मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १८ ओव्या १ ते १००

    ॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥

    ॐ नमो कर्मप्रकाशका । सद्विद्याविधिविवेका ।
    कर्मधर्मप्रतिपाळका । जगन्नायका गुरुवर्या ॥ १ ॥
    हे कर्मप्रकाशका ! हे ब्रह्मविद्योपदेशविवेका! हे कर्मधर्मप्रतिपालका ! हे जगनायका! *ओंकारस्वरूप गुरुवर्या ! तुला नमस्कार असो १. 


    वर्णाश्रमादि मर्यादा । त्याचा सेतू तूं गोविंदा ।
    तूं कारण वेदानुवादा । विवादसंवादा तूं मूळ ॥ २ ॥
    हें गोविंदा ! वर्णाश्राच्या मर्यादेचा तू  आधार आहेस. वेदानुवादाचे कारण तूंच आहेस; आणि विवादाचे व संवादाचें मूळही तूंच आहेस २.


    तूं शब्दसृष्टीचा अर्कु । तूं वेदगुह्यप्रकाशकु ।
    तूंचि एकला अनेकु । व्याप्य व्यापकु तूंचि तूं ॥ ३ ॥
    शब्दसृष्टीचा तूं देदीप्यमान सूर्य आहेस; तूं वेदांतील गूढार्थाचा प्रकाशक आहेस; तूं एकटाच असून अनेक झाला आहेस; व्याप्य आणि व्यापकही तूंच आहेस ३.


    तूंचि तूं विधि विधान । तूं बोलका तूंचि मौन ।
    एका आणि जनार्दन । दोनी संपूर्ण तूं गुरुराया ॥ ४ ॥
    विधि व विधान तूंच ; बोलकाही तूंच; आणि मौनही तूंच ; हे गुरुराजा! एका आणि जनार्दन हे दोघेही पूर्णपणे तूंच आहेस ४.


    यालागीं श्रीभागवता । तूंचि अर्थ तूं कविता ।
    तूंचि अर्थावबोधकता । हेंही बोलविता तूंचि आम्हां ॥ ५ ॥
    वास्तव श्रीभागवतांतील कविता तूंच व अर्थही तूंच, आणि अर्थज्ञान सुद्धा तूंच असून आम्हांकडून हे बोलविणाराही तूंच आहेस ५.


    जैशीं आपुलींचि उत्तरें । पडसादें होतीं प्रत्युत्तरें ।
    तेवीं माझेनि मुखांतरें । तूं कवित्वद्वारें बोलका ॥ ६ ॥
    आपलेच शब्द ज्याप्रमाणे प्रतिध्वनीमध्ये उत्तरे देतात, त्याप्रमाणेच माझ्या मुखावाटे कवित्वाच्या रूपाने तूंच बोलका आहेस ६.


    बोलका श्रीभागवतीं । श्रीकृष्ण कृपामूर्ती ।
    तेणें वर्णाश्रम‍उत्पत्ति । यथास्थिती सांगितली ॥ ७ ॥
    श्रीभागवतामध्ये कृपामूर्ति श्रीकृष्ण हाच वक्ता आहे. त्याने वर्णाश्रमाची उत्पत्ति यथार्थ रीतीने सांगितली ७.


    सप्तदशाध्यायीं सुगम । सांगितले ब्रह्मचर्य-धर्म ।
    गृहस्थाचें स्वधर्मकर्म । नित्यनेम निरूपिले ॥ ८ ॥
    सतराव्या अध्यायामध्ये श्रीकृष्णांनी ब्रह्मचर्याचा धर्म सुगम करून सांगितला, आणि गृहस्थाच्या स्वधर्माचें व नित्यनेमाचेही निरूपण केलें ८.


    आतां अष्टादशाध्यायीं जाण । वानप्रस्थाश्रमलक्षण ।
    संन्यासधर्माचें निरूपण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ ९ ॥
    आता अठराव्या अध्यायांत वानप्रस्थाश्रमाचे लक्षण व संन्यासधर्माचे निरूपणही श्रीकृष्ण स्वतः सांगत आहेत ९.


    श्रीभगवानुवाच-
    वनं विविक्षुः पुत्रेषु भार्यां न्यस्य सहैव वा ।
    वन एव वसेच्छान्तस्तृतीयं भागमायुषः ॥ १ ॥
    [श्लोक १] श्रीकृष्ण म्हणतात गृहस्थाश्रमी मनुष्य जर वानप्रस्थआश्रमात जाऊ इच्छित असेल, तर त्याने आपल्या पत्‍नीला पुत्रांकडे सोपवावे किंवा आपल्याबरोबर घेऊन जावे आणि आपल्या आयुष्याचा तिसरा भाग वनातच राहून शांत चित्ताने व्यतीत करावा. (१)


    आतां क्रमेंचि निरूपण । वानप्रस्थाचें आलें जाण ।
    त्यासी वनास निघावया कारण । आयुष्यलक्षण विभाग ॥ १० ॥
    आतां क्रमानेच वानप्रस्थाचे निरूपण आले. त्याला वनाला जाण्यास निघण्यासाठी आयुष्याचे विभाग हेच कारण आहेत १०.


    'शतायुःपुरुष'-मर्यादा श्रुती । त्याच्या तृतीयभागाची स्थिती ।
    सासष्टी क्रमिल्याअंतीं । वनाप्रती निघावें ॥ ११ ॥
    श्रुतीमध्ये पुरुषाच्या आयुष्याची मर्यादा शंभर वर्षे सांगितली आहे; त्यांतील दोन भाग जाऊन तिसरा भाग सुरू झाल्यानंतर म्हणजे सासष्टी लागली की, अरण्यांत जाण्याची तयारी करावी ११.


    निघावया वनाप्रती । भार्या देऊनि पुत्राचे हातीं ।
    आपण निघावें शीघ्रगतीं । वानप्रस्थीं वनवासा ॥ १२ ॥
    वनाला जाण्यापूर्वी बायकोला पुत्राच्या स्वाधीन करावी, आणि आपण सत्वर वानप्रस्थाश्रम स्वीकारण्याकरितां वनांत जावें १२.


    भार्या साध्वी पतिव्रता सती । ईश्वरस्वरूप मानी पती ।
    भ्रतार निघतां वानप्रस्थीं । जे पुत्राप्रती राहेना ॥ १३ ॥
    महान् साध्वी सती व पतिव्रता स्त्री पतीला केवळ ईश्वरस्वरूप मानून वागणारी व पति वानप्रस्थाश्रम घेण्यासाठी वनांत निघाला असता पुत्रापाशी राहण्यास तयार नसते १३, 


    सांडितां भ्रतारसेवेसी । कल्पांत हों पाहे जिसी ।
    जे भ्रतारचरणांची दासी । ते सवें वनासी आणावी ॥ १४ ॥
    पतीची सेवा अंतरली तर जिला केवळ कल्पान्त झाला असे वाटते, जी पतीच्या चरणाची केवळ दासी, अशी असेल तर तिला आपल्याबरोबर वनांत घेऊन जावें १४.


    जो पुरुष स्त्रीसमवेत । वनीं झाला वानप्रस्थ ।
    तेणें स्त्रीकामासी अलिप्त । व्हावें दृढव्रत ते आश्रमीं ॥ १५ ॥
    ज्या पुरुषाने स्त्रीसहवर्तमान वनांत येऊन वानप्रस्थाश्रम स्वीकारला, त्याने त्या आश्रमामध्ये स्त्रीकामापासून अलिप्त राहून तेच व्रत  दृढतर चालवावें १५.


    जो वानप्रस्थवनवासी । तेणें दृढ धरावी शांति मानसीं ।
    नातळावें कामक्रोधासी । हेही व्रत त्यासी आवश्यक ॥ १६ ॥
    ज्याने वनांत जाऊन वानप्रस्थाश्रम स्वीकारला, त्याने मनामध्ये दृढ शांति धारण करावी; कामक्रोधाला स्पर्शही करूं नये, हेही व्रत त्याला आवश्यक आहे १६.


    कन्दमूलफलैर्वन्यैर्मेध्यैर्वृत्तिं प्रकल्पयेत् ।
    वसीत वल्कलं वासस्तृणपर्णाजिनानि च ॥ २ ॥
    [श्लोक २] वनातील पवित्र कंदमुळे आणि फळे खाऊनच त्याने उदरनिर्वाह करावा वस्त्रांऐवजी झाडांच्या साली, झाडांची पाने, मृगचर्म यांचाच उपयोग करावा. (२)


    वनींचीं कंदमूळफळें । जीं निपजलीं ऋतुकाळें ।
    तींही अतिपवित्रें निर्मळें । आहार तेणें मेळें करावा ॥ १७ ॥
    वनामध्ये ज्या ज्या ऋतूंत जी जी कंदमुळे व फळे मिळतील, त्यांतील अत्यंत निर्मल व पवित्र असतील ती घेऊन त्यावर निर्वाह करीत जावा १७.


    वनवासीं वस्त्रें जाण । वल्कलें व्याघ्रमृगाजिन ।
    अथवा नेसावें केवळ तृण । कां पर्णाभरण वृक्षांचें ॥ १८ ॥
    वनवासांत असतांना वल्कलें, व्याघ्रांबर किंवा मृगचर्म हीच वस्त्रें  वापरावीत; अथवा नुसतें गवत नेसावे, किंवा झाडांच्या पानांचे वस्त्र करावें १८.


    वानप्रस्थीं नेमग्रहण । ऐक त्याचेंही लक्षण ।
    त्या नेमाचें निरूपण । स्वयें नारायण सांगत ॥ १९ ॥
    आतां वानप्रस्थ आश्रमामध्ये नेम कसा व कोणता धरावा, त्याचेही लक्षण ऐक. त्या नेमाचे निरूपण स्वतः नारायण सांगत आहेत १९.


    केशरोमनखश्मश्रु मलानि बिभृयाद्दतः ।
    न धावेदप्सु मज्जेत त्रिकालं स्थण्डिलेशयः ॥ ३ ॥
    [श्लोक ३] केस, लव, नखे आणि दाढीमिशारूप शरीरावरील मळ काढू नये दात दंतमंजन इत्यादीने घासू नयेत पाण्यात शिरून दिवसातून तीन वेळा स्नान करावे आणि जमिनीवरच झोपावे. (३)


    केश म्हणिजे मस्तकींचे । श्मश्रु बोलिजे मुखींचे ।
    रोम ते कक्षोपस्थींचे । छेदन यांचें न करावें ॥ २० ॥
    'केश' म्हणजे मस्तकावर येतात ते व 'श्मश्रू' म्हणजे मुखावर केस येतात ते ; आणि रोम' म्हणजे कार्खेत व गुह्यभागाच्या ठिकाणी जे केस येतात ते ; ह्यांपैकी कोणत्याही केशांचें छेदन करूं नये २०.


    मस्तकीं न करावें वपन । न करावें श्मश्रुकर्म जाण ।
    न करावें रोमनखच्छेदन । दंतधावन न करावें ॥ २१ ॥
    मस्तकाचे कधीं वपन करूं नये, इमश्रही करूं नये किंवा इतर ठिकाणचे केस व नखेही काढू नयेत : तसेच दांतही घांसू नयेत २१.


    स्नान मुसलवत् केवळ । अवश्य करावें त्रिकाळ ।
    प्रक्षाळावे ना शरीरमळ । व्रत प्रबळ वनस्था ॥ २२ ॥
    स्नान मात्र तीन त्रिकाळ अवश्यमेव करावें ; पण ते फक्त मुसळासारखे आंत बुडून निघावे. शरीरावरील मळ धुऊ नये. हेच वानप्रस्थाचें मोठे व्रत आहे २२.


    केवळ भूमीवरी शयन । सदासर्वदा करावें जाण ।
    तळीं घालावें ना तृण । मग आस्तरण तें कैंचें ॥ २३ ॥
    सदा सर्वदा नुसत्या जमिनीवर निजावें. खाली गवतसुद्धा घालू नये, मग वस्त्राची गोष्ट कोठची? २३.


    यापरी वानप्रस्थें जाण । दृढ धरूनि व्रतधारण ।
    करावें तपाचरण । तें तपलक्षण अवधारीं ॥ २४ ॥
    याप्रमाणे वानप्रस्थानें  दृढतर व्रत धारण करून तप करावे. त्या तपाचे लक्षण आतां ऐक २४.


    ग्रीष्मे तप्येत पञ्चाग्नीन् वर्षास्वासारषाड्वले ।
    आकण्ठमग्नः शिशिर एवं वृतस्तपश्चरेत् ॥ ४ ॥
    [श्लोक ४] उन्हाळ्यात चार बाजूला अग्निकुंडे पेटवून त्यामध्ये राहून डोक्यावर ऊन घ्यावे हे पंचाग्निसाधन होय पावसाळ्यात अंगावर पावसाचा मारा सहन करावा थंडीच्या दिवसात गळ्यापर्यंत पाण्यात बुडून राहावे अशा रीतीने राहून तप करावे. (४)


    उष्णकाळीं पंचाग्नीं । अग्निकुंडे चहूं कोणीं ।
    पांचवा रवि माध्याह्नीं । ऐसा पंचाग्नी साधावा ॥ २५ ॥
    उन्हाळ्यामध्ये पंचाग्निसाधन करावें. चार बाजूंला चार अग्निकुंडे पेटवावी व डोकीवर मध्यान्हीचा सूर्य तळपत असावा, याला 'पंचाग्निसाधन' म्हणतात २५.


    माळा करोनि उच्च प्रदेशीं । धन वर्षतां धारावर्त्तेंसीं ।
    तेथ व्हावें आकाशवासी । वर्षाकाळीं ऐसी तपप्राप्ती ॥ २६ ॥
    पावसाळ्यांत उंच ठिकाणी माळा बांधून मुसळधार पाऊस पडूं लागला असता त्याच्यावर उघडे जाऊन बसावें, हे वर्षाकालांतील तप होय २६.


    आलिया हेमंतऋतूसी । आकंठमग्न जळावासी ।
    जळ वास करावा निशीं । हे वानप्रस्थासी तपक्रिया ॥ २७ ॥
    थंडीचे दिवस आले म्हणजे रात्रीच्या वेळी गळ्यापर्यंत पाण्यात बुडून बसावें. हेच वानप्रस्थाचे तपाचरण होय २७.


    हे तपक्रिया प्रतिवरूषीं । विहित वानप्रस्थासीं ।
    वयसापरत्वें भक्षणासी । हृषीकेशी सांगत ॥ २८ ॥
    ही तपाची क्रिया, वानप्रस्थाला प्रत्येक वर्षाला विहित आहे. आतां वयपरत्वे खाण्याचे पदार्थ कोणते कोणते तें श्रीकृष्ण सांगतात २८.


    अग्निपक्वं समश्नीयात्कालपक्वमथापि वा ।
    उलूखलाश्मकुट्टो वा दन्तोलूखल एव वा ॥ ५ ॥
    [श्लोक ५] अग्नीत भाजलेले अन्न किंवा काळानुसार पिकलेली फळे खाऊन भूक भागवावी ते बारीक करण्याची आवश्यकता असेल, तर उखळामध्ये घालून किंवा दगडांनी ठेचून कुटावे, किंवा दातांनी चावून खावे. (५)


    अगीस्तव पाका आलीं । कां काळें जीं परिपक्व झालीं ।
    तीं तापसालागीं भलीं । आहारीं विहिलीं उदरार्थ ॥ २९ ॥
    अग्नीवर शिजविलेली (किंवा अग्नीत भाजलेली कंदमूलें) किंवा ऋतुमानाप्रमाणे पिकलेली फळे असतील, तीच उदरनिर्वाहाकरितां खाणें तपस्व्याला उचित होय २९.


    दांत असलिया बळी । फळें खावी तेणें सगळीं ।
    कां गेलिया दांत समूळीं । कांडूनि उखळीं सुखे खावीं ॥ ३० ॥
    दांत बळकट असतील तर त्याने सगळींच्या सगळीच फळे खावीत; किंवा दांत सारेच पडले असतील, तर त्याने ती खुशाल उखळांत कांडून खावीत ३०.  


    जरी उखळ न मीळे वनीं । तरी खावीं दगडें ठेंचुनी ।
    नाहीं चाड गोडपणीं । क्षुधानिवारणीं आहारार्थ ॥ ३१ ॥
    वनामध्ये उखळ मिळाले नाही, तर ती दगडाने ठेचून खावीत. रुचकर असावीत अशी इच्छा धरूं नये; कोणीकडून तरी भूक निवारण व्हावी असाच हेतु धरावा ३१.


    स्वयं सञ्चिनुयात्सर्वमात्मनो वृत्तिकारणम् ।
    देशकालबलाभिज्ञो नाददीतान्यदाहतम् ॥ ६ ॥
    [श्लोक ६] देश, काळ आणि आपल्या शरीराची कुवत पाहून पोट भरण्यासाठी लागणारी सर्व सामग्री स्वतःच जमवावी दुसर्‍यांनी दिलेल्या वस्तू वापरू नयेत. (६)


    ऋतुकाळीं फळें संपूर्णें । तीं कालांतराकारणें ।
    संग्रहो सर्वथा न करणें । व्रतधारणें वनस्था ॥ ३२ ॥
    फळांचा ऋतु असला म्हणजे ती पुष्कळ मिळतात, म्हणून ती पुढे उपयोगी पडतील अशा दृष्टीने त्यांचा कधीही सांठा करून ठेवू नये. हेंच वानप्रस्थाचे व्रत होय ३२.


    पूर्वदिवसीं फळें आणिलीं । अपरदिवसीं जरी उरलीं ।
    ती अवश्य पाहिजे त्यागिलीं । नाहीं बोलिलीं आहारार्थ ॥ ३३ ॥
    आदल्या दिवशी फळे आणली आणि ती दुसऱ्या दिवसाला उरली, तर ती अवश्य फेंकून द्यावी. ती खावी असे शास्त्रांत सांगितलेले नाही ३३.


    प्रत्यहीं आहारार्थ जाण । फळें आणावीं नूतन ।
    जीर्ण फळांचें भक्षण । निषिद्ध जाण वानप्रस्था ॥ ३४ ॥
    दररोज खाण्याकरितां ताजी फळे आणावीत. शिळे फळ भक्षण करणे वानप्रस्थाला निषिद्ध आहे हे लक्षात ठेव ३४.


    आणिकें फळें जीं आणिलीं । तीं अंगीकारा निषिद्ध झालीं ।
    जीं स्वकष्टें अर्जिलीं । तींचि वहिलीं आहारार्थ ॥ ३५ ॥
    तसेंच दुसऱ्या कोणी फळे आणली असतील तर तीही घेण्याला योग्य नव्हत; स्वकष्टाने आपण आणलेली फळे असतील तीच आहाराला योग्य होत ३५.


    देश काळ वर्तमान । इत्थंभूत कळलें ज्ञान ।
    तरी संग्रह न करावा जाण अदृष्टधारण निर्धारें ॥ ३६ ॥
    देश, काल व वर्तमान ह्यांचे इत्थंभूत ज्ञान असले तरी, कोणत्याही प्रकारचा संग्रह करूं नये. निश्चयाने प्रारब्धावरच भरंवसा ठेवून राहावे ३६.


    पराचा प्रतिग्रहो पूर्ण । सर्वथा न करावा आपण ।
    प्रतिग्रह घेतां जाण । व्रतखंडन वानप्रस्था ॥ ३७ ॥
    दुसऱ्याने दिलेले दान आपण कधीही घेऊ नये. अशा प्रकारचा प्रतिग्रह घेतला असतां वानप्रस्थाच्या व्रताचा भंग होतो, असे समजावे ३७.


    वन्यैश्चरुपुरोडाशैर्निर्वपेत्कालचोदितान् ।
    न तु श्रौतेन पशुना मां यजेत वनाश्रमी ॥ ७ ॥
    [श्लोक ७ ] वानप्रस्थ आश्रम स्वीकारलेल्याने वनातील वस्तूंनीच चरू, पुरोडाश इत्यादी हविष्यान्न तयार करावे त्याचपासून त्या त्या वेळच्या गोष्टी कराव्यात वेदविहित पशुबलीने माझे यजन करू नये. (७)


    जो वानप्रस्थ स्त्रीसमवेत । त्यासी अग्निहोत्र झालें प्राप्त ।
    तेव्हां कर्म जें वेदोक्त । तें करावें समस्त वनवासीं ॥ ३८ ॥
    जो वानप्रस्थ स्त्रीसमवेत वनांत जातो, त्याला अग्निहोत्र बाळाले पाहिजे. याकरिता त्याने वनांत राहिले असतांही सारे वेदोक्त कर्म करावें ३८.


    वनीं जीं फळें ज्या ऋतूस । तोचि कल्पावा चरुपुरोडाश ।
    तेणें यजावा मी यज्ञपुरुष । सावकाश मंत्रोक्त ॥ ३९ ॥
    वनामध्ये असतांना ज्या ऋतूंत जी फळे मिळतील, त्यांचाच चरु व पुरोडाश करून त्यानेच यथोक्त मंत्रानें, मी जो यज्ञपुरुष, त्या मजप्रीत्यर्थ यज्ञ करावा ३९.


    यापरी श्रौतकर्मविधान । यागार्थ पशुहनन ।
    तें वानप्रस्थासी नाहीं जाण । वनफळीं यजन यागाचें ॥ ४० ॥
    श्रौतकर्मविधानाप्रमाणे वानप्रस्थाने यज्ञाकरितां पशुवध करूं नये. त्याने वनांतील फळांनीच यज्ञ करावा ४०.


    अग्निहोत्रं च दर्शश्च पूर्ण्मासश्च पूर्ववत् ।
    चातुर्मास्यानि च मुनेराम्नातानि च नैगमेः ॥ ८ ॥
    [श्लोक ८] वानप्रस्थाश्रमीयांसाठी वेदवेत्त्यांनी अग्निहोत्र, दर्शपूर्णमास, तसेच चातुर्मास्य याग इत्यादी गृहस्थाश्रमाप्रमाणेच करावेत, असे सांगितले आहे. (८)


    पूर्वीं अग्निहोत्रकर्में जैसीं । गृहीं होतीं गृहस्थासी ।
    तींचि चालवावीं वनवासीं । वेदाज्ञेसीं वनस्थें ॥ ४१ ॥
    पूर्वी अग्निहोत्रादि कर्में गृहस्थाश्रमात घरामध्ये जशी गृहस्थ चालवीत होता, त्याप्रमाणेच वानप्रस्थाश्रमांतही वेदाज्ञेप्रमाणे चालवावीत ४१.


    आम्नायें आगमनिगमांसी । जाणोनि करावें यागासी ।
    दर्शपौर्णमासचातुर्मास्यांसी । निष्कामतेसी वेदाज्ञा ॥ ४२ ॥
    वैदिक क्रिया व शास्त्रप्रमाण पाहून यज्ञ करीत जावा. त्याचप्रामाणे वेदाच्या आज्ञेप्रमाणे दर्श, पूर्णमास व चातुर्मास्ययाग, इत्यादि कृत्येही निष्कामपणाने करावीत ४२.


    ऐसा मुनीश्वर वनवासी । तपस्वी तेजोराशी ।
    त्याचिये फळप्राप्तीसी । स्वयें हृषीकेशी सांगत ॥ ४३ ॥
    असा वनांत राहणारा तेजस्वी व तपस्वी मुनीश्वर, त्याला कसले फल प्राप्त होते, ते श्रीकृष्ण सांगतात ४३.


    एवं चीर्णेन तपसा मुनिर्धमनिसन्ततः ।
    मां तपोमयमाराध्य ऋषिलोकादुपैति माम् ॥ ९ ॥
    [श्लोक ९] अशा प्रकारे तपाचे आचरण करीत कृश झालेला मुनी तपोमूर्तिस्वरूप माझी आराधना करून प्रथम ऋषिलोकात जातो व नंतर तेथून माझ्या लोकी येतो. (९)


    ऐसें वेदोक्त तप साचार । आस्तिक्यभावें अत्यादर ।
    साक्षेपें करितां निरंतर । अस्थिमात्र देह उरे ॥ ४४ ॥
    अशा प्रकारे वेदांत सांगितल्याप्रमाणे आस्तिक्यभावनेनें आदरपूर्वक निरंतर तपाचे आचरण करीत असतां देहाचा केवळ अस्थिपंजर मात्र उरतो ४४.


    शुष्कशरीरपांजरा । त्वचेनें झांकिलिया शिरा ।
    परी सामर्थें अति खरा । न सरे माघारा तपोनिष्ठें ॥ ४५ ॥
    शरीराचा सांपळा शुष्क होऊन त्वचेनें शिरा आच्छादलेल्या असल्या तरी सामर्थ्याने तो अतिशय मोठा असतो. तपोनिष्ठेत तो कधीही माघार घेत नाही ४५.


    ऐसें यावज्जन्म करितां तप । तो सबाह्य झाला निष्पाप ।
    लाहोनि ज्ञान सद्‌रूप । माझें निजस्वरूप तो पावे ॥ ४६ ॥
    असें यावज्जन्म तप करीत असल्याने तो अंतर्बाह्य निष्पाप होतो; आणि त्याला सत्यज्ञान प्राप्त होऊन तो माझ्या निजस्वरूपाला पोचतो ४६.


    अवशेष वासना असतां । सूक्षरूप प्रतिबद्धकता ।
    तपाभिमानें तत्त्वतां । देह‍अहंता अणुमात्र ॥ ४७ ॥
    वासना थोडी जरी शिल्लक राहिली तरी सूक्ष्मरूपाने तिचा प्रतिबंध हा होतोच. कारण खरोखर तपाच्या अभिमानाने देहअहंताही अणुमात्र तरी असतेच ४७.


    परी फळाशा पोटीं नाहीं । ऐसेनि निमाला जो देही ।
    तो पावोनि ऋषिलोकाच्या ठायीं । तेथोनि पाहीं मज पावे ॥ ४८ ॥
    पण फलाची आशा पोटांत नसतां जो देहधारी मरण पावतो, तो ऋषिलोकाच्या ठिकाणी जाऊन तेथून मग तो माझ्याकडे येतो ४८.


    जो ऋषिलोकातें पावला । तो क्रमें मुक्तीच्या मार्गा आला ।
    तेथूनि क्रमेंचि मज पावला । यापरी उद्धरला वनस्थ ॥ ४९ ॥
    ऋषिलोकाला जो पोचतो, तो क्रममुक्तीच्या मार्गाला लागतो. आणि त्या क्रमानेंच तो मला येऊन पोचतो. अशा प्रकारे वानप्रस्थाचा उद्धार होतो ४९.


    यस्त्वेतत् कृच्छ्रतश्चीर्णं तपो निःश्रेयसं महत् ।
    कामायाल्पीयसे युञ्ज्याद्‍बालिशः कोऽपरस्ततः ॥ १० ॥
    [श्लोक १०] जो मनुष्य अतिशय कष्टाने केलेली आणि मोक्ष देणारी ही महान तपश्चर्या क्षुद्र फळांच्या प्राप्तीसाठी करतो, त्याच्याइतका मूर्ख कोण असेल बरे ? (१०)


    एवं वानप्रस्थ अतिकष्टीं । तपादिसाधनसंकटीं ।
    भोगफळाशेच्या तुटीं । मोक्षपरिपाटी पावले ॥ ५० ॥
    अशा प्रकारे वानप्रस्थ अत्यंत कष्ट सोसून व तपादिक साधनांची संकटें सहन करून फलाची आशा सोडतो तो मोक्षाला पावतो ५०.


    जें हाता आलें मोक्षफळ । आविरिंच्यादि मंगळ ।
    तें तपादिसाधन निर्मळ । कामार्थ केवळ कल्पिती ॥ ५१ ॥
    ज्याच्या योगानें सत्यलोकादि मंगल मोक्षफल हाती येते. त्या निर्मळ तपादिसाधनांचा उपयोग केवळ कामनापूर्तीसाठी करितात ५१.


    जेवीं कां चिंतामणीचियेसाठीं । मागे चातीलागीं खापरखुंटी ।
    कां परीस देवोनि पालटीं । काळी गोमटी वीट मागे ॥ ५२ ॥
    ज्याप्रमाणे हाती असलेला चिंतामणि देऊन चाती करावयासाठी खापरखुटी मागावी, किंवा परीस देऊन त्याच्या मोबदला काळी कुळकुळीत वीट मागावी ५२, 


    तेवीं मनुष्यपणाचिये स्थितीं । उत्तम जन्में तपःप्राप्ती ।
    ते तपःक्रिया व्यर्थ करिती । काम वांछिती ते मूर्ख ॥ ५३ ॥
    त्याप्रमाणे मनुष्यपण व ब्राह्मण जन्म प्राप्त होऊन तप करितात, पण कामोपभोगाची इच्छा करून तपश्चर्या फुकट घालवितात, ते मूर्ख होत ५३.


    त्या मूर्खांचें मूर्खपण । किती सांगावें गा गहन ।
    मोक्षप्राप्तीचें साधन । कामलिप्सा जाण नाशिलें ॥ ५४ ॥
    त्या मूर्खाचा मूर्खपणा किती म्हणून सांगावा? कामेच्छेनें मोक्षप्राप्तीचे साधन कि हो ते नासून टाकतात! ५४.


    असो हें मूर्खाचें कथन । वानप्रस्थाचेंचि लक्षण ।
    पूढील सांगेन संपूर्ण । शस्त्रार्थ जाण सुनिश्चित ॥ ५५ ॥
    अशा मूर्खाची गोष्ट राहू द्या. वानप्रस्थाचे पुढील लक्षण शास्त्रोक्त व खरे खरे असें संपूर्णपणे सांगतों ऐक ५५.


    जो वानप्रस्थ आपण । तपादि साधनीं अतिक्षीण ।
    झाला तरी वैराग्यज्ञान । ज्यासी जाण नुपजेचि ॥ ५६ ॥
    जो वानप्रस्थ तपादि साधनाने अतिशय क्षीण झाला, तरीसुद्धा ज्याला वैराग्य व ज्ञान उत्पन्न होत नाही ५६, 


    पन्नास वर्षें गार्हस्थ्य । दोनी द्वादशें वानप्रस्थ ।
    झाला तरी जो अप्राप्त । वैराग्ययुक्त निजज्ञाना ॥ ५७ ॥
    पन्नास वर्षे गृहस्थाश्रम करून चोवीस वर्षे वानप्रस्थाश्रम केला, तरीसुद्धा ज्याला वैराग्ययुक्तज्ञान प्राप्त झाले नाही ५७; 


    आयुष्याचे तीन भागवरी । वेंचलें गा ऐशापरी ।
    आतां चतुर्थ भाग उरल्यावरी । क्षीण शरीरीं जर्जर ॥ ५८ ॥
    आयुष्याचे तीन भाग अशा रीतीनें खर्च होऊन गेले, आणि पुढे चवथा भाग राहिला म्हणजे तो क्षीणशरीर होऊन जर्जर होतो! ५८, 


    ऐसें शरीर झालिया क्षीण । अल्पही वैराग्य झाल्या जाण ।
    करावें संन्यासग्रहण । कर्माचरण यथाशक्ती ॥ ५९ ॥
    अशा प्रकारें शरीर क्षीण झाले; आणि त्यांत थोडेसें जरी वैराग्य उत्पन्न झाले, तरी संन्यास ग्रहण करून यथाशक्ति कर्म करीत असावें ५९.


    वानप्रस्थाश्रमी झाल्याही । निःशेष वैराग्य अल्पही ।
    सर्वथा नुपजे ज्याच्या ठायीं । त्याचा अधिकार पाहीं हरि बोले ॥ ६० ॥
    आतां वानप्रस्थाश्रम घेऊनही ज्याला अल्पही वैराग्य मुळीच उत्पन्न होत नाही, त्याचा अधिकार श्रीकृष्ण सांगतात ६०.


    यदासौ नियमेऽकल्पो जरया जातवेपथुः ।
    आत्मन्यग्नीन् समारोप्य मच्चित्तोऽग्निं समाविशेत् ॥ ११ ॥
    [श्लोक ११] जेव्हा वानप्रस्थाश्रमी आपल्या आश्रमाच्या नियमांचे पालन करण्यास असमर्थ होतो, म्हातारपणामुळे त्याचे शरीर थरथर कापू लागते, तेव्हा भावनेने अंतःकरणात यज्ञाच्या अग्नींची स्थापना करावी आणि आपले मन माझे ठिकाणी लावून अग्नीत प्रवेश करावा. (११)


    सर्वथा वैराग्य नुठी देहीं । जरा आदळली ठायींचे ठायीं ।
    स्वधर्माचरणीं शक्ति नाहीं । कंप पाहीं सर्वांगीं ॥ ६१ ॥
    -देहामध्ये वैराग्य मुळीच उत्पन्न झाले नाहीं, बसल्या ठिकाणी जरा येऊन ठेपली, स्वधर्माने चालावयालाही शक्ति उरली नाही, साऱ्या अंगाला कंप सुटला ६१, 


    ऐसा वानप्रस्थवनवासी । आत्मसमारोप करूनि अग्नीसी ।
    मातें दृढ ध्याऊनि मानसीं । अग्निप्रवेशीं रिघावें ॥ ६२ ॥
    अशा स्थितीत जर वानप्रस्थाश्रमी वनामध्ये असेल, तर  त्याने आत्मस्वरूपांत अग्नीचा समारोप करून मनामध्ये माझें दृढ ध्यान करून अग्निप्रवेश करावा ६२.


    वानप्रस्थाश्रमीं वनस्थ । अतिशयें झाला जो विरक्त ।
    त्याची उत्तरविधि समस्त । स्वयें भगवंत सांगतसे ॥ ६३ ॥
    आतां वानप्रस्थाश्रमी वनांत राहात असून जो अत्यंत विरक्त होईल, त्याने पुढे कसे वागावे, तें भगवान् स्वतः सांगत आहेत ६३.


    यदा कर्मविपाकेषु लोकेषु निरयात्मसु ।
    विरागो जायते सम्यङ् न्यस्ताग्निः प्रव्रजेत्ततः ॥ १२ ॥
    [श्लोक १२] कर्मांचे फळ म्हणून जे लोक प्राप्त होतात, ते नरकाप्रमाणे दुःखपूर्ण आहेत, असे वाटून जर पूर्ण वैराग्य आले, तर विधिपूर्वक अग्नींचा त्याग करून संन्यास ग्रहण करावा. (१२)


    वानप्रस्थीं अनुष्ठान । तेणें वैराग्य अतिगहन ।
    इंद्रचंद्रादिब्रह्मसदन । निरयासमान जो मानी ॥ ६४ ॥
    -वानप्रस्थाश्रमामध्ये योग्य अनुष्ठान घडल्यामुळे अत्यंत वैराग्य उत्पन्न झाले ; आणि इंद्रलोक, चंद्रलोक व सत्यलोक हेही ज्याला नरकाप्रमाणे वाटू लागले ६४; 


    ऐसा दृढ वैराग्य‍उठावा । तेणें विहिताग्नि बोळवावा ।
    त्याग करूनि आघवा । अंगीकारावा संन्यास ॥ ६५ ॥
    सारांश, इतकें निस्सीम वैराग्य ज्याच्या ठिकाणी उत्पन्न झालें, त्याने विध्युक्त रीतीने आपल्या विहितामीचे विसर्जन करावे आणि सर्वस्वाचा त्याग करून संन्यास स्वीकारावा ६५.


    ते संन्यासग्रहणस्थिती । यथाशास्त्र यथापद्धती ।
    स्वयें सांगताहे श्रीपती । यथानिगुती विहितार्थे ॥ ६६ ॥
    तो संन्यासग्रहणाचा कल्याणप्रद प्रकार यथाशास्त्र व संप्रदायानुसार श्रीकृष्ण यथार्थ रीतीने सांगत आहेत ६६.


    इष्ट्वा यथोपदेशं मां दत्वा सर्वस्वमॄत्विजे ।
    अग्नीन्स्वप्राण आवेश्य निरपेक्षः परिव्रजेत् ॥ १३ ॥
    [श्लोक १३] ज्याला संन्यास घ्यावयाचा असेल त्याने शास्त्रानुसार मला उद्देशून यज्ञ करावा नंतर आपले सर्वस्व ऋत्विजाला देऊन टाकावे यज्ञाचे अग्नी आपल्या प्राणात विलीन करावेत आणि नंतर कसलीही अपेक्षा न ठेवता संन्यास ग्रहण करावा. (१३)


    अष्टश्राद्धादि विधान । प्राजापत्यनामिष्टिसाधन ।
    मज भगवंतातें यजून । सर्वस्वदान ऋत्विजां ॥ ६७ ॥
    - यथाविधि आठ श्राद्धे करून व प्राजापत्य नांवाची इष्टि करून मज भगवंताच्या प्रीत्यर्थ यज्ञ करून ऋत्विजाला सर्वस्वदान करावें ६७.


    मुख्यत्वें मूर्त जो अग्नी । तो निजहृदयीं संस्थापूनी ।
    आशा निःशेष छेदूनी । संन्यास करूनी निरपेक्ष ॥ ६८ ॥
    मुख्यत्वेकरून मूर्त जो अग्नि, त्याची आपल्या हृदयांत स्थापना करून, निःशेष आशा सोडून देऊन संन्यासदीक्षा ग्रहण करून निरिच्छ व्हावें ६८.


    संन्यास करितेठायीं । विघ्नें अपार उठतीं पाहीं ।
    तीं रगडूनियां पायीं । संन्यास तिंहीं करावा ॥ ६९ ॥
    संन्यास ग्रहण करतेवेळी हजारों विघ्ने  उत्पन्न होतात, ती सारी पायांखाली तुडवून टाकून संन्यासग्रहण करावें ६९.


    विप्रस्य वै संन्यसतो देवा दारादिरूपिणः ।
    विघ्नान्कुर्वन्त्ययं ह्यस्मानाक्रम्य समियात्परम् ॥ १४ ॥
    [श्लोक १४] जेव्हा ब्राह्मण संन्यास ग्रहण करू लागतो, तेव्हा देव स्त्रीपुरूषादिकांच्या रूपाने त्याच्या संन्यासग्रहणामध्ये विघ्न आणतात, कारण ते असा विचार करतात की, "हा आमची अवहेलना करून, परमात्म्याला प्राप्त करून घेण्यासाठी चालला आहे". (१४)


    संन्यास करिता जो ब्राह्मण । त्यासी समस्त देव मिळोन ।
    नाना स्त्रियादि रूपें जाण । अनंत विघ्नें करूं येती ॥ ७० ॥
    जो ब्राह्मण संन्यास घेऊ लागतो, त्याला सारे देव मिळून अनेक स्त्रियादिरूपाने अनंत विघ्ने करूं लागतात ७०.


    विघ्न करावया कारण । मनुष्य देवांचा पशु जाण ।
    सदा अर्पी बळिदान । देवाअधीन हा सर्वदा ॥ ७१ ॥
    त्यांनी विघ्न करावयाचे कारण हें  की, देवांचा पशु असा जो मनुष्य, तो नेहमी देवांना बलिदान करीत असतो; व त्यांच्या तो अधीन होऊन राहातो ७१.


    तो बळी नेदी येथूनि आतां । पाय देऊनि आमुचे माथां ।
    घेऊं पाहे ब्राह्मसायुज्यता । यालागीं सर्वथा विघ्नें करिती ॥ ७२ ॥
    त्या मनुष्याने संन्यास घेतला म्हणजे तो कांहीं ह्यापुढे आम्हांस बलि देणार नाही, इतकेच नव्हे तर उलट आमच्या डोक्यावर पाय देऊन ब्रह्मपदही घेऊं लागेल, हे मनांत येऊन देव नेहमी त्याला विनंती करूं पाहतात ७२.


    तेथ वैराग्यबळें तत्त्वतां । विघ्नें हाणूनियां लातां ।
    अवगणूनि देवां समस्तां । संन्यास सर्वथा करावा ॥ ७३ ॥
    अशा वेळी खरोखर वैराग्याच्या जोरावर विघ्नांना लाथा हाणून साऱ्या देवांना बाजूस सारून अवश्यमेव संन्यासग्रहण करावें ७३.


    ऐसा वैराग्यें उद्‍भट । विवेकज्ञानें अतिश्रेष्ठ ।
    संन्यासग्रहण वरिष्ठ । विधिनिष्ट विभागें ॥ ७४ ॥
    असा वैराग्याने संपन्न व विवेकज्ञानाने अत्यंत श्रेष्ठ असलेला पुरुष विधिपूर्वक संन्यास घेऊन वरिष्ठ  म्ह. पूज्य होऊन राहातो ७४.


    एवं झाल्या संन्यासग्रहण । त्याचें विधीचें विधिविधान ।
    स्वयें सांगताहे नारायण । स्वधर्मलक्षण संन्यासिया ॥ ७५ ॥
    अशा प्रकारे संन्यास ग्रहण केल्यानंतर त्याने विधिपूर्वक कसे वागावें तें संन्यासाचे स्वधर्मलक्षण स्वत: नारायण सांगत आहेत ७५,


    बिभृयाच्चेन्मुनिर्वासः कौपीनाच्छादनं परम् ।
    त्यक्तं न दण्डपात्राभ्यामन्यत्किञ्चिदनापदि ॥ १५ ॥
    [श्लोक १५]


    भूतां अभयदानपुरस्कर । संकल्पपूर्वक प्रेषोच्चार ।
    तैं उरलें दिसे देहमात्र । सर्वस्य येर त्यागिलें ॥ ७६ ॥
    -प्राणिमात्रांना अभयदान देण्याकरितां संकल्पपूर्वक प्रेषोच्चार केल्यानंतर त्याचा देहमात्र राहिलेला दिसतो. बाकी त्याने पूर्वीच सर्वस्वाचा त्याग केलेला असतो ७६.


    जो गुरुवाक्यश्रवणासरिसा । वस्तूचि हो‍ऊनि ठेला आपैसा ।
    उडाला देहबुद्धिचा वळसा । तुटला फांसा कर्माचा ॥ ७७ ॥
    जो गुरुवाक्यश्रवणाबरोबर सहज ब्रह्मस्वरूप होऊन जातो, आणि देहबुद्धीचा ठसा उडून जाऊन ज्याच्या कर्माचाही फासा तुटतो ७७; 


    त्यासी विधिविधान कर्तव्यता । बोलोंचि नये गा सर्वथा ।
    नवनीत आलिया हाता । रितें ताक आतां कोण घुसळी ॥ ७८ ॥
    त्याला शास्त्रविधीप्रमाणे वागणेसवरणेची गोष्टसुद्धा कधी बोलू नये. कारण, लोणी हाताला आल्यानंतर मग रिकामें ताक घुसळीत कोण बसणार? ७८.


    कापूर मिळालिया वन्हीं । तो परतेना कापूरपणीं ।
    तेवीं वस्तु झाला जो गुरुश्रवणीं । तो विधिकिंकरपणीं वर्तेना ॥ ७९ ॥
    कापूर अग्नीला मिळाला, म्हणजे मग पुन्हा काहीं तो कापराच्या स्वरूपांत यावयाचा नाही. त्याप्रमाणे गुरुवाक्यश्रवणानें जो ब्रह्मरूप झाला तो काही विधिनिषेधाचा ताबेदार होऊन राहणार नाही ७९.


    परी गुरुवाक्यें तत्त्वतां । ज्यासी ऐसी हे अवस्था ।
    सत्य न बाणेचि सर्वथा । त्याची विधानता अवधारीं ॥ ८० ॥
    परंतु खरोखर गुरुवाक्याने ज्याला अशी अवस्था बाणली नसेल, त्याच्या वागणुकीचा प्रकार ऐक ८०.


    गुरुवाक्याचें करितां मनन । नागवेपणीं लाजे मन ।
    तरी लिंगमात्र आच्छादन । कौपीन जाण धरावी ॥ ८१ ॥
    गुरुवाक्याचे मनन करतांना नागवेपणाने राहण्याला लज्जा वाटेल तर लिंगाच्या आच्छादनापुरती कौपीन धारण करावी ८१.


    इतुकेन निर्वाह न सरे । ऐसें जाणवलें जैं पुरें ।
    तैं वस्त्रखंड दुसरें । स्वाधिकारें धरावें ॥ ८२ ॥
    अथवा तेवढ्याने काही निर्वाह होत नाही असे वाटेल, तर आपल्याला योग्य असा दुसरा कापडाचा तुकडा घ्यावा ८२.


    दंड कमंडलु जंव आहे । तंव कौपीन बहिर्वास राहे ।
    दंडत्यागासवें पाहें । त्याग होये वस्त्रांचा ॥ ८३ ॥
    दंड आणि कमंडलु जोपर्यंत असतो, तोपर्यंत कौपीनही अंगवस्त्रासह राहते. आणि दंडाचाही जेव्हां त्याग केला जातो तेव्हां वस्त्राचाही त्याबरोबर त्याग होतो ८३.


    आपत्तिकाळीं संन्याशासी । रोग लागला होय ज्यासी ।
    का जरेनें व्यापिलें देहासी । तैं जें लागेल त्यासी तें द्यावें ॥ ८४ ॥
    संन्याशाला विपत्तिकाल प्राप्त झाला, किंवा त्याला रोग जडला, किंवा वृद्धापकाळानें देह जर्जर झाला, तर त्याला जे लागेल तें देत असावे ८४.


    गुरुवाक्यें श्रवण मनन । ऐसें साधी जो साधन ।
    त्या साधकाचें लक्षण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ ८५ ॥
    गुरुवाक्याचे श्रवण मनन करणे एतद्रूप  साधन जो साधतो, त्या साधकाचे लक्षण स्वतः श्रीकृष्ण सांगत आहेत ८५.


    दृष्टिपूतं न्यसेत्पादं वस्त्रपूतं पिबेज्जलम् ।
    सत्यपूतां वदेद्वाचं मनःपूतं समाचरेत ॥ १६ ॥
    [श्लोक १६] संन्याशाने वस्त्र धारण केलेच, तर फक्त लंगोटी व त्यावर एक लहानशी छाटी असावी संकटकाळ नसेल तर त्याने फक्त दंड आणि कमंडलू या व्यतिरिक्त दुसरी कोणतीही पूर्वी टाकलेली वस्तू बाळगू नये. (१५)


    दृष्टि ठायीं ठेवूनि जाण । पृथ्वी पाहूनि पावन ।
    हंसगतीं करी गमन । अनुसंधान निजवृत्तीं ॥ ८६ ॥
    भूमीवर दृष्टि ठेवून, जमीन पवित्र पाहून, आत्मवृत्तीचें अनुसंधान ठेवून तो हंसगतीने म्ह० सावकाश चालतो ८६ ; 


    जेथ जीवसंपदा दृष्टीं पडे । तैं प्राण गेल्या न चले पुढें ।
    जीवांतें काढूनि कडे । पाऊल पडे अतिशुद्ध ॥ ८७ ॥
    जेथें जीवमात्र दृष्टीस पडेल तेथें प्राण गेला तरी पुढे पाऊल टाकावयाचा नाही. त्या जीवाला कडेला काढून पाऊल अत्यंत निर्मळ जाग्यावर ठेवतो ८७.


    आधींच पवित्र गंगाजळ । त्याचा निर्मळ वस्त्रें निरसोनि मळ ।
    यापरी करोनियां निर्मळ । गंगाजळ सेविती ॥ ८८ ॥
    गंगाजळ हे आधीच पवित्र ; त्यांतील खळमळही निर्मळ वस्त्राने गाळून टाकतो व अशा रीतीने निर्मळ करून पाणी पितो ८८.


    ज्याचे वाचेचे आळां । असत्याच्या तृणशाळा ।
    जाळूनि वैराग्यज्वाळा । सत्याचा उगवला कल्पद्रुम ॥ ८९ ॥
    त्याच्या वाणीच्या आळ्यांत, असत्यरूप गवताचा पेंढा वैराग्यरूपी अग्निज्वाळांनी जाळून टाकून तेथे सत्याचा कल्पवृक्ष उगवतो ८९.


    ज्या कल्पद्रुमाचीं वचनफळें । परिपक्वे आणि सोज्वळें ।
    मधररसेंसीं रसाळें । अतिनिर्मळें घमघमितें ॥ ९० ॥
    त्या कल्पवृक्षाची वचनरूप फळे अत्यंत रसाळ व परिपक्व झालेली, मधुर रसाने थबथबलेली, अत्यंत निर्मळ व घमघमीत स्वादाची असतात ९०.


    जें श्रवणीं अतिगोड । पुरवी श्रोतयांचें कोड ।
    निववी जीवाची चाड । सत्य सुरवाड हा वाचेचा ॥ ९१ ॥
    ती श्रवणाने चाखली असतां अत्यंत गोड, श्रोत्यांची इच्छा तृप्त करणारी, आणि जीवाची इच्छा पूर्ण करणारी असतात. 'सत्यपूत' म्हणजे सत्याने पावन झालेली वाणी ती हीच ९१.


    सहजें संन्याशाचें ध्यान । `अहमेव नारायण' ।
    तें दृढ धरोनि अनुसंधान । पवित्र मन करावें ॥ ९२ ॥
    (आतां मनाची पवित्रता सांगतात.) संन्याशाचे स्वाभाविक ध्यान म्हणजे 'नारायण तो मीच' हे होय. ही दृढतर भावना धरून मन पवित्र करावें ९२.


    मन करोनि पावन । पृथ्वी विचरावी जाण ।
    त्या मनाचें पवित्रपण । सर्वत्र आपण लक्षावें ॥ ९३ ॥
    मन पवित्र करून पृथ्वीचें पर्यटन करावे. सर्वत्र आत्मस्वरूप आहे असे पाहाणे, हेच मनाचे पवित्रपण होय ९३.


    संन्याशाचे धर्मीं जाण । मुख्यत्वें हेंचि लक्षण ।
    पवित्र करोनि अंत:करण । सर्वत्र नारायण लक्षावा ॥ ९४ ॥
    संन्याशाच्या धर्मामध्ये मुख्य लक्षण हेच आहे की, अंतःकरण पवित्र करून सर्व ठिकाणी नारायणस्वरूपाचीच भावना धरावी ९४.


    मनाचें पवित्रपण । उद्धवा या नांव जाण ।
    आतां त्रिदंडाचें लक्षण । संन्यासनिरूपण तें ऐक ॥ ९५ ॥
    उद्धवा ! ह्याचेच  नाव मनाचा पवित्रपणा हे लक्षात ठेव. त्रिदंड संन्यासाचे लक्षण कसे असते तेही ऐक ९५.


    मौनानीहानिलायामा दण्डा वाग्देहचेतसाम् ।
    न ह्येते यस्य सन्त्यङ्ग वेणुभिर्न भवेद्यतिः ॥ १७ ॥
    [श्लोक १७] उद्धवा ! वाणीचा मौन, शरीराचा काम्यकर्मत्याग आणि मनाचा प्राणायाम, हे दंड होत ज्याच्याजवळ हे तिन्ही दंड नाहीत, तो केवळ बांबूचे दंड घेऊन संन्यासी होत नाही. (१७)


    मौन अथवा सत्य भाषण । कां श्रीरामनामाचें स्मरण ।
    हो कां ओंकाराचें उच्चारण । `वाग्दंड' जाण या नांव ॥ ९६ ॥
    मौन अथवा सत्य भाषण, किंवा श्रीरामाचे नामस्मरण, अथवा ओंकाराचा उच्चार. याचे नांव 'वाग्दंड' ९६.


    शरीरींचे जितुकें चळण । तें प्राणाचेनि बळें जाण ।
    त्या प्राणाचें प्राणरोधन । करावें आपण प्राणायामें ॥ ९७ ॥
    शरीरांतील जितकें म्हणून चलनवलन आहे, तितकें सारे प्राणाच्याच शक्तीने होते. त्या प्राणाचा प्राणायामाने आपण निरोध करावा ९७.


    प्राणायामें निजप्राण । जिणोनि करावा स्वाधीन ।
    या नांव `देहदंड' जाण । ऐक लक्षण `मनोदंडाचें' ॥ ९८ ॥
    प्राणायामाच्या योगाने प्राण जिंकून आपल्या स्वाधीन ठेवावा. ह्याचें नांव 'देहदंड'. आतां मनोदंडाचे लक्षण ऐक ९८.


    मनाचें चपळपण । संकल्प विकल्प जाण ।
    त्याचें करावया छेदन । ब्रह्मानुसंधान करावें ॥ ९९ ॥
    संकल्प आणि विकल्प हाच मनाचा चपलपणा आहे. त्याचे छेदन करण्याकरितां ब्रह्मस्वरूपाचे अनुसंधान करावें ९९.


    माझें स्वरूप सर्वगत । तेथ निश्चयें ठेवितां चित्त ।
    मन संकल्पविकल्पें जाय जेथ । तेथ तेथ स्वरूप ॥ १०० ॥
    माझें स्वरूप सर्वव्यापी आहे ; त्याच्यावर दृढभावनेनें चित्त ठेवले म्हणजे संकल्पविकल्पाने मन जेथे जेथे जाईल, तेथे तेथे माझें स्वरूप असतेच १००. 

    एकनाथी भागवत

    एकनाथी भागवत अध्याय १ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ६ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ८ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १४ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १५ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय १६ अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय विसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित

    श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २७ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २८ अर्थासहित अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय २९ अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३० अर्थासहित

    एकनाथी भागवत अध्याय ३१ अर्थासहित

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा
    Loading...