तेही परी परीयेंसी ॥ २६ ॥
    - केवळ पशूसारखा देहाचा अहंकारी होऊन तो कोणाशीही वैर करीत नाही. त्याचाही प्रकार ऐक २६.


    प्रकृति-पर चिदात्मा आहे । तोचि सर्वांभूतीं भूतात्मा पाहे ।
    मजमाजींही तोचि राहे । ऐशी सर्व भूतीं एकात्मता जो ॥ २७ ॥
    ज्ञानस्वरूप आत्मा हा प्रकृतीच्या पलीकडे असतो; तोच सर्व प्राणिमात्रांचा आत्मा असून माझ्यामध्येही तोच राहातो, अशा समजुतीने जो एकात्मता वाहतो २७.


    त्यासी कोण आप्त कोण इतर । कोणासी करावें वैर ।
    सर्व भूतीं मीचि साचार । निरंतर निजात्मा ॥ २८ ॥
    खरोखर माझंच आत्मस्वरूप जर सर्व प्राणिमात्रांमध्ये भरलेलें आहे, तर त्याला आत कोण, आणि इतर कोण ? आणि वैर तरी कोणाशी करावयाचे ? २८.


    एक आत्मा सर्व भूतांत । येचि अर्थींचा दृष्टांत ।
    स्वयें सांगे श्रीकृष्णनाथ । श्रोता सावचित्त उद्धव ॥ २९ ॥
    सर्व प्राणिमात्रांमध्ये एकच आत्मा कसा आहे, याच अर्थाचा दृष्टांत स्वतः श्रीकृष्ण सांगत आहेत आणि उद्धव हा श्रोता सावध चित्ताने श्रवण करीत आहे २९.


    यथेन्दुरुदपात्रेषु भूतान्येकात्मकानि च ।
    अलब्ध्वा न विषीदेत काले कालेऽऽशनं क्वचित् ।
    लब्ध्वा न हृष्येद्धृतिमानुभयं दैवतंत्रितम् ॥ ३३ ॥
    [लोक ३३] संन्याशाने एखादे दिवशी भोजन मिळाले नाही तरी दुःखी होऊ नये किंवा मिळाले तरी हर्ष मानू नये त्याने धैर्य धरून भोजन मिळणे अगर न मिळणे हे प्रारब्धाच्या अधीन आहे, असे समजावे. (३३)


    सहस्त्र घटीं भरल्या जळ । बिंबे एकचि चंद्रमंडळ ।
    तेवीं निजात्मा एक केवळ । भूतीं सकळ भूतात्मा ॥ २३० ॥
    हजार घागरीमध्ये पाणी भरलेले असले तरी त्या प्रत्येकीमध्ये एकाच चंद्राचे प्रतिबिंब पडते त्याप्रमाणें  सर्व प्राणिमात्रांत एकच आत्मा भरलेला आहे २३०.


    देखे भूताकृति ज्या भिन्न । त्याही परमकारणीं अभिन्न ।
    जेवीं अळंकारीं सुवर्ण । आकारींहीं जाण भिन्नत्वं नाहीं ॥ ३१ ॥
    प्राण्यांच्या आकृति भिन्न भिन्न दिसतात, पण मूळ मायेच्या ठिकाणी त्या साऱ्या एकच आहेत. ज्याप्रमाणे अलंकारांतील आकारामुळे  सुवर्णा मध्ये भेद नसतो ३१.


    जेवीं मृत्तिकेचीं गोकुळें केलीं । नानाकारीं पूज्य झालीं ।
    परी ते मृतिकाचि संचली । तेवीं भूतें भासलीं भगवंतीं ॥ ३२ ॥
    किंवा मातीची गोकुळे केली, तर ती (नंद, यशोदा, कृष्ण इ.) निरनिराळ्या आकारांनी पूजेला पात्र होतात, पण ती सारी मातीच भरलेली असते. त्याप्रमाणेच भगवंतामध्येही प्राण्यांचा भास होतो ३२.


    का विणोनियां सुतें सुत । शेला परकळा पातळ म्हणत ।
    तैशी वस्तूचि वस्तुत्वें येथ । साकार भासत भवरूपें ॥ ३३ ॥
    किंवा सुतांत सूत विणून वस्त्र केलें म्हणजे त्याला शेला, दुपेटा, पातळ, इत्यादि म्हणतात. त्याप्रमाणे येथे ब्रह्मच संसाराच्या रूपाने साकार भासत असते ३३.


    एवं साकार निराकार । उभयतां ब्रह्मचि साचार ।
    ऐसा ज्याचा ज्ञाननिर्धार । त्याचा `आहार' तूं ऐक ॥ ३४ ॥
    ह्याप्रमाणे साकार काय आणि निराकार काय, खरोखर दोन्ही ब्रह्मच. असा ज्याच्या ज्ञानाचा निर्धार असतो, त्याचा आहार तूं ऐक ३४.


    आहार न मिळे जिये काळीं । दुःखी नव्हे तिये वेळीं ।
    अन्नालागीं न तळमळी । धारणाबळीं बलिष्ठ ॥ ३५ ॥
    ज्या वेळेला काही खावयास मिळत नाही, त्या वेळेसही तो दुःखी होत नाही. तो अन्नासाठी तळमळ करीत नाही. इतका त्याचा मनोनिग्रह बळकट असतो ३५.


    आहार मिळाल्या उत्तम । हरिखेजेना मनोधर्म ।
    दैवाधीन जाणे वर्म । निजकर्मप्राप्तीसी ॥ ३६ ॥
    बरें; उत्तम आहार मिळाला म्हणून त्याच्या मनाला हर्षही पण नाही. कारण आपल्या कर्माप्रमाणे सर्व गोष्टी असतात हे वर्म त्याला माहीत असते ३६.


    एवं प्राप्ताप्राप्ताची कथा । जाणे दैवाधीन तत्त्वता ।
    यालागीं हर्षविषादता । त्याचे चित्ता स्पर्शेना ॥ ३७ ॥
    तात्पर्य, मिळणे किंवा न मिळणे हे खरोखर दैवाधीन आहे हें  तो जाणून असतो. म्हणून सुख किंवा दुःख त्याच्या चित्ताला शिवतच नाही ३७.


    दैवाधीन प्राप्ती प्राणियांसी । ऐसे सत्य कळलें ज्यासी ।
    तैं भिक्षेसी कां हिंडणें म्हणसी । तेंचि हृषीकेशी सांगत ॥ ३८ ॥
    प्राण्याला लाभ होणे तो दैवानुसारच होत असतो, असें जर त्याला निश्चयेंकरून कळलेले असते, तर मग तो भिक्षेसाठी तरी कां हिंडतो? असें म्हणाल तर तेच श्रीकृष्ण सांगतात ३८.


    आहारार्थं समीहेत युक्तं तत्प्राणधारणम् ।
    तत्त्वं विमृश्यते तेन तद्विजाय विमुच्यते ॥ ३४ ॥
    [श्लोक ३४ ] भिक्षेसाठी प्रयत्‍न करणे योग्यच आहे कारण त्यामुळेच प्राण्यांचे रक्षण होते प्राण वाचले तरच तत्त्वाचा विचार करता येईल आणि तत्त्वविचाराने तत्त्वज्ञान होऊन मुक्ती मिळेल. (३४)


    पाळावया आश्रमधर्मासी । अवश्य हिंडावें भिक्षेसी ।
    मधुकरी संन्याशांसी । स्वधर्मासी अतिविहित ॥ ३९ ॥
    आश्रमधर्म पाळण्यासाठी भिक्षेला अवश्य फिरावें. संन्याशाच्या धर्माला मधुकरी ही अत्यंत योग्य आहे ३९.


    साधकां तरी आहारार्थ । अवश्य हिंडावें लागे येथ ।
    आहारेंवीण त्यांचें चित्त । विक्षेपभूत हों पाहे ॥ २४० ॥
    साधकांनासुद्धा आहारासाठी अवश्य हिंडावे लागते. कारण, आहाराशिवाय त्यांचे चित्त चंचळ होऊ लागते २४०.


    तिंहीं रसासक्ति सांडून । भिक्षेसी करावा प्रयत्न ।
    आहारेंवीण त्यांचें मन । अतिक्षीण सर्वार्थीं ॥ ४१ ॥
    त्यांनी गोडपणाची आसक्ति सोडून भिक्षेचा प्रयत्न करावा. कारण आहाराशिवाय त्यांचे मन सर्वाधी क्षीणच होत असते ४१.


    साधकांसी आहारेंवीण । न संभवे श्रवण मनन ।
    न करवे ध्यान चिंतन । अनुसंधान राहेना ॥ ४२ ॥
    आहाराशिवाय साधकांना श्रवण-मनन घडू शकत नाहीं; ध्यान-चिंतन करवत नाही व अनुसंधानही टिकत नाही ४२.


    संन्याशांसी ध्यान न घडे । तैं आश्रमधर्माचें तारूं बुडे ।
    यालागीं भिक्षेसी रोकडें । हिंडणें घडे हितार्थ ॥ ४३ ॥
    संन्याशाला जर ध्यान घडले नाही, तर त्याच्या आश्रमधर्माचें तारूं बुडून जाते. म्हणून आपल्या हिताकरितांच त्याला भिक्षेला जाणे भाग पडते ४३.


    मिळावें मिष्टान्न गोड । हे सांडूनि रसनाचाड ।
    करावें भिक्षेचें कोड । परमार्थ दृढ साधावया ॥ ४४ ॥
    गोड मिष्टान्न मिळावे अशी जिभेची गोडी न धरतां परमार्थ साधण्यासाठी भिक्षेचीच आवड धरावी ४४.


    आहार घेतलिया जाण । साधकांसी घडे साधन ।
    साधन करितां प्रकटे ज्ञान । ज्ञानास्तव जाण निजमोक्ष लाभे ॥ ४५ ॥
    आहार सेवन केला असतां साधकाला साधन घडते; साधन घडले म्हणजे ज्ञानप्राप्ति होते आणि ज्ञानप्राप्तीने मोक्षाचा लाभ होतो ४५.


    सर्वथा न वांछावें मिष्टान्न । तरी भिक्षा मागावी कोण ।
    ऐसें कांहीं कल्पील मन । तेंचि श्रीकृष्ण सांगत ॥ ४६ ॥
    मिष्टान्नाची तर कधीच इच्छा करूं नये. मग भिक्षा तरी कशाची मागावी? असें कांहीं मनांत येईल, तर तेच श्रीकृष्ण सांगतात ४६.


    यदृच्छयोपपन्नान्नमद्याच्छ्रेष्ठमुताऽपरम् ।
    तथा वासस्तथा शय्यां प्राप्तं प्राप्तं भजेन्मुनिः ॥ ३५ ॥
    [श्लोक ३५] संन्याशाने प्रारब्धानुसार चांगले अगर वाईट, भिक्षान्न मिळेल, तेच खावे वस्त्र आणि अंथरूणपांघरूणसुद्धा जे मिळेल, त्यावरच काम भागवावे. (३५)


    सहज भिक्षेसी आलें जाण । शुष्क अथवा मिष्टान्न ।
    तेणें करावें प्राणधारण । रसनालालन सांडोनि ॥ ४७ ॥
    रुक्ष किंवा मिष्टान्न सहजी जे मिळेल, त्यानेच प्राणधारण करावें. जिव्हेची लालूच सोडून द्यावी ४७.


    निद्रालस्याचें न ये प्रस्थान । तैसें करावें प्राणधारण ।
    दृढ ठसावें आसनध्यान । `युक्ताहार' जाण या नांव ॥ ४८ ॥
    निद्रा किंवा आळस ह्यांचे ठाणे न बसेल अशा रीतीने प्राणधारण करावें. आसन किंवा ध्यान नीट रीतीने ठसेल अशा रीतीने खाणे, त्याचेच नांव 'युक्ताहार' ४८.


    वल्कल अथवा अजिन । नवें अथवा वस्त्र जीर्ण ।
    सहजें प्राप्त झाल्या जाण । करी प्रावरण यथासुखें ॥ ४९ ॥
    झाडाची साल अथवा मृगचर्म, नवे किंवा जुने वस्त्र, सहजी जे मिळेल, ते आनंदाने पांघरावें ४९.


    कंथा हो कां मृदु आस्तरण । तृणशय्या कां भूमिशयन ।
    स्वभावें प्राप्त झाल्या जाण । तेथही शयन करी मुनि ॥ २५० ॥
    गोधडी किंवा मऊ हांतरूण, गवताचा थर किंवा जमीन, जे काय सहज मिळेल, त्यावरच मुनि शयन करतात २५०.


    मी एक भोक्ता शयनकर्ता । हेही नाहीं त्यासी अहंता ।
    स्नानादि कर्मीं वर्ततां । त्याची निरभिमानता हरि सांगे ॥ ५१ ॥
    मी एक भोक्ता किंवा शयनकर्ता आहे, ही अहंताही त्याला नसते. आतां, स्नानादिक कृत्यांमध्येही त्याची निरभिमानताच असते, तीच श्रीकृष्ण सांगतात ५१.


    शौचमाचमनं स्नानं न तु चोदनया चरेत् ।
    अन्यांश्च नियमान् ज्ञानी यथाहं लीलयेश्वरः ॥ ३६ ॥
    [श्लोक ३६] ज्ञानी पुरूषाने पावित्र्य, आचमन, स्नान किंवा इतर नियम शास्त्राची आज्ञा म्हणून पाळू नयेत मी ईश्वर सर्व कर्मे जशी लीलया करतो, तशी त्याने सहज जमल्यास करावीत. (३६)


    आचमन स्नान शौचाचार । करितां नव्हे विधिकिंकर ।
    कर्माभिमानाची मोडली थार । जैसा मी अवतार तैसा तो ॥ ५२ ॥
    आचमन, स्नान किंवा प्रातर्विधि वगैरे करतांना तो शास्त्रविधीचा किंकर बनून करीत नाही. कारण त्याच्या कर्माभिमानाचा थाराच मोडून गेलेला असतो. सारांश, मी जसा अवतारी, तसाच तोही होतो ५२.


    जैसा मी `लीलावतार' धरीं । अलिप्तपणें कर्में करीं ।
    तैसीचि जाण योग्याची परी । सर्व कर्माचारीं अलिप्त ॥ ५३ ॥
    मी जसा लीलेने अवतार धारण करून अलिप्तपणाने सर्व कर्मे करतो, त्याप्रमाणे योग्याचीही पद्धत असते. तोही सर्व कर्मे करतांना अलिप्तच असतो ५३.


    ज्यासी विधींचें भय नाहीं पोटीं । तो कर्में करावया कदा नुठी ।
    तेचि विखींची विशद गोठी । कृष्ण जगजेठी सांगता ॥ ५४ ॥
    ज्याच्या अंत:करणांत विधीचे भय नसते, तो कमें करावयाला कधी उठतच नाही. ह्याच विषयाचे रहस्य श्रीकृष्ण जगजेठी विशद करून सांगताहेत ५४.


    न हि तस्य विकल्पाख्या या च मद्वीक्षया हता ।
    आदेहान्तात्क्वचित्ख्यातिस्ततः संपद्यते मया ॥ ३७ ॥
    [श्लोक ३७] ज्ञानी पुरूष भगवंतांना सगळीकडे पाहातो म्हणून त्याची भेददृष्टी मावळलेली असते शरीर सुटण्यापूर्वी कदाचित अशी भेददृष्टी वाढली, तरीसुद्धा मरणानंतर तो मलाच येऊन मिळतो. (३७)


    कर्म करणें न करणें । ऐशिया संदेहाचें ठाणें ।
    पळालें माझेनि दर्शनें । संकल्पाचें जिणें निमालें ॥ ५५ ॥
    त्याला माझे दर्शन झाल्यामुळे, कर्म करणे किंवा न करणे अशा संशयाचे ठाणेच पळून जाते आणि संकल्पाचा प्राणच निघून जातो ५५.


    संकल्पु निमतांचि पोटीं । विराली लिंगदेहाची गांठी ।
    भेदाची हारपली त्रिपुटी । मी परमात्मा दिठीं देखतां ॥ ५६ ॥
    मला परमात्म्याला दृष्टीने पहातांच संकल्प मनातल्या मनांतच जिरून जातो; लिंगदेहाची गांठच सुटते आणि भेदाची त्रिपुटी लोपून जाते ५६.


    ज्यासी नाहीं भेदाचें भान । त्याचे देहाचें भरण पोषण ।
    स्नान-भोजन-शयन । गमनागमन केवीं घडे ॥ ५७ ॥
    ज्याला भेदाचेंच भान नाही, त्याच्या देहाचे पालनपोषण, स्नान, पान, खाणे, जेवणे, बसणे, जाणे, येणें  तरी कसें घडणार? ५७.


    जो जिणोनियां विकल्पभ्रांती । त्रिशुद्धिं मिसळला अद्वैंतीं ।
    त्याचे देहाची स्थितिगती । प्रारब्धाहातीं निश्चित ॥ ५८ ॥
    जो विकल्पाची भ्रांति जिंकून टाकून खरोखर अद्वैतस्वरूपांतच मिसळला, त्याच्या देहाची स्थिति व चलनवलन प्रारब्धाधीनच राहाते ५८.


    वृक्ष समूळ उपडलिया पाहें । परी सार्द्रता वृक्षीं राहे ।
    तांबूल खाऊनियां जाये । तरी अधरीं राहे सुरंगात ॥ ५९ ॥
    वृक्ष समूळ जरी उपडून पडला, तरी त्या वृक्षामध्ये ओलेपणा हा असतोच. विडा गिळून टाकला तरी तोंडाला लाली ही राहतेच ५९.


    हो कां कन्यादान केल्या पाहें । वरु कन्याही घेउनि जाये ।
    तरी उगा मान उरला राहे । रुसणें न जाये देहान्त ॥ २६० ॥
    किंवा कन्यादान करून दिलें, नवरा नवरीला घेऊनही गेला, तरी फुकटचा मान म्हणून शिल्लक असतो, आणि मरेपर्यत रुसणे आणि फुगणें कांहीं जात नाहीं! २६०,


    तैसा अभिमानाचेनि सळें । मी कर्मकर्ता म्हणवीं बळें ।
    ते अहंता निमे ज्ञानबळें । तरी शरीर चळे प्रारब्धें ॥ ६१ ॥
     त्याप्रमाणे अभिमानाच्यामुळे मी कर्मकर्ता असें बळेच म्हणवितो, ती अहंता ज्ञानाच्या बळाने नाहीशी होते. तथापि शरीर हे  प्रारब्धानें  चालतच असते ६१.


    कुलाल दंड भांडें घेऊनि जाये । पूर्वभवंडीं चक्र भंवत राहे ।
    तेवीं अभिमान गेलिया पाहें । देह वर्तताहे प्रारब्धें ॥ ६२ ॥
    कुंभार हा दांडा व मडके घेऊन जातो, तरी पहिल्या फिरविण्याने त्याचे चाक फिरतच असते. त्याप्रमाणे अभिमान नाहीसा झाला तरी, प्रारब्धाने देह चालतच असतो ६२.


    त्या देहाचें भरणपोषण । प्रारब्धचि करितें जाण ।
    ज्ञात्यासी प्रपंचाचे भान । सत्यत्वें जाण असेना ॥ ६३ ॥
    त्या देहाचे पालनपोषण प्रारब्धच करते हें  तूं लक्षांत ठेव. ज्ञात्याला खरोखर प्रपंचाचे भानच नसते ६३.


    जैशी मिथ्या छाया देहापाशीं । तैसें देह दिसे सज्ञानासी ।
    यालागीं देहबुद्धि त्यासी । सत्यत्वेंसीं उपजेना ॥ ६४ ॥
    देहाजवळ जशी मिथ्यारूप छाया असते, त्याप्रमाणे ज्ञात्याला देह दिसत असतो. म्हणूनच खरोखर त्याला 'देह हाच मी' अशी बुद्धि उत्पन्न होत नाही ६४.


    छाया सुखासनामाजीं बैसे । कां विष्ठेवरी पडली दिसे ।
    त्या छायेचे अभिमानवशें । सुखदुःख नसे पुरुषासी ॥ ६५ ॥
    छाया ही पालखीत बसली, किंवा ती विष्ठेवर पडलेली दिसली, तरी त्या छायेच्या अभिमानाने पुरुषाला काही त्याचे सुखदुःख होत नसते ६५.


    तेवीं देहाची ख्यातिविपत्ती । बाधीना सज्ञानाचे स्थितीं ।
    प्रारब्धक्षयाचे अंतीं । विदेह पावती कैवल्य ॥ ६६ ॥
    त्याप्रमाणे देहाचा मानापमान हा सज्ञानाच्या स्थितीला मुळीच बाधक होत नाही. शेवटीं प्रारब्धाचा क्षय झाला म्हणजे ते विदेहमोक्ष पावतात ६६.


    जैशी जळाची लहरी । निश्चळ होय सागरीं ।
    तैसा ज्ञाता मजमाझारीं । विदेह करी समरसें ॥ ६७ ॥
    पाण्याची लाट जशी समुद्रामध्ये स्थिर होते (मिसळून जाते) त्याप्रमाणे ज्ञाता माझ्यामध्येच विदेहपणाने समरसून जातो ६७.


    उगम संगम प्रवाहगती । सरितांची नामरूपख्याती ।
    जेवीं प्रळयोदकीं हारपती । तेवीं समरसती मजमाजीं ज्ञाते ॥ ६८ ॥
    उगम-संगम-प्रवाह असतो, तोपर्यंतच नदीच्या नामरूपाची ख्याति असते; पण ती साराच जलप्रलय झाला की आटपते. त्याप्रमाणेच ज्ञाते माझ्यामध्ये एकरूप होऊन जातात ६८.


    अपरोक्ष साक्षात्कार संन्यासी । त्याची स्थितिगति स्वधर्मेंसीं ।
    उद्धवा सांगितली तुजपाशीं । आता मुमुक्षु संन्यासी ते ऐक ॥ ६९ ॥
    उद्धवा ! ब्रह्मसाक्षात्कार घडलेले संन्यासी कसे असतात व त्यांची स्वधर्माची रीतभात कशी असते, ती मी तुला सांगितली. आतां मुमुक्षु संन्यासी कसे असतात तें ऐक ६९.


    दुःखोदर्केषु कामेषु जातनिर्वेद आत्मवान् ।
    अजिज्ञासितमद्धर्मो गुरुं मुनिमुपाव्रजेत् ॥ ३८ ॥
    [श्लोक ३८] जितेंद्रिय पुरूषाचा जेव्हा असा निश्चय होतो की, विषयांच्या भोगांचे फळ दुःखच आहे, तेव्हा त्याने विरक्त व्हावे आणि माझ्या प्राप्तीचे साधन त्याला माहीत नसेल तर ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंना त्याने शरण जावे. (३८)


    शेंडा धरूनि समूळ । ज्याचें उत्तरोत्तर दुःख फळ ।
    अतिबाधक विषयजाळ । त्यासी केवळ जो अनासक्त ॥ २७० ॥
    शेंड्यापासून बुडख्यापर्यंत ज्याची फळे उत्तरोत्तर दुःखदायक; अशा अत्यंत बाधक विषयजाळासंबंधाने जो निखालस अनासक्त २७०,


    माझे प्राप्तीलागीं चित्त । सदा ज्याचें आर्तभूत ।
    स्वधर्मकर्मीं वर्तत । जो वेदशास्त्रार्थ विवंची ॥ ७१ ॥
      माझ्या प्राप्तीसाठी ज्याचे चित्त सदा उत्सुक; जो स्वधर्मकर्मानेच राहणार आणि वेदशास्त्रार्थाचा विचार करणारा ७१, 


    इहामुत्रभोगीं निश्चित । त्रासलें असे ज्याचें चित्त ।
    ऐसा जो कां नित्य विरक्त । अतिविख्यात मुमुक्षु ॥ ७२ ॥
    ऐहिक व पारलौकिक सुखाविषयीं ज्याचे चित्त खरोखर त्रासलेलें; असा जो नित्य विरक्त व अत्यंत मुमुक्षु असेल ७२, 


    तेणें साधवया ब्रह्मज्ञान । तेचि साधनीं लावितां मन ।
    स्वकर्म झालिया विलक्षण । आली नागवण प्रत्यवायें ॥ ७३ ॥
    त्याने ब्रह्मज्ञान साधण्यासाठी तिकडेच मन लावले, आणि त्याचे स्वधर्मकर्म जर विपरीत झाले, तर त्या दोषामुळेच त्याची नागवण होते ७३.


    तेणें कर्म संन्यासोनि जाण । करावें संन्यासग्रहण ।
    सद्‍गुरूसी रिघावें शरण । तेणें ब्रह्मज्ञानपदप्राप्ती ॥ ७४ ॥
    त्याकरिता त्याने विधिपूर्वक कर्माचा त्याग करून संन्यास ग्रहण करावा आणि सद्गुरूला शरण जावे, म्हणजे त्याला श्रेष्ठ ब्रह्मज्ञानाची प्राप्ति होईल ७४.


    एक केवळ भावार्थीं । नेणे स्वधर्मकर्मगती ।
    नेणे शास्त्रश्रवणव्युत्पत्ती । परी माझी प्रीती अनिवार ॥ ७५ ॥
    पण कित्येक लोक केवळ भावार्थी असतात. त्यांना स्वधर्मकर्माचे प्रकार कळत नाहीत, शास्त्रश्रवण वगैरेही माहीत नसते. परंतु माझ्यावर प्रेम असते तें मात्र अलोट असते ७५.


    तेणेंही संन्यासूनि जाण । गुरूसी रिघावें शरण ।
    त्यासीही गुरुकृपा जाण । ब्रह्मज्ञान‍अवाप्ति ॥ ७६ ॥
    त्यानेसुद्धा संन्यास ग्रहण करून गुरुला शरण जावें. त्यालाही गुरुकृपेनें ब्रह्मज्ञानाची प्राप्ति होते ७६.


    गुरु करावा अतिशांत । शास्त्रार्थ परमार्थपारंगत ।
    त्याचे सेवेचा भावार्थ । स्वयें श्रीकृष्णनाथ सांगत ॥ ७७ ॥
    गुरु करणें तो अत्यंत शांत व परोक्षापरोक्षज्ञानांत पारंगत असा करावा. आतां त्याच्या सेवेचा भावार्थ स्वतः श्रीकृष्ण सांगतात ७७.


    तावत्परिचरेद्‍भक्तः श्रद्धावाननसूयकः ।
    यावद्‍ब्रह्म विजानीयान्मामेव गुरुमादृतः ॥ ३९ ॥
    [श्लोक ३९] श्रद्धावान व गुरूंचे दोष न पाहाणार्‍या गुरूभक्त शिष्याने जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही, तोपर्यंत मलाच गुरूंच्या रूपामध्ये पाहून त्यांची आदराने सेवा करावी. (३९)


    अचळ अमळ अविनाश । परात्परतर परेश ।
    गुरु तो परब्रह्म ईश । हा दृढ विश्वास धरावा ॥ ७८ ॥
    गुरु म्हणजे अचळ, निर्मळ, अविनाश, परेहून पलीकडचा परमेश्वर, परब्रह्म व ईश्वर आहे असाच दृढतर विश्वास धरावा ७८.


    त्या विश्वासाच्या पडिपाडीं । नवल गुरुचरणीं आवडी ।
    नित्य नूतन नवी गोडी । चढोवढी भजनार्थ ॥ ७९ ॥
    त्या दृढतर विश्वासाच्या संवयीने गुरुचरणाच्या ठिकाणी अपूर्व आवड उत्पन्न होऊन भजनाला नित्य नवी व अधिकाधिकच गोडी चढते ७९.


    ऐशिया भजनपरवडीं । हृदयीं श्रद्धा उसळे गाढी ।
    गुरुआज्ञेची नुल्लंघी काडी । आळस तोडी समूळ ॥ २८० ॥
    अशी भजनाची आवड उत्पन्न झाली म्हणजे अंतःकरणामध्ये अतिशय श्रद्धा उचंबळून येते; गुरूच्या आज्ञेची एक काडीसुद्धा तो ओलांडीत नाही, आणि आळस सारा झाडून टाकतो २८०.


    गुरुवाक्याचेनि श्रवणें । विकल्पाचें खत खाणणें ।
    संकल्पासी सूळीं देणें । जीवें घेणें अभिमाना ॥ ८१ ॥
    गुरुवाक्यश्रवणाच्या योगें विकल्पाचे खत खणून टाकतो. आणि संकल्पाला सुळी देऊन अभिमानाला ठार करितो ८१.


    तेथ असूया कैंची उठी । धाकेंचि निमाली उठाउठी ।
    ऐशी गुरुचरणीं श्रद्धा मोठी । परब्रह्मदृष्टीं गुरु पाहे ॥ ८२ ॥
    त्या वेळी मत्सर डोके वर काय काढणार? तो धाकानें जेथल्या तेथेच ठार होतो. ह्याप्रमाणे गुरूच्या ठिकाणी अतिशय श्रद्धा बसते; तो परब्रह्मदृष्टीनेच गुरूला पहात असतो ८२.


    निर्गुण जो निर्विकारु । तोचि मूर्तिमंत माझा गुरु ।
    करूनि अकर्ता ईश्वरु । तोचि हा साचारु गुरु माझा ॥ ८३ ॥
    जो निर्गुण आणि निराकार तोच मूर्तिमंत माझा गुरु होय. करून अकर्ता असणारा जो ईश्वर, तोच खरोखर माझा गुरु ८३.


    नित्य निर्विकल्प देख । ज्यासी म्हणती समाधिसुख ।
    तें माझ्या गुरूचें चरणोदक । ऐसा भावें नेटक भावार्थी ॥ ८४ ॥
    नित्य व निर्विकल्प असें जें  समाधिसुख म्हणतात, ते माझ्या गुरूच्या चरणाचें तीर्थ होय. इतका तो दृढभावार्थी होतो ८४.


    गुरूतें पाहतां ब्रह्मदृष्टीं । शिष्य ब्रह्मत्वें आला पुष्टी ।
    ब्रह्मरूप देखे सृष्टी । निज‍ऐक्यें मिठी गुरुचरणीं ॥ ८५ ॥
    गुरूला अशा प्रकारें ब्रह्मस्वरूपाने पाहिले म्हणजे शिष्यालाही ब्रह्मस्वरूपाचीच पुष्टि प्राप्त होते. तो सारी सृष्टिच ब्रह्मरूप पाहू लागतो, आणि आत्मैक्यानेच गुरुचरणाला मिठी घालतो ८५.


    ऐसें ब्रह्मरूपीं ऐक्य घडे । तंव गुरुसेवा करणें पडे ।
    ऐक्य झाल्याही पुढें । सेवा न मोडे अखंडत्वें ॥ ८६ ॥
    अशा प्रकारे ब्रह्मस्वरूपाशी ऐक्य झाले तरी, गुरूची सेवा करावीच लागते. ब्रह्माशी ऐक्य झाले तरी अखंडत्वामुळे सेवा मोडतच नाही ८६.


    कापूर घातलिया जळीं । स्वयें विरोनि जळ परमळी ।
    तेवीं अहं जाऊनि सेवा सकळी । सर्वीं सर्वकाळीं गुरुचरणीं ॥ ८७ ॥
    कापूर पाण्यात घातला, तर तो स्वतः विरून जातो; पण जलाला सुगंधित करतो. त्याप्रमाणे 'अहं' हा अभिमान नाहीसा झाला तरी तो सदासर्वदा गुरुचरणाची सेवाच करीत राहतो ८७.


    ऐशी अवस्था न येतां हाता । केवळ मुंडूनियां माथा ।
    संन्यासी म्हणवी पूज्यता । त्याची अनुचितता हरि बोले ॥ ८८ ॥
    अशी अवस्था हाताला न चढतां केवळ मस्तकाचे मुंडण करून आपण मोठा संन्यासी म्हणविणाराचा अनुचितपणा श्रीकृष्ण सांगतात ८८.


    स्वयें संन्यास अंगीकारी । ब्रह्मसाक्षात्कार जो न करी ।
    त्यालागीं स्वयें श्रीहरी । अतिधिक्कारीं निंदीत ॥ ८९ ॥
    स्वतः संन्यास घेऊन जो ब्रह्मस्वरूपाचा साक्षात्कार करून घेत नाही, त्याचा स्वतः श्रीकृष्ण अतिशय धिक्कार करून दूषण देतात ८९.


    यस्त्वसंयतषड्वर्गः प्रचण्डेन्द्रियसारथिः ।
    ज्ञानवैराग्यरहितस्त्रिदण्डमुपजीवति ॥ ४० ॥
    सुरानात्मानमात्मस्थं निन्हते मां च धर्महा ।
    अविपक्वकषायोऽस्मादमुष्माच्च विहीयते ॥ ४१ ॥
    [श्लोक ४०/४१] परंतु ज्याने पाच इंद्रिये आणि मन या सहांवर विजय मिळविला नाही, ज्याचे इंद्रियरुपी घोडे आणि बुद्धीरूपी सारथी हे दोघेही बिघडलेले आहेत, तसेच ज्याच्या हृदयात ज्ञान व वैराग्य नाही, तो जर त्रिदंडी संन्याशाचा वेष धारण करून आपले पोट भरत असेल, तर तो संन्यासधर्माचा नाशच करीत आहे, असे समजावे शिवाय तो देवांना, स्वतःला आणि आपल्या हृदयात असलेल्या मला फसविण्याचा प्रयत्‍न करीत असतो, त्याच्या वासना नष्ट झालेल्या नसतात म्हणून इहलोक आणि परलोक अशा दोन्ही लोकांना तो गमावून बसतो. (४०-४१)


    नाहीं वैराग्याची स्थिती । नसतां विषयविरक्ती ।
    देखोदेखीं संन्यास घेती । केवळ वृत्ती अन्नार्थ ॥ २९० ॥
    काही लोक अंगांत वैराग्य न बाणतां, विषयाची विरक्ति न येतां, देखोवेखीनें म्ह• दुसऱ्याचे पाहून केवळ अन्नासाठी संन्यास घेतात! २९०.


    संन्यास नेघतां पूर्व दृष्टीं । जें वैराग्य होतें पोटीं ।
    तें संन्यास घेतल्यापाठीं । उठाउठीं पळालें ॥ ९१ ॥
    संन्यास घेण्याच्या आधी अंतःकरणांत जें वैराग्य झालेले होते, तेही संन्यास घेतल्यानंतर लगेच निघून जातें ! ९१.


    ज्ञानेंद्रियें पांच सहावें मन । हेचि अरिषड्वर्ग जाण ।
    यांचें न करितां निर्दळण । संन्यासपण तो विटंबु ॥ ९२ ॥
    पांच ज्ञानेंद्रिये आणि सहावे मन, हेच सहा शत्रु होत. त्यांचे निर्दळण केल्याशिवाय संन्यास घेणे ही केवळ विटंबना होय ९२.


    अवैराग्यें सकाम मन । तेणें विषयाकुलित बुद्धि जाण ।
    नाहीं ज्ञान ध्यान साधन । दंडग्रहण उदरार्थ ॥ ९३ ॥
    वैराग्याच्या अभावामुळे मन लोभिष्ट असते आणि बुद्धि विषयलंपट होते. ज्ञान नाहीं, ध्यान नाहीं, साधन नाही. उदरभरणासाठी दंड मात्र हातात घेतलेला! ९३.


    नुपजेच अनुताप जाण । न करीच श्रवण मनन ।
    आदरें न साधीचि साधन । त्यासी ब्रह्मज्ञान नव्हेचि ॥ ९४ ॥
    उपरति कधी व्हावयाची नाही. श्रवणमननही कधी करावयाचे नाही. आदराने कधी साधनही करावयाचे नाही. अशाला कधींच ब्रह्मज्ञान होणार नाहीं ९४.


    त्याचा व्यर्थ संन्यास जाण । व्यर्थ त्याचें दंड मुंडण ।
    व्यर्थ काषायवस्त्रग्रहण । जेवीं वेषधारण नटाचें ॥ ९५ ॥
    त्याचा संन्यास व्यर्थ, त्याचा दंड व्यर्थ ; त्याचे मुंडण व्यर्थ ; त्याची भगवीं वस्त्रें व्यर्थ. ते केवळ नटाचे सोंग होय ९५.


    संन्यास घेतलिया पाठीं । काम उचंबळे उठाउठीं ।
    क्रोधलोभांची धुमे आगिटी । चौगुणा पोटीं अभिमान ॥ ९६ ॥
    संन्यास घेतल्यानंतर काम उचंबळतो; क्रोधाची लोभाची आगटी धुमसूं लागते; आणि मनामध्ये चौपट अभिमान उत्पन्न होतो ९६, 


    आसक्ति अधिकाधिक उठी । सदा ग्रामणी चावटी ।
    करणें पैशुन्याच्या गोष्टी । दंड कासोटी दंभार्थ ॥ ९७ ॥
    अधिकाधिक आसक्ति करावयाची; नेहमीं गांवकुटाळक्या आणि टासोपणाच्या गोष्टी सांगावयाच्या; आणि दंड व कौपीन ही केवळ दंभार्थ वापरावयाची! ९७.


    अनधिकारीं दंडग्रहण । तेणें संन्यासरूपें जाण ।
    केवळ आली नागवण । आपल्या आपण नाडिलें ॥ ९८ ॥
    दंड ग्रहण करण्याला असा मनुष्य निखालस अनधिकारी होय. त्याने संन्यासाच्या निमित्ताने आपली नागवण करून घेतली म्हणून समजावें ९८.


    नाडिले यज्ञाधिकारी सुरगण । नाडिले स्वधाकाराचे पितृगण ।
    नाडिले ऋषि भूतगण । बळिअर्पण ठाकेना ॥ ९९ ॥
    त्याने यज्ञाचे अधिकारी जे देव त्यांना टाळा दिला : स्वधाचे अधिकारी जे पितृगण त्यांना धाब्यावर बसविलें ; ऋषि व भूतगण यांनाही फसविलें. कारण, त्याच्याकडून बलिदान कसलेच होत नाहीं ! ९९.


    जीवरूपें मी परमात्मा आपण । त्या मज हृदयस्था ठकिलें जाण ।
    जीवोद्धारीं जें संन्यासग्रहण । तेंचि दृढबंधन त्यासी झालें ॥ ३०० ॥
    जीवरूपाने मी परमात्मा स्वतः हृदयामध्ये असणारा, त्या मलाही तो ठकवितो. त्यामुळे जीवाच्या उद्धारासाठी जे संन्यासग्रहण करावयाचे तेच दृढतर बंधनाला मात्र कारणीभूत होते ३००. 

    एकनाथी भागवत

    एकनाथी भागवत अध्याय १ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ६ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ८ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १६ अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय विसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २८ अर्थासहित अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३१ अर्थासहित

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा
    Loading...