मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.
श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १८ ओव्या १0१ ते २००
ऐसें सावध राखतां मन । दृढ लागल्या अनुसंधान ।
तंव संकल्पविकल्प क्षीण । सहजचि जाण स्वयें होती ॥ १ ॥
असें मन सावध ठेवलें व ब्रह्मस्वरूपाचे दृढ़ अनुसंधान लागले म्हणजे संकल्प-विकल्प हे आपोआपच क्षीण होत जातात १.
देह वाचा आणि मन । या त्रिदंडांचें लक्षण ।
तुज म्यां सांगितले संपूर्ण । संन्यासत्व जाण येणें सत्य ॥ २ ॥
तुज म्यां सांगितले संपूर्ण । संन्यासत्व जाण येणें सत्य ॥ २ ॥
काया, वाचा आणि मन ह्या त्रिदंडाचें सारें लक्षण मी तुला सांगितले. ह्याच्याच योगानें खराखरा संन्यासपणा प्राप्त होतो २.
हे तिन्ही दंड नसतां जाण । केवळ वेणुदंडग्रहण ।
तेणें संन्यासत्व न घडे जाण । देहविटंबन दंभार्थ ॥ ३ ॥
तेणें संन्यासत्व न घडे जाण । देहविटंबन दंभार्थ ॥ ३ ॥
हे तिन्ही दंड नसतां केवळ कळकाचा दंड घेतला, तर त्याने काही संन्यासत्व घडत नाही. दंभार्थ संन्यास घेणे ही शुद्ध देहविटंबना होय ३.
सन्याशाचा आहार विहार । आचार संचार विचार ।
स्वधर्मयुक्त साचार । स्वयें सारंगधर सांगतु ॥ ४ ॥
स्वधर्मयुक्त साचार । स्वयें सारंगधर सांगतु ॥ ४ ॥
आतां संन्याशाचा खरोखर स्वधर्ममुक्त आहारविहार, आचारविचार, जाणेयणे, इत्यादि कसे असावें तें श्रीकृष्ण स्वतः सांगत आहेत ४.
भिक्षां चतुर्षु वर्णेषु विगर्ह्यान्वर्जयंश्चरेत् ।
सप्तागारानसंक्लृप्तांस्तुष्येल्लब्धेन तावता ॥ १८ ॥
सप्तागारानसंक्लृप्तांस्तुष्येल्लब्धेन तावता ॥ १८ ॥
[श्लोक १८] संन्याशाने निंदित आणि पतित सोडून चारही वर्णांकडून भिक्षा स्वीकारावी प्रथम न ठरवता फक्त सात घरातून भिक्षा स्वीकारावी भिक्षेमध्ये जे काही मिळेल, त्यात संतुष्ट असावे. (१८)
पूर्वी जाण संन्याशासी । चतुर्वर्णीं भिक्षा होती त्यासी ।
कलियुगीं गोष्टी झाली कैसी । ब्राह्मणापाशीं चतुर्वर्ण ॥ ५ ॥
कलियुगीं गोष्टी झाली कैसी । ब्राह्मणापाशीं चतुर्वर्ण ॥ ५ ॥
पूर्वी संन्याशांना चारही वर्णामध्ये भिक्षा होती. पण कलियुगामध्ये असा प्रकार झाला की, ब्राह्मणांमध्येच चार वर्ण झाले ५.
ज्याची जीविका जेणें जाण । त्या ब्राह्मणाचा तोचि वर्ण ।
ऐका तेंही प्रकरण । जीविकालक्षण सांगेन ॥ ६ ॥
ऐका तेंही प्रकरण । जीविकालक्षण सांगेन ॥ ६ ॥
ज्या वृत्तीच्या योगानें ब्राह्मणाचा उदरनिर्वाह होतो, तोच त्या ब्राह्मणाचा वर्ण होय. याकरितां तेही प्रकरण ऐका. जीविकेचे प्रकार सांगतों ६.
`मुख्य ब्राह्मणाची वृत्ती' जाण । `शिल' `उंछ' का `कोरान्न' ।
अयाचित का अध्यापन । अथवा याजन जीविकेसी ॥ ७ ॥
अयाचित का अध्यापन । अथवा याजन जीविकेसी ॥ ७ ॥
ब्राह्मणाची उपजीविकेची मुख्य वृत्ति म्हटली म्हणजे शिल, उंछ अथवा कोरान्न; तसेंच अयाचित, अध्यापन किंवा याजन हीही उपजीविकेची साधने होत ७.
जो जीविकेलागीं निर्धारीं । शस्त्र घेऊनियां करीं ।
शूरवृत्तीं जीविका करी । तो जाणावा `क्षत्री' ब्राह्मणांमाजीं ॥ ८ ॥
शूरवृत्तीं जीविका करी । तो जाणावा `क्षत्री' ब्राह्मणांमाजीं ॥ ८ ॥
जो उपजीविकेसाठी धैर्याने शस्त्र हातात घेऊन शूरवृत्तीने आपला निर्वाह करतो, तो ब्राह्मणांतील 'क्षत्रिय' म्हणून समजावें ८.
जो वाणिज्यवृतीवरी । नित्य जीविका आपुली करी ।
तो ब्राह्मण ब्राह्मणामाझारीं । `वैश्य' निर्धारीं निश्चित ॥ ९ ॥
तो ब्राह्मण ब्राह्मणामाझारीं । `वैश्य' निर्धारीं निश्चित ॥ ९ ॥
जो नित्य वाणीपणाचा धंदा पतकरून आपली उपजीविका चालवितो, तो खरोखर ब्राह्मणांतीक 'वैश्य' होय ९.
जो शूद्राचे शूद्रक्रियेवरी । सदा सर्वदा जीविका करी ।
तो ब्राह्मण शूद्रकर्मेंकरीं । `शूद्रत्व' धरी क्रियायोगें ॥ ११० ॥
तो ब्राह्मण शूद्रकर्मेंकरीं । `शूद्रत्व' धरी क्रियायोगें ॥ ११० ॥
आणि जो शूद्राच्या वृत्तीवरच सदासर्वदा आपली उपजीविका करतो, तो ब्राह्मण शतकर्में करीत असल्याने, त्या कर्मामुळे 'शूद्र' होतो ११०.
जैं उत्तम ब्राह्मणाची भिक्षा न लभे । तैं क्षत्रियब्राह्मणीं भिक्षा लाभे ।
क्षात्रब्राह्मणांचेनि अलाभें । वैश्यादि ब्राह्मणीं लाभे भिक्षाग्रहण ॥ ११ ॥
क्षात्रब्राह्मणांचेनि अलाभें । वैश्यादि ब्राह्मणीं लाभे भिक्षाग्रहण ॥ ११ ॥
जेव्हां 'उत्तम' बाह्मणाची भिक्षा मिळत नाही, तेव्हां क्षत्रियवृत्तीने राहणाऱ्या ब्राह्मणापाशीं भिक्षा मिळवावी. क्षत्रिय-ब्राह्मणाच्या घरी भिक्षान्न न मिळेल तर वैश्य-ब्राह्मणाकडे भिक्षा मिळवावी ११.
ब्राह्मण-क्षत्रिय-वैश्यब्राह्मणीं । भिक्षेस अप्राप्त हे तिनी ।
तैं शूद्रजीविका-ब्राह्मणीं । भिक्षाग्रहणीं अधिकारु ॥ १२ ॥
तैं शूद्रजीविका-ब्राह्मणीं । भिक्षाग्रहणीं अधिकारु ॥ १२ ॥
ब्राह्मण , क्षत्रिय व वैश्य या तिन्ही ब्राह्मणांमध्ये भिक्षा न मिळेल तर शूद्रवृत्तीवर निर्वाह करणाऱ्या ब्राह्मणाच्या घरी भिक्षा घेण्याचा अधिकार आहे १२.
यांत निंद्य जे ब्राह्मणाआंतु । केवळ दोषी अथवा अभिशप्तु ।
ते भिक्षेसी न लावावा हातु । हा स्वधर्मार्थु भिक्षेचा ॥ १३ ॥
ते भिक्षेसी न लावावा हातु । हा स्वधर्मार्थु भिक्षेचा ॥ १३ ॥
या ब्राह्मणांतही जे केवळ निंद्य असतील, दोषी अथवा बहिष्कृत असतील, त्यांच्या भिक्षेला हात लावू नये. हाच भिक्षेचा धर्म होय १३.
तेही भिक्षा अतिनेमस्त । भिक्षेसी येतों हें कळों नेदित ।
मागावीं नेमिलीं घरें सात । जें झालें प्राप्त तेणें सुखी ॥ १४ ॥
मागावीं नेमिलीं घरें सात । जें झालें प्राप्त तेणें सुखी ॥ १४ ॥
भिक्षा घेणे तीही अत्यंत नियमित घेत असावी. आपण भिक्षेला येत आहोत हे कळू देऊ नये. मोजकी सात घरेच भिक्षा मागावी. आणि त्यांत जे मिळेल त्यांतच तृप्त असावें १४.
जे सातां घरीं भिक्षा प्राप्त । ते भिक्षेचा धर्म विहित ।
स्वयें सांगे श्रीकृष्णनाथ । स्मृतिशास्त्रार्थप्रयोगें ॥ १५ ॥
स्वयें सांगे श्रीकृष्णनाथ । स्मृतिशास्त्रार्थप्रयोगें ॥ १५ ॥
आतां सात घरांत जी भिक्षा मिळेल, त्या भिक्षेचा स्मृतिशास्त्रांत विहित धर्म कसा ते स्वतः श्रीकृष्ण सांगतात १५.
बहिर्जलाशयं गत्वा तत्रोपस्पृश्य वाग्यतः ।
विभज्य पावितं शेषं भुञ्जीताऽशेषमाहृतम् ॥ १९ ॥
विभज्य पावितं शेषं भुञ्जीताऽशेषमाहृतम् ॥ १९ ॥
[श्लोक १९] अशा प्रकारे भिक्षा घेऊन गावाबाहेर जलाशयावर जावे तेथे हातपाय धुऊन पाण्याने प्रोक्षण करून भिक्षा पवित्र करावी नंतर शास्त्रोक्त पद्धतीने भिक्षेचे भाग ज्यांनात्यांना देऊन जे शिल्लक राहील, ते मौन धारण करून सर्व खावे. (१९)
ग्रामाबाहेर गंगातीरीं । अथवा तडागाचे परिसरीं ।
भिक्षा धरोनियां करीं । आचमन तीरीं करावें ॥ १६ ॥
भिक्षा धरोनियां करीं । आचमन तीरीं करावें ॥ १६ ॥
ती मिळालेली भिक्षा हातात घेऊन गांवाच्या बाहेर नदीकाठावर किंवा एखाद्या सरोवराच्या तीरावर यावे आणि तेथे आचमन करावें १६.
याचित जें भिक्षेचें अन्न । तें द्वादशप्रणवें अभिमंत्रून ।
तेणें मंत्रोदकें प्रोक्षीतां जाण । होय पावन पवित्र ॥ १७ ॥
तेणें मंत्रोदकें प्रोक्षीतां जाण । होय पावन पवित्र ॥ १७ ॥
याचना करून जें भिक्षेचे अन्न मिळालेले असते, ते बारा प्रणवमंत्राने अभिमंत्रण करावे. त्या मंत्रोदकानें तें अन्न प्रोक्षण केले म्हणजे पवित्र होते १७.
चतुर्धा करावें त्या अन्नातें । चार अधिकारी त्या भागतें ।
ब्रह्मा विष्णु अर्क आणि भूतें । अर्पण तेथें अवधारीं ॥ १८ ॥
ब्रह्मा विष्णु अर्क आणि भूतें । अर्पण तेथें अवधारीं ॥ १८ ॥
नंतर त्या अन्नाचे चार भाग करावेत. ब्रह्मा, विष्णु, सूर्य आणि जीवमात्र असे त्याचे चार अधिकारी होत. त्यांस ते कसें अर्पण करावयाचें तें ऐक १८.
विष्णुकल्पित जो भाग । तो जळीं घालावा साङ्ग ।
भूतकल्पित जो विभाग । तो पृथ्वीवरी चांग ठेवावा ॥ १९ ॥
भूतकल्पित जो विभाग । तो पृथ्वीवरी चांग ठेवावा ॥ १९ ॥
विष्णुप्रीत्यर्थ जो भाग काढलेला असेल तो पाण्यात टाकावा; आणि जीवांसाठी जो भाग काढलेला असेल तो नीटपणे जमिनीवर ठेवून द्यावा १९.
उरले जे विभाग दोनी । यतीसी अधिकार सेवनीं ।
दीन मागों आलिया ते क्षणीं । भूतदयागुणीं अन्न द्यावें ॥ १२० ॥
दीन मागों आलिया ते क्षणीं । भूतदयागुणीं अन्न द्यावें ॥ १२० ॥
बाकी दोन भाग राहिले ते संन्याशाला सेवन करण्याला अधिकार आहे. किंवा तितक्यांत कोणी गरीब मागावयास आला तर भूतदयेच्या दृष्टीने त्याला तत्काल अन्न द्यावें १२०.
परी मी एक अन्नदाता । हें आठवोंही नये चित्ता ।
आल्या दातेपणाची अहंता । अधर्मता संन्यासीं ॥ २१ ॥
आल्या दातेपणाची अहंता । अधर्मता संन्यासीं ॥ २१ ॥
पण 'मी एक अन्नदाता' अशी मनांत वृत्तिही उठं देऊं नये. दातेपणाचा अभिमान झाला की, संन्यासव्रतामध्यें तो अधर्मच समजावा २१.
मधुकरीचें अवघेंचि अन्न । समयीं मागों येती दीन ।
येणें उद्देशें अधिक अन्न । सर्वथा जाण मागों नये ॥ २२ ॥
येणें उद्देशें अधिक अन्न । सर्वथा जाण मागों नये ॥ २२ ॥
मधुकरीचे सगळेच अन्न वेळेला एखादा गरीब मागावयास येतो या उद्देशाने अधिक अन्न कधीही मागू नये २२.
करितां मधुकरीभोजन । ठायीं अधिक उरलिया अन्न ।
तें सांडितां अतिपतन । अवघेंच जाण भक्षावें ॥ २३ ॥
तें सांडितां अतिपतन । अवघेंच जाण भक्षावें ॥ २३ ॥
मधुकरीचे भोजन करतांना पात्रांत अधिक अन्न उरलें. तर ते टाकलें असतां मोठा दोष लागतो. याकरितां तें सारेंच भक्षण केले पाहिजे २३.
संन्यासधर्मीं लघु आहार । नित्य करावा निरंतर ।
अधिक आहारीं विकार । निद्रा आळस फार बाधिती ॥ २४ ॥
अधिक आहारीं विकार । निद्रा आळस फार बाधिती ॥ २४ ॥
पण संन्यासधर्मामध्ये सदासर्वदा लघु आहार केला पाहिजे. अधिक भोजन केले असता अनेक विकार उत्पन्न होतात. निद्रा व आळस यांची फारच पीडा होत असते २४.
ज्यालागीं कीजे चतुर्थाश्रम । तो संन्याशाचा मुख्य धर्म ।
स्वयें सांगे पुरुषोत्तम । जेणें आत्माराम पाविजे ॥ २५ ॥
स्वयें सांगे पुरुषोत्तम । जेणें आत्माराम पाविजे ॥ २५ ॥
आतां ज्यासाठी संन्यासाश्रम घ्यावयाचा, तो संन्याशाचा मुख्य धर्म, की ज्याच्या योगाने आत्मपदप्राप्ति होते. तो स्वत: श्रीकृष्ण सांगत आहेत २५.
एकश्चरेन्महीमेतां निःसङ्गः संयतेन्द्रियः ।
आत्मक्रीड आत्मरत आत्मवान् समदर्शनः ॥ २० ॥
आत्मक्रीड आत्मरत आत्मवान् समदर्शनः ॥ २० ॥
[श्लोक २०] संन्याशाने सगळीकडे एकट्यानेच फिरावे कोठेही आसक्ती ठेवू नये इंद्रिये ताब्यात ठेवावीत आत्म्याशीच खेळावे आत्मप्रेमातच तन्मय असावे, प्रतिकूल परिस्थितीतही धैर्याने वागावे आणि परमात्म्याला सगळीकडे समदृष्टीने पाहात राहावे. (२०)
सदा वैराग्य अंगीं पुरतें । जो अपेक्षीना सांगात्यातें ।
निःसंग होत्साता चित्तें । सुखें पृथ्वीतें विचरतु ॥ २६ ॥
निःसंग होत्साता चित्तें । सुखें पृथ्वीतें विचरतु ॥ २६ ॥
सदासर्वदा अंगामध्ये परिपूर्ण वैराग्य ; तो कोणा सोबत्याची इच्छा करीत नाही. मनाने निःसंग होऊन पृथ्वीवर आनंदाने फिरत असतो २६.
इंद्रियें बांधोनि चित्ताच्या पायीं । चित्त लावी चैतन्याच्या ठायीं ।
तेणें चिन्मात्र ठसावें पाहीं । देहत्व देहीं स्मरेना ॥ २७ ॥
तेणें चिन्मात्र ठसावें पाहीं । देहत्व देहीं स्मरेना ॥ २७ ॥
इंद्रियांना चित्ताच्या पायाला बांधून, चित्त हे चैतन्याच्या ठिकाणी लावतो. त्यामुळे त्याला सर्वत्र चिन्मयस्वरूपच दिसू लागते. देहाचा देहपणाच आठवत नाही २७.
ऐसा आत्मस्थितीचा उद्यम । तेणें आत्मक्रीडेचा आराम ।
आत्मसुखाचा संभ्रम । अनुभव परम तो ऐक ॥ २८ ॥
आत्मसुखाचा संभ्रम । अनुभव परम तो ऐक ॥ २८ ॥
आत्मस्थितीचा उद्यम असाच असतो, त्यायोगें आत्मक्रीडेतच त्याला आराम वाटतो. आतां आत्मसुखाचा उत्साह व श्रेष्ठ अनुभव कसा असतो तो ऐक २८.
आत्मस्थिति निजात्मयुक्त । तेणें आत्मसुखें उल्हासत ।
सदा समदर्शनें डुल्लत । वोसंडत समसाम्यें ॥ २९ ॥
सदा समदर्शनें डुल्लत । वोसंडत समसाम्यें ॥ २९ ॥
तो आत्मस्थितीने निजात्मयुक्त झाल्यामुळे आत्मानंदांतच निमग्न असतो व सर्वत्र ऐक्यभावनेनें सदासर्वदा डुलत राहुन, समरसत्वानें तो भरून जात असतो २९.
ऐशिया समसुखाची संपत्ती । भोगावया सुनिश्चितीं ।
सदा एकाकी वसे एकांतीं । तेंचि श्रीपती सांगत ॥ १३० ॥
सदा एकाकी वसे एकांतीं । तेंचि श्रीपती सांगत ॥ १३० ॥
अशा समत्वसुखाचें ऐश्वर्य निश्चिंतपणाने भोगावयाला मिळावे म्हणून तो नेहमी एकांतांतच एकटा राहत असतो. तेंच श्रीकृष्ण सांगताहेत १३०.
विविक्तक्षेमशरणो मद्भावविमलाशयः ।
आत्मानं चिन्तयेदेकमभेदेन मया मुनिः ॥ २१ ॥
आत्मानं चिन्तयेदेकमभेदेन मया मुनिः ॥ २१ ॥
[श्लोक २१] संन्याशाने निर्जन पण निर्भय अशा एकांतात राहावे माझ्यावरील प्रेमाने त्याचे हृदय विशुद्ध असावे त्याने स्वतःला माझ्यापासून अभिन्न समजावे. (२१)
पवित्र आणि विजन । प्रशस्त आणि एकांतस्थान ।
तेणें माझें अनुसंधान । सद्भावें जाण सर्वदा ॥ ३१ ॥
तेणें माझें अनुसंधान । सद्भावें जाण सर्वदा ॥ ३१ ॥
-पवित्र आणि निर्जन, प्रशस्त आणि एकांत अशी जागा पाहून तेथें सद्भक्तीने सदासर्वदा माझें ध्यान करावें ३१.
तेथें सांडून जनपद दुश्चित । सदा एकांतीं व्हावें निरत ।
मद्भावें सुनिश्चित । आत्मसुख प्राप्त साधकां ॥ ३२ ॥
मद्भावें सुनिश्चित । आत्मसुख प्राप्त साधकां ॥ ३२ ॥
अशा साधकानें संसारदुःखांत मग्न झालेले लोक सोडून देऊन निरंतर एकांतांतच रममाण होऊन राहिले पाहिजे. कारण मद्भावयुक्त राहिल्याने साधकांना आत्मसुखाची प्राप्ति होते ३२.
ज्यासी निजात्मसुख झालें प्राप्त । तो होय अनन्यशरणागत ।
मीवांचूनि जगाआंत । आणीक अर्थ देखे न ॥ ३३ ॥
मीवांचूनि जगाआंत । आणीक अर्थ देखे न ॥ ३३ ॥
आणि ज्याला आत्मसुखाची प्राप्ति झाली, तो मला अनन्यभावानें शरण असतो. त्याला या जगांत माझ्याशिवाय दुसऱ्या कशांत अर्थ म्हणून दिसतच नहीं ३३.
ऐसे अनन्य करितां माझें ध्यान । साधक विसरे मीतूंपण ।
तेव्हां अभेदें चैतन्यघन । मद्रूप जाण तो होय ॥ ३४ ॥
तेव्हां अभेदें चैतन्यघन । मद्रूप जाण तो होय ॥ ३४ ॥
याप्रकारें माझे अनन्य ध्यान केले असतां साधक मीतूंपण विसरूनच जातो. तेव्हां भेदभाव नाहीसा झाल्यामुळे तो चैतन्यधन असा मत्स्वरूपच होऊन राहातो ३४.
त्या मद्रूपाचे स्वरूपस्थिती । पाहों जातां निजात्मवृत्ती ।
मी ना तो ऐशी होय गती । `अभेदप्राप्ती' या नांव ॥ ३५ ॥
मी ना तो ऐशी होय गती । `अभेदप्राप्ती' या नांव ॥ ३५ ॥
त्या माझ्या स्वरूपाची स्थिति अशी असते की, आत्मदृष्टीने पाहूं लागळे असतां मीही नाही आणि तोही नाही अशी दशा होते. या स्थितीलाच 'अभेदप्राप्ति' म्हणतात ३५.
जंव असे द्वैतवार्ता । तंव भयाची बाधकता ।
अभेदत्व आल्या हाता । निर्भयता साधकां ॥ ३६ ॥
अभेदत्व आल्या हाता । निर्भयता साधकां ॥ ३६ ॥
द्वैतभावना जोपर्यंत असते, तोपर्यंतच साधकाला संसारभय बाधत असते. अभेदभावना एकदा हाताला चढली की, साधक निर्भय होतो ३६.
अभेदप्राप्तीच्या ठायीं । बंधमोक्षांची वार्ता नाही ।
गडगर्जे बंधमोक्ष पाहीं । नांदती नवायी हरि बोले ॥ ३७ ॥
गडगर्जे बंधमोक्ष पाहीं । नांदती नवायी हरि बोले ॥ ३७ ॥
कारण, अभेदभावनेच्या ठिकाणी बंधाची आणि मोक्षाची वार्ताच राहात नाही. आतां बंध व मोक्ष जिकडे गडगर्जना करीत नांदतात, त्यांची नवलाई श्रीकृष्ण सांगताहेत ३७.
अन्वीक्षेतात्मनो बन्धं मोक्षं च ज्ञाननिष्ठया ।
बन्ध इन्द्रियविक्षेपो मोक्ष एषां च संयमः ॥ २२ ॥
बन्ध इन्द्रियविक्षेपो मोक्ष एषां च संयमः ॥ २२ ॥
[श्लोक २२] त्याने आपल्या ज्ञाननिष्ठेने चित्ताचे बंधन आणि मोक्ष यासंबंधी विचार करावा व असा निश्चय करावा की, विषयोपभोगासाठी इंद्रियांचे चंचल होणे, हे बंधन आहे आणि त्यांना नियंत्रणाखाली ठेवणे, हाच मोक्ष होय. (२२)
ऐक्यें पावोनि एकात्मता । तेथूनि बंधमोक्ष पाहतां ।
दोंहीची मिथ्या वार्ता । मायिकता निश्चित ॥ ३८ ॥
दोंहीची मिथ्या वार्ता । मायिकता निश्चित ॥ ३८ ॥
ऐक्यस्वरूपाला पोंचून एकात्मता झाल्यानंतर बंधमोक्षाकडे पाहूं लागले म्हणजे ते दोन्ही खरोखर मायिक व मिथ्याच भासू लागतात ३८.
प्रवृत्तीमाजीं बंधमोक्षता । त्या दोंहीची विभागता ।
इंद्रियांची जे विषयासक्तता । `दृढबद्धता' ती नांव ॥ ३९ ॥
इंद्रियांची जे विषयासक्तता । `दृढबद्धता' ती नांव ॥ ३९ ॥
बंध आणि मोक्ष हे प्रवृत्तीमध्येच असतात. त्या दोहोंचे भेद हेच की. इंद्रियांची विषयासक्तता याचे नांव दृढबंधन' ३९.
काया-वाचा-चित्तवृत्तीं । निःशेष विषयांची विरक्ती ।
या नांव साचार `मुक्ति' । जाण निश्चितीं उद्धवा ॥ १४० ॥
या नांव साचार `मुक्ति' । जाण निश्चितीं उद्धवा ॥ १४० ॥
आणखी उद्धवा! कायावाचामनेंकरून निखालस विषयांची जी विरक्ति तीच खरोखर 'मुक्ति' असे समज १४०.
ज्यासी साचार पाहिजे मुक्ती । तेणें करावी विषयनिवृत्ती ।
हेचि मुख्यत्वें उपायस्थिती । कृष्ण कृपामूर्ती सांगत ॥ ४१ ॥
हेचि मुख्यत्वें उपायस्थिती । कृष्ण कृपामूर्ती सांगत ॥ ४१ ॥
ह्याकरितां ज्याला खरोखर मुक्ति पाहिजे असेल, त्याने विषयांची निवृत्ति केली पाहिजे. कृपेची केवळ मूर्ति जे श्रीकृष्ण ते मुख्यत्वेकरून त्याचाच उपाय सांगत आहेत ४१.
तस्मान्नियम्य षड्वर्गं मद्भावेन चरेन्मुनिः ।
विरक्तः क्षुल्लकामेभ्यो लब्ध्वाऽऽत्मनि सुखं महत् ॥ २३ ॥
विरक्तः क्षुल्लकामेभ्यो लब्ध्वाऽऽत्मनि सुखं महत् ॥ २३ ॥
[श्लोक २३] म्हणून संन्याशाने मन आणि पाचही इंद्रिये यांना जिंकावे, भोग हे क्षुद्र आहेत असे समजून त्यांच्याबाबत विन्मुख असावे आणि आत्म्यातच परम आनंदाचा अनुभव घ्यावा अशा प्रकारे माझ्याशी एकरूप होऊन राहावे. (२३)
येणें विचारें विचारिता । विषयासक्ती दृढबद्धता ।
त्या विषयांचा त्याग करितां । निजमुक्तता सहजेंचि ॥ ४२ ॥
त्या विषयांचा त्याग करितां । निजमुक्तता सहजेंचि ॥ ४२ ॥
अशा दृष्टीने विचार करतांना विषयासक्तीनें दृढतर 'बंधन' प्राप्त होते; त्या विषयांचाच त्याग केला म्हणजे आपली 'मुक्ति' सहज सिद्ध आहे ४२.
तेचि विषयांची विरक्ती केवीं । आतुडे आपुल्या हातीं ।
यालागीं वैराग्याची उत्पत्ती । साधकें निश्चितीं साधावी ॥ ४३ ॥
यालागीं वैराग्याची उत्पत्ती । साधकें निश्चितीं साधावी ॥ ४३ ॥
पण तीच विषयाची विरक्ति आपल्या हाती कशी लागेल ? तर यासाठी साधकानें वैराग्य उत्पन्न होईल, तो तो यत्न करावा ४३.
अंतरीं वासना दृढमूळ । विषयशाखा तेणें सबळ ।
ते वासना छेदावया समूळ । वैराग्य सबळ साधावें ॥ ४४ ॥
ते वासना छेदावया समूळ । वैराग्य सबळ साधावें ॥ ४४ ॥
अंत:करणामध्ये वासना दृढमूल असते; तिला विषयरूप शाखा फुटून त्या माजतात ; याकरितां ती वासनाच समूळ छेदून टाकण्यासाठी कडकडीत वैराग्य साध्य करावें ४४.
वैराग्यप्राप्तीचें कारण । स्वधर्मकर्म मदर्पण ।
सांडावें कर्माचें कर्तेपण । `मदर्पण' या नांव ॥ ४५ ॥
सांडावें कर्माचें कर्तेपण । `मदर्पण' या नांव ॥ ४५ ॥
स्वधर्मकर्म करून ते मला अर्पण करावे, हेच वैराग्यप्राप्तीचे मुख्य साधन आहे. कर्म करून त्याचे कर्तेपण सोडून देणे ह्याचंच नांव 'मदर्पण' होय ४५.
मदर्पणें कर्मस्थिती । तेणें माझ्या ठायीं उपजें प्रीती ।
माझें नाम माझी कीर्ती । चिंतन चित्तीं पैं माझें ॥ ४६ ॥
माझें नाम माझी कीर्ती । चिंतन चित्तीं पैं माझें ॥ ४६ ॥
मदर्पणबुद्धीने कर्म करूं लागले म्हणजे माझ्यावर प्रेम उत्पन्न होते. आणि चित्ताला माझेच नाम, माझीच कीर्ति आणि माझेच चिंतन घडू लागते ४६.
ऐशिया माझ्या परम प्रीतीं । होय वैराग्याची उत्पत्ती ।
तेणें विषयांची विरक्ती । माझी सुखप्राप्ती शनैःशनैः ॥ ४७ ॥
तेणें विषयांची विरक्ती । माझी सुखप्राप्ती शनैःशनैः ॥ ४७ ॥
अशी मजवर अत्यंत प्रीति जडली म्हणजे वैराग्य उत्पन्न होते. आणि तेणेकरून विषयांची विरक्ति घडून हळू हळू माझ्या सुखाची प्राप्ति होते ४७.
माझेनि सुखें माझें भजन । अत्यंत थोरावे पैं जाण ।
तेव्हा सर्वत्र मद्भावन । ब्रह्मत्वें पूर्ण ठसावे ॥ ४८ ॥
तेव्हा सर्वत्र मद्भावन । ब्रह्मत्वें पूर्ण ठसावे ॥ ४८ ॥
माझ्या सुखाने माझें भजन अत्यंत वाढू लागते. आणि सर्व ठिकाणी माझीच ब्रह्मत्वाने भावना पूर्णपणे ठसते ४८.
सर्वत्र ब्रह्मभावन । ब्रह्मसुखाचें अनुसंधान ।
धरूनि करावें पर्यटण । जंव निर्वासन मन होय ॥ ४९ ॥
धरूनि करावें पर्यटण । जंव निर्वासन मन होय ॥ ४९ ॥
याकरितां सर्वत्र एक ब्रह्मच भरलेले आहे अशी भावना धरून, महासुखावरच लक्ष ठेवून मन वासनारहित होईपर्यंत पर्यटण करीत असावें ४९.
पुत्रग्रामव्रजान् सार्थान् भिक्षार्थं प्रविशंश्चरेत् ।
पुण्यदेशसरिच्छैलवनाश्रमवतीं महीम् ॥ २४ ॥
पुण्यदेशसरिच्छैलवनाश्रमवतीं महीम् ॥ २४ ॥
[श्लोक २४] पवित्र देश, नद्या, पर्वत, वने, आणि आश्रमांनी परिपूर्ण अशा पृथ्वीवर फिरत राहावे फक्त भिक्षेसाठीच नगर, गाव, गौळवाडा किंवा यात्रेकरूंच्या समूहात जावे. (२४)
पृथ्वी विचरणें विचित्र । पुण्यदेश कुरुक्षेत्र ।
सप्त पुर्या परम पवित्र । पुष्करादि थोर महातीर्थें ॥ १५० ॥
सप्त पुर्या परम पवित्र । पुष्करादि थोर महातीर्थें ॥ १५० ॥
चांगल्या चांगल्या पुण्यक्षेत्री फिरून पृथ्वीपर्यटन करावे. पवित्र असें कुरुक्षेत्र, अत्यंत पवित्र अशा सात पुऱ्या [अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, जगन्नाथपुरी व द्वारका.] पुष्कर, प्रयागराज वगैरे तीर्थे , १५०,
कृतमाला पयस्विनी । पुण्यरूप ताम्रपर्णी ।
गौतमी रेवा त्रिवेणी । परमपावनी गोमती ॥ ५१ ॥
गौतमी रेवा त्रिवेणी । परमपावनी गोमती ॥ ५१ ॥
कृतमाला, पयस्विनी, पुण्यस्वरूप अशी ताम्रपर्णी, गोदावरी, नर्मदा, त्रिवेणी, परमपवित्र अशी गोमती ५१:
कृष्णा वेण्या तुंगभद्रा । तपती पयोष्णी भिंवरा ।
यमुना भागीरथी नीरा । गंगा सागरासंगमीं ॥ ५२ ॥
यमुना भागीरथी नीरा । गंगा सागरासंगमीं ॥ ५२ ॥
कृष्णा. वेण्या, तुंगभद्रा, तापी, पायोष्णी, चंद्रभागा, यमुना, भागीरथी, नीरा, किंवा गंगा समुद्राला मिळते तो संगम ५२,
ऋष्यमूक श्रीशैल व्यंकटाद्री । मूळपीठींचा सह्याद्री ।
गौतमीतीरींचा ब्रह्मगिरी । जो पापें संहारी यात्रामात्रें ॥ ५३ ॥
गौतमीतीरींचा ब्रह्मगिरी । जो पापें संहारी यात्रामात्रें ॥ ५३ ॥
ऋष्यमूक, श्रीशैल, व्यंकटादि (व्यंकटगिरि), मूळपीठाचा सद्यादि, किंवा गौतमीतीरावरील ब्रह्मगिरि यांची यात्रा केली असतां सर्व पातकांचा संहार होतो ५३.
हो कां चढता हिमगिरी । पदीं दुरितांतें दूर करी ।
निःशेष पापांतें निवारी । ते यात्रा मुनीश्वरीं अवश्य कीजे ॥ ५४ ॥
निःशेष पापांतें निवारी । ते यात्रा मुनीश्वरीं अवश्य कीजे ॥ ५४ ॥
हिमालय पर्वत चढू लागले असता, प्रत्येक पावला-पावलाने पातकनाश होत होत, सर्व पातकांचा नाश होतो. याकरितां मुनिश्रेष्ठांनी ती यात्रा अवश्य करावी ५४.
दंडकारण्य बृहद्वन । नैमिषारण्य आनंदवन ।
इत्यादि वनांचें गमन । संन्याशीं जाण करावें ॥ ५५ ॥
इत्यादि वनांचें गमन । संन्याशीं जाण करावें ॥ ५५ ॥
दंडकारण्य नांवाचे मोठे अरण्य, नैमिषारण्य, आनंदवन (काशीजवळ) इत्यादि वनांमध्ये संन्याशाने अवश्य जावें ५५.
च्यवनकपिलव्यासाश्रम । गौतमवामनआश्रमोत्तम ।
यात्रा श्रेष्ठ बदरिकाश्रम । जो सकळ कर्मदाहकु ॥ ५६ ॥
यात्रा श्रेष्ठ बदरिकाश्रम । जो सकळ कर्मदाहकु ॥ ५६ ॥
च्यवन, कपिल व व्यास यांचे आश्रम; गौतम व वामन यांचे उत्तमोत्तम आश्रम ; तसेच सर्व श्रमांचा परिहार करणारी बदरिकाश्रमाची श्रेष्ठ यात्रा ५६ ;
ऐशीं स्थळें जीं पावन । तेथें संन्याशियें करावें गमन ।
मार्गीं भिक्षार्थ जें अटन । तेंही निरूपण अवधारीं ॥ ५७ ॥
मार्गीं भिक्षार्थ जें अटन । तेंही निरूपण अवधारीं ॥ ५७ ॥
अशी जी पवित्र स्थळे आहेत, तेथें संन्याशाने अवश्य जावें. आतां मार्गामध्ये भिक्षेकरितां कोठें फिरावें तेंही सांगतों ऐक ५७.
हाट हाटवटिया अति उत्तम । त्यातें `पुर' म्हणती नरोत्तम ।
हाटहाटवटियाहीन तो `ग्राम' । भिक्षेचा नेम सारवा तेथें ॥ ५८ ॥
हाटहाटवटियाहीन तो `ग्राम' । भिक्षेचा नेम सारवा तेथें ॥ ५८ ॥
जेथें उत्तमोत्तम बाजार व रस्ते असतात, त्याला ज्ञातेलोक 'पुर' म्ह. शहर असे म्हणतात. ज्या गांवांत मोठमोठाले रस्ते किंवा बाजार नसेल त्याला 'ग्राम' म्हणतात. तेथे जाऊन आपल्या भिक्षेचा नेम पूर्ण करावा ५८.
गायीगौळियांचें निवासस्थान । `व्रत' त्यातें म्हणती जाण ।
`सार्थ' म्हणिजे पव्हा संपूर्ण । भिक्षार्थ अटन करावें तेथें ॥ ५९ ॥
`सार्थ' म्हणिजे पव्हा संपूर्ण । भिक्षार्थ अटन करावें तेथें ॥ ५९ ॥
गाई व गवळी जेथे राहतात, त्याला ' व्रज ' म्ह. गौळवाडा, असे म्हणतात. तसेंच 'सार्थ' म्हणजे पाणपोई असेल तेथे अथवा यात्रिक जनसमूहांत भिक्षेसाठी फिरावें ५९.
पवित्र भिक्षेचे प्राप्तीकारणें । संन्यासीं अवश्य जाणें ।
तेचि अर्थींचें निरूपणें । स्वयें श्रीकृष्ण सांगिजे ॥ १६० ॥
तेचि अर्थींचें निरूपणें । स्वयें श्रीकृष्ण सांगिजे ॥ १६० ॥
ह्याप्रमाणे पवित्र अशी मिक्षा मिळविण्याकरितां संन्याशाने अवश्य जात असावे. याच अर्थाचे निरूपण स्वतः श्रीकृष्ण सांगत आहेत १६०.
वानप्रस्थाश्रमपदेष्वभीक्षणं भैक्ष्यमाचरेत् ।
संसिद्धयत्याश्वसंमोहः शुद्धसत्त्वः शिलान्धसा ॥ २५ ॥
संसिद्धयत्याश्वसंमोहः शुद्धसत्त्वः शिलान्धसा ॥ २५ ॥
[श्लोक २५] शक्यतो वानप्रस्थींच्या आश्रमातूनच भिक्षा मागून आणावी कारण शेतात पडलेल्या दाण्यांपासून ते अन्न शिजवतात म्हणून ते पवित्र असते आणि ते खाल्ल्याने चित्त शुद्ध होऊन ताबडतोब मोह नष्ट होतो. (२५)
शुद्ध व्हावया अंतर । वानप्रस्थाश्रमी जो नर ।
जाऊनि ठाकावें त्याचें द्वार । अतिसादर भिक्षार्थ ॥ ६१ ॥
जाऊनि ठाकावें त्याचें द्वार । अतिसादर भिक्षार्थ ॥ ६१ ॥
अंतःकरण शुद्ध होण्याकरिता वानप्रस्थाश्रमामध्ये जो पुरुष असेल, त्याच्या दारांत भिक्षेकरितां मोठ्या आदराने जाऊन उभे रहावें ६१.
सेवितां सात्त्विकाचे अन्नासी । शुद्धसत्त्वता साधकासी ।
तत्काळ होय ग्रासोग्रासीं । शुद्ध अन्नासी हा महिमा ॥ ६२ ॥
तत्काळ होय ग्रासोग्रासीं । शुद्ध अन्नासी हा महिमा ॥ ६२ ॥
कारण, सात्विकाचे अन्न सेवन केले असता साधकांच्या अंगीही प्रत्येक घासाला शुद्धसत्त्वपणा उत्पन्न होतो. असा शुद्ध अन्नाचा महिमा आहे ६२.
यालागीं वानप्रस्थाचें द्वार । ठाकोनिजावें वारंवार ।
तेणें सत्त्वशुद्धि अनिवार । होय साचार साधकां ॥ ६३ ॥
तेणें सत्त्वशुद्धि अनिवार । होय साचार साधकां ॥ ६३ ॥
ह्याकरितां वानप्रस्थाचे दार पाहून तेथे वारंवार जात असावें. तेणेंकरून साधकांची अनिवार सत्त्वशुद्धि होते ६३.
शुद्ध भिक्षेचिये प्राप्ती । सत्त्वशुद्ध होय वृत्ती ।
तेणें वासना निःशेष नासती । निजशांती उल्हासे ॥ ६४ ॥
तेणें वासना निःशेष नासती । निजशांती उल्हासे ॥ ६४ ॥
शुद्ध भिक्षा मिळाली म्हणजे वृत्तिही सत्वशुद्ध होते; आणि तेणेकरून वासनाही निःशेष नाहीशी होऊन आत्मशांति प्रगट होते ६४.
वासना नासल्या निलाग । तो सत्यत्वें न देखे जग ।
विषयासक्ति कैंची मग । सहज विराग उद्भट ॥ ६५ ॥
विषयासक्ति कैंची मग । सहज विराग उद्भट ॥ ६५ ॥
निःशेष वासना गेली म्हणजे त्याला जग सत्यत्वाने दिसतच नाही. मग विषयासक्ति कोठची? तेव्हां अर्थातच उत्कट वैराग्य उत्पन्न होते ६५.
नैतद्वस्तुतया पश्येद् दृश्यमानं विनश्यति ।
असक्तचित्तो विरमेदीहामुत्र चिकीर्षितात् ॥ २६ ॥
असक्तचित्तो विरमेदीहामुत्र चिकीर्षितात् ॥ २६ ॥
[श्लोक २६] संन्याशाने दृश्य जगाला सत्य मानू नये कारण ते नाश पावते कोठेही आसक्ती नसावी इहलोकी किंवा परलोकी काहीही करण्याची इच्छा बाळगू नये. (२६)
येथ जें जें दिसे नासे । हें सर्वांसी प्रत्यक्ष आभासे ।
परी अज्ञानें भुलले कैसे । विषयविलासें गुंतोनी ॥ ६६ ॥
परी अज्ञानें भुलले कैसे । विषयविलासें गुंतोनी ॥ ६६ ॥
-या लोकामध्ये जे जे म्हणून दिसतें तें तें नाश पावते, हे सर्वांना प्रत्यक्ष दिसतेच; परंतु विषयाला वश होऊन व त्यांत गुंतून पडून अज्ञान लोक कसे भुलले आहेत पहा! ६६.
यालागीं शुद्ध भिक्षेचिये प्राप्ती । ज्याची शुद्धसत्व झाली वृत्ती ।
त्यासी विषय सत्यत्वें न दिसती । मा विषयासक्ती तेथें कैंची ॥ ६७ ॥
त्यासी विषय सत्यत्वें न दिसती । मा विषयासक्ती तेथें कैंची ॥ ६७ ॥
ह्याकरितां शुद्ध भिक्षेच्या प्राप्तीने ज्याची वृत्ति शुद्धसत्त्वात्मक झाली, त्याला विषय हे सत्यत्वाने दिसतच नाहीत; मग विषयासक्ति कोठली १६७.
ऐसें मिथ्या विषयांचें भान । त्याचें विषयासक्त नव्हे मन ।
यालागीं भवस्वर्गसाधन । दोन्ही तो जाण स्पर्शेना ॥ ६८ ॥
यालागीं भवस्वर्गसाधन । दोन्ही तो जाण स्पर्शेना ॥ ६८ ॥
ह्याप्रमाणे विषयाचे ज्याला मिथ्या भान असते, त्याचे मन विषयासक्त होत नाही. म्हणून संसाराच्या किंवा स्वर्गाच्या, दोहोंच्याही साधनांना तो स्पर्श करीत नाही ६८.
ऐसा जो विषयविरक्त । त्याचें परमार्थीं लागे चित्त ।
तो जगीं विचरे अनासक्त । परमार्थयुक्त निजबोधें ॥ ६९ ॥
तो जगीं विचरे अनासक्त । परमार्थयुक्त निजबोधें ॥ ६९ ॥
ह्याप्रमाणे जो विषयविरक्त असतो, त्याचेंच परमार्थाकडे चित्त लागून राहते आणि तो निजबोधाने परमार्थयुक्त होऊन जगामध्ये अनासक्तपणेच हिंडत असतो ६९.
त्याच्या निजबोधाचें लक्षण । स्वयें सांगताहे नारायण ।
प्रपंचाचें मिथ्यापण । समाधान निजात्मता ॥ १७० ॥
प्रपंचाचें मिथ्यापण । समाधान निजात्मता ॥ १७० ॥
त्याच्या निजबोधाचे लक्षण म्ह. प्रपंचाचे मिथ्यात्व आणि आत्मस्वरूपाने येणारे समाधान श्रीकृष्ण स्वत: सांगत आहेत १७०.
यदेतदात्मनि जगन्मनोवाक्क्ष्प्राणसंहतम् ।
सर्वं मायेति तर्केण स्वस्थस्त्यक्त्वा न तत्स्मरेत ॥ २७ ॥
सर्वं मायेति तर्केण स्वस्थस्त्यक्त्वा न तत्स्मरेत ॥ २७ ॥
[श्लोक २७] संन्याशाने आत्म्यामध्ये दिसणारे मन, वाणी आणि प्राण यांचा संघात असलेले हे जग म्हणजे माया आहे, असा निश्चय करून त्याचा त्याग करावा व आत्मस्वरूपात स्थिर राहून त्याचे कधीही स्मरण करू नये. (२७)
मनसा-वाचा-प्राणप्रवाहीं । अहंकारकृत उभयदेहीं ।
जग आत्म्याच्या ठायीं । मिथ्या मायिक पाहीं आभासे ॥ ७१ ॥
जग आत्म्याच्या ठायीं । मिथ्या मायिक पाहीं आभासे ॥ ७१ ॥
मन, वाणी व प्राण ह्यांच्या प्रवाहांत अहंकाराने केलेले जे दोन्ही देह व इतर जग हे आत्म्याच्या ठिकाणी मिथ्या मायिक आहे असाच भास होतो ७१.
दोराअंगीं सर्पाभास । शुक्तिकेमाजीं रजतप्रकाश ।
उखरीं मृगजळाचा विलास । तैसा जगदाभास चिन्मात्रीं ॥ ७२ ॥
उखरीं मृगजळाचा विलास । तैसा जगदाभास चिन्मात्रीं ॥ ७२ ॥
दोरामध्ये सर्पाचा भास, शिंपीमध्ये रुप्याचा भास, किंवा उन्हामध्ये मृगजळाचा भास होतो, त्याप्रमाणेच चिन्मात्रब्रह्मस्वरूपामध्ये जगाचा आभास होतो ७२.
जैसा स्वप्नींचा व्यवहार । तैसें भासे चराचर ।
ऐसें मिथ्या जाणोनि साचार । पुढती स्मरणादर स्फुरेना ॥ ७३ ॥
ऐसें मिथ्या जाणोनि साचार । पुढती स्मरणादर स्फुरेना ॥ ७३ ॥
स्वप्नांतील जसा व्यवहार असतो, त्याप्रमाणेच हें सारें चराचर भासतें. अशा प्रकारे हे सारे खरोखर मिथ्या आहे अशी खात्री झाली म्हणजे मग पुढे स्मरणाविषयी आदर राहात नाहीं ७३.
जो जागा झाला इत्थंभूत । तैं स्वप्नभोग न वांछी चित्त ।
तेवीं स्वरूपीं जो सुनिश्चित । तो प्रपंचजात स्मरेना ॥ ७४ ॥
तेवीं स्वरूपीं जो सुनिश्चित । तो प्रपंचजात स्मरेना ॥ ७४ ॥
जो चांगला जागा होतो, त्याचे मन स्वप्नांतील सुखाची काही इच्छा करीत नाही; त्याप्रमाणे स्वस्वरूपामध्ये ज्याचे मन स्थिर झालें, तो कोणत्याही प्रपंचवस्तूचे स्मरण करीत नाही ७४.
त्रिदंडी बहूदकाचें कर्म । तुज म्यां सांगितलें सुगम ।
आता हंस परमहंसांचे धर्म । यथानुक्रम अवधारीं ॥ ७५ ॥
आता हंस परमहंसांचे धर्म । यथानुक्रम अवधारीं ॥ ७५ ॥
याप्रमाणे त्रिदंडी' आणि 'बहूदक' या संन्याशांचे कर्म मी तुला सुगम करून सांगितले. आतां 'हंस' व 'परमहंस' ह्यांचे धर्मही यथानुक्रमाने सांगतों ऐक ७५.
संन्यास चतुर्विध देख । `हंस' `परमहंस' एक ।
एक तो `बहूदक' । `कुटीचक' तो भिन्न ॥ ७६ ॥
एक तो `बहूदक' । `कुटीचक' तो भिन्न ॥ ७६ ॥
संन्यासही चार प्रकारचा आहे हे लक्षात ठेव. एक 'हंस' व दुसरा 'परमहंस': तिसरा 'बहूदक' आणि चौथा त्याहून भिन्न आहे त्यास 'कुटीचक' असें म्हणतात ७६.
कर्म त्यागोनि झाला संन्यासी । ज्ञान ध्यान नाहीं मानसीं ।
अन्नालागी सग्रामवासी । 'लुटीचक' तयासी बोलिजे ॥ ७७ ॥
अन्नालागी सग्रामवासी । 'लुटीचक' तयासी बोलिजे ॥ ७७ ॥
कर्म टाकून संन्यासी झाला, पण मनामध्ये ध्यानही नाही आणि ज्ञानही नाही; आणि अन्नासाठी आपल्या गांवांतच राहतो, त्याला 'कुटीचक ' असे म्हणतात ७७.
वार्धकीं कुटीचकाची परी । अग्निहोत्र-स्त्रियेचा त्याग करी ।
परी शिखासूत्र न अव्हेरी । गायत्रीमंत्रीं अधिकारु ॥ ७८ ॥
परी शिखासूत्र न अव्हेरी । गायत्रीमंत्रीं अधिकारु ॥ ७८ ॥
कुटीचक असतो त्याचा प्रकार असा की वार्धक्यामध्ये अग्निहोत्र आणि स्त्री ही टाकून देतो, परंतु शिखासूत्र टाकीत नाही, म्हणून त्याला गायत्रीमंत्राचा अधिकार असतो ७८.
नित्य भिक्षा पुत्राचे घरीं । पर्णकुटी बांधे त्याचे द्वारीं ।
मठिका सांडोनि न वचे दूरी । `कुटीचक' निर्धारीं या नांव ॥ ७९ ॥
मठिका सांडोनि न वचे दूरी । `कुटीचक' निर्धारीं या नांव ॥ ७९ ॥
नित्यशः पुत्राच्या घरींच भिक्षा घ्यावयाची, त्याच्याच दारांत पर्णकुटी बांधावयाची, आणि मठी सोडून लांब कोठे जावयाचे नाही, म्हणून त्याचे नांव 'कुटीचक' होय ७९.
शिखासूत्र त्यागोनि जाण । करूनि त्रिदंडांचें ग्रहण ।
केवळ करी कर्माचरण । ज्ञानाचें लक्षण जाणेना ॥ १८० ॥
केवळ करी कर्माचरण । ज्ञानाचें लक्षण जाणेना ॥ १८० ॥
शिखासूत्राचा त्याग करून, त्रिदंडाचे ग्रहण करून, केवळ कर्माचरण करतो; पण ज्ञानाचे रक्षण मुळीच समजत नाही १८०
नाहीं वैराग्य वरिष्ठ । न दिसे ज्ञाननिष्ठा श्रेष्ठ ।
अतिशयेंसीं जो कर्मिष्ठ । `बहूदक' ज्येष्ठ त्यासी म्हणती ॥ ८१ ॥
अतिशयेंसीं जो कर्मिष्ठ । `बहूदक' ज्येष्ठ त्यासी म्हणती ॥ ८१ ॥
निस्सीम वैराग्य नाही: ज्ञानावरही निष्ठा चांगली दिसत नाही आणि कर्मठ मात्र अतिशय. तोच 'बहूदकां' मध्ये श्रेष्ठ म्हटला जातो ८१.
जो कां वैराग्याच्या निर्धारीं । ज्ञानसाधनार्थ विचारी ।
शिखासूत्रकर्मत्याग करी । आत्मचिंतनावरी निजनिष्ठा ॥ ८२ ॥
शिखासूत्रकर्मत्याग करी । आत्मचिंतनावरी निजनिष्ठा ॥ ८२ ॥
आणि वैराग्याच्या निर्धाराने ज्ञानसाधनाचा विचार करणारा; शिखासूत्र व कर्म यांचा त्याग करून आत्मचिंतनावरच ज्याची निष्ठा असा ज्याचा त्यागविलास असतो ८२.
ऐसा जो त्यागविलास । या नांव `विविदिषा' संन्यास ।
ऐशिया निष्ठें वर्ते तो `हंस' । एक `परमहंस' हा म्हणती ॥ ८३ ॥
ऐशिया निष्ठें वर्ते तो `हंस' । एक `परमहंस' हा म्हणती ॥ ८३ ॥
त्याला 'विविदिष' संन्यास असे म्हणतात आणि अशा दृढ निष्ठेनें जो वागतो, त्याला 'हंस' असे म्हणतात. कोणी यालाच 'परमहंस' ही म्हणतात ८३.
ऐक परमहंसाचें लक्षण । ज्ञानपरिपाकें परिपूर्ण ।
अतएव शांति वोळंगे आंगण । देखे तिन्ही गुण मिथ्यात्वें ॥ ८४ ॥
अतएव शांति वोळंगे आंगण । देखे तिन्ही गुण मिथ्यात्वें ॥ ८४ ॥
आतां परमहंसाचे लक्षण ऐक. तो ज्ञाननिष्ठेने परिपूर्ण असतो. म्हणून शांतिही त्याच्या दारांत राबत असते. तो तिनी गुण मिथ्या मानीत असतो ८४.
मिथ्या जाणे कर्माची वार्ता । आपुली देखे नित्य निष्कर्मता ।
कर्मक्रिया जो कर्तव्यता । ते प्रकृतीचे माथां प्रारब्धें ॥ ८५ ॥
कर्मक्रिया जो कर्तव्यता । ते प्रकृतीचे माथां प्रारब्धें ॥ ८५ ॥
कर्माची वार्ता तो मिथ्याच मानतो आणि आपण नित्य निष्कर्मच आहो असें तो जाणतो. तसेंच कर्म, क्रिया व कर्तव्यता ही प्रारब्धानुसार होणारी प्रकृतीच्याच माथ्यावर तो ठेवतो (आपल्या अंगावर घेत नाही) ८५.
ऐशिया स्थितीं सावकाश । त्या नांव जाण `परमहंस' ।
नाहीं मठ मठिका विलास । नित्य उदास निराश्रयी ॥ ८६ ॥
नाहीं मठ मठिका विलास । नित्य उदास निराश्रयी ॥ ८६ ॥
अशा स्थितीने जो समाधानांत राहातो, त्याचे नाव 'परमहंस'. त्याला मठ मठी वगैरेची यातायात नको असते. तो नित्य उदास आणि निराश्रयीच राहातो ८६.
आतां हंस-परमहंसांचे धर्म । स्वयें सांगताहे पुरुषोत्तम ।
त्या धर्माचें विशद वर्म । ऐक सुगम उद्धवा ॥ ८७ ॥
त्या धर्माचें विशद वर्म । ऐक सुगम उद्धवा ॥ ८७ ॥
आता उद्धवा! त्या हंस-परमहंसाचे धर्म आणि त्यांतील मर्म सुगम रीतीने विशद करून सांगतों ऐक. असें म्हणून श्रीकृष्ण स्वतःच ते सांगत आहेत ८७.
ज्ञाननिष्ठो विरक्तो व मद्भक्तो वाऽनपेक्षकः ।
सलिङ्गानाश्रमांस्त्यक्त्वा चरेदविधिगोचरः ॥ २८ ॥
सलिङ्गानाश्रमांस्त्यक्त्वा चरेदविधिगोचरः ॥ २८ ॥
[श्लोक २८] ज्ञाननिष्ठ, विरक्त अथवा कशाचीच अपेक्षा नसलेला माझा भक्त यांनी आश्रम किंवा त्याची चिह्ने यांचा त्याग करावा व शास्त्राने सांगितलेल्या विधिनिषेधांचीही पर्वा न करता स्वच्छंदपणे वागावे. (२८)
विषयांची नावडे मातु । ज्ञानप्राप्तीलागीं उद्यतु ।
यापरी जो अतिविरक्तु । तो संन्यास बोलिजेतु मुख्यत्वें ॥ ८८ ॥
यापरी जो अतिविरक्तु । तो संन्यास बोलिजेतु मुख्यत्वें ॥ ८८ ॥
विषयाची वार्तासुद्धा आवडत नाही, ज्ञानप्राप्तीसाठी उद्युक्त, असा जो अत्यंत विरक्त असेल, त्यालाच मुख्यत्वेकरून 'संन्यास' असे म्हणतात ८८.
जो ज्ञाननिष्ठा अतिसंपन्न । सदा स्वरूपीं रंगलें मन ।
कदा न मोडे अनुसंधान । परमहंसासमान हा हंस ॥ ८९ ॥
कदा न मोडे अनुसंधान । परमहंसासमान हा हंस ॥ ८९ ॥
जो ज्ञाननिष्ठेने अत्यंत संपन्न असतो, ज्याचे मन स्वरूपामध्ये सदासर्वदा रंगलेले असते आणि आत्मस्वरूपाचे अनुसंधान ज्याचे कधीही मोडत नाही. हा हंसही परमहंसाप्रमाणेच होय ८९.
ज्यासी करितां भगवद्भक्ती । अपेक्षामात्राची झाली शांती ।
मोक्षापेक्षा नुपजे चित्तीं । हे संन्यासपद्धती अतिश्रेष्ठ ॥ १९० ॥
मोक्षापेक्षा नुपजे चित्तीं । हे संन्यासपद्धती अतिश्रेष्ठ ॥ १९० ॥
भगवद्भक्ति करीत असतां त्याच्या सर्व इच्छांची शांति झालेली असते ; ज्याच्या मनांत मोक्षाचीसुद्धा अपेक्षा राहत नाहीं, तीच संन्यासपद्धति अत्यंत श्रेष्ठ होय १९०.
ज्ञाननिष्ठ कां मद्भक्त । इहीं आश्रमधर्म दंडादियुक्त ।
त्याग करावा हृदयीं समस्त । बाह्य लोकरक्षणार्थं राखावे ॥ ९१ ॥
त्याग करावा हृदयीं समस्त । बाह्य लोकरक्षणार्थं राखावे ॥ ९१ ॥
जे ज्ञाननिष्ठ असून माझे भक्त असतील, त्यांनी दंडादिक आश्रमधर्माचा अंत:करणामधून त्याग करावा आणि बाह्य चिन्हें फक्त लोकशिक्षणाकरिता ठेवावीत ९१.
येचि अर्थींचें निरूपण । पुढें सांगेल श्रीकृष्ण ।
प्रस्तुत त्यागाचें लक्षण । ऐक संपूर्ण हरि बोले ॥ ९२ ॥
प्रस्तुत त्यागाचें लक्षण । ऐक संपूर्ण हरि बोले ॥ ९२ ॥
ह्याच अर्थाचे निरूपण पुढे श्रीकृष्ण सांगणार आहेत. तूर्त त्यागाचेंच सारे लक्षण ऐक. असें श्रीहरि म्हणाले ९२.
आश्रमधर्म समस्त करी । परी विधिकिंकरत्व तो न धरी ।
प्रतिबिंब कांपतां जळांतरी । आपण बाहेरी कांपेना ॥ ९३ ॥
प्रतिबिंब कांपतां जळांतरी । आपण बाहेरी कांपेना ॥ ९३ ॥
तो आश्रमधर्म सारे करतो, परंतु विधीचा दास होऊन मात्र राहात नाही. जलामध्ये प्रतिबिंब कापत असले तरी बाहेरचे बिंब कांहीं कांपत नाहीं ९३.
तेवीं स्वधर्मकर्म कर्तव्यता । करी परी नाहीं कर्मठता ।
आपुली कर्मातीतता । जाणे तत्त्वतां निजकर्मी ॥ ९४ ॥
आपुली कर्मातीतता । जाणे तत्त्वतां निजकर्मी ॥ ९४ ॥
त्याप्रमाणे स्वधर्मकर्म-कर्तव्यता तो करतो, पण कर्मठपणा बाळगीत नाही. आपल्या सर्व कर्मामध्ये तो आपली कर्मातीतता पक्की ओळखून असतो ९४.
यापरी स्वधर्मकर्म करी । परी विधीचें भय तो न धरी ।
विधिनिषेध घालून तोडरीं । कर्मे करी अहेतुक ॥ ९५ ॥
विधिनिषेध घालून तोडरीं । कर्मे करी अहेतुक ॥ ९५ ॥
अशा रीतीने तो स्वधर्मकर्म करतो, पण विधीचं भय बाळगीत नाही. विधिनिषेध पायांखाली तुडवून तो अहेतुक कर्में करतो ९५.
जो नातळे स्वाश्रमकर्मगती । दंडादि लिंग न धरी हातीं ।
ऐसिया सर्वत्यागाची स्थिती । पुढें श्रीपती सांगेल ॥ ९६ ॥
ऐसिया सर्वत्यागाची स्थिती । पुढें श्रीपती सांगेल ॥ ९६ ॥
आपल्या आश्रमकर्माला शिवत नाही व दंडादि चिन्हेंही हाती धरीत नाही, अशा सर्वस्वत्यागाचे लक्षण पुढे श्रीकृष्ण सांगणार आहेत ९६.
प्रस्तुत हेंचि निरूपण । लोकरक्षणार्थ लिंगधारण ।
अंतरीं जो निष्कर्म जाण । त्याचे लक्षण हरी बोले ॥ ९७ ॥
अंतरीं जो निष्कर्म जाण । त्याचे लक्षण हरी बोले ॥ ९७ ॥
प्रस्तुत लोकाचाराकरितां दंडादि चिन्हें धारण करितो व अंत:करणामध्ये निष्काम राहातो, त्याचेंच लक्षण श्रीकृष्ण सांगत आहेत ९७.
बुधो बालकवत् क्रीडेत् कुशलो जडवच्यरेत् ।
वदेदुन्मत्तवद्विद्वान् गोचर्यां नैगमश्चरेत् ॥ २९ ॥
वदेदुन्मत्तवद्विद्वान् गोचर्यां नैगमश्चरेत् ॥ २९ ॥
[श्लोक २९] बुद्धिमान असूनही त्याने बालकाप्रमाणे खेळावे, हुशार असूनही मूर्खाप्रमाणे राहावे, विद्वान असूनही वेड्यासारखे बडबडावे आणि वेदवेत्ता असूनही पशूप्रमाणे वागावे. (२९)
विवेकज्ञान शुद्ध आहे । परी बाळकाच्या परी पाहे ।
मानापमान सुखें साहे । सांडोनि सोये देहाभिमानाची ॥ ९८ ॥
मानापमान सुखें साहे । सांडोनि सोये देहाभिमानाची ॥ ९८ ॥
त्याच्या ठिकाणी विवेकज्ञान शुद्ध असते; पण तो बालकासारखाच वागतो. देहाभिमान सोडून मान किंवा अपमान जें काय प्राप्त होईल, ते सुखाने सहन करतो ९८.
निजनैष्कर्में अतिकुशल । परी कर्मजडाऐसा केवळ ।
कर्में आचरे तो सकळ । कोठेंही विकळ दिसों नेदी ॥ ९९ ॥
कर्में आचरे तो सकळ । कोठेंही विकळ दिसों नेदी ॥ ९९ ॥
तो आपल्या नैष्कर्म्याने अत्यंत प्रवीण असतो; पण कर्मठासारखा सारी कर्में तो आचरण करतो; कोठेही कमी पडल्याचे दिसू देत नाहीं ९९.
जाणे धर्माधर्मलक्षण । सर्वार्थीं अतिसज्ञान ।
परी न करी प्रश्नसमाधान । अप्रमाणिक जाण स्वयें बोले ॥ २०० ॥
परी न करी प्रश्नसमाधान । अप्रमाणिक जाण स्वयें बोले ॥ २०० ॥
धर्माचं व अधर्माचे लक्षण तो चांगले जाणतो; साऱ्या बाबतीत तो ज्ञानसंपन्नच असतो. परंतु कोणी प्रश्न केल्यास समाधान करीत नाही. तो अज्ञान्यासारखा काही तरी प्रमाणरहितच बोलतो २००.
श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित
एकनाथी भागवत
एकनाथी भागवत अध्याय १ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ४ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ५ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ६ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ८ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १४ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १५ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १६ अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय विसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २७ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २८ अर्थासहित अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २९ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३० अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३१ अर्थासहित
Loading...